राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल, जयंत पाटलांचा जनतेला विश्वास

| Updated on: Jun 20, 2021 | 5:16 PM

पूराचा संभाव्य धोका लक्षात घेता कर्नाटक सरकारशी सकारात्मक चर्चा पार पडली असल्याची माहिती पाटील यांनी दिलीय. सांगलीमध्ये सामाजिक संस्थेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते.

राज्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल, जयंत पाटलांचा जनतेला विश्वास
जलसंपदा मंत्री जयंत पाटील
Follow us on

सांगली : सांगली आणि कोल्हापूर परिसरात दमदार पाऊस जाल्यानंतर कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात पूर परिस्थिती निर्माण झाल्यास सरकार झोकून देऊन काम करेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. पूराचा संभाव्य धोका लक्षात घेता कर्नाटक सरकारशी सकारात्मक चर्चा पार पडली असल्याची माहिती पाटील यांनी दिलीय. सांगलीमध्ये सामाजिक संस्थेच्यावतीने निर्माण करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी जयंत पाटील बोलत होते. (the government will work on the battlefield If there is a flood situation in Maharashtra)

संभाव्य पूर परिस्थितीशी सामना करण्यासाठी सांगलीवाडी इथं मराठा बोट क्लबच्यावतीने “जयंत रेस्क्यू फॉर्स”ची स्थापना करण्यात आली आहे. या माध्यमातून पूर परिस्थितीमध्ये बचावकार्य करण्यात येणार आहे. या पथकाचा लोकार्पण सोहळा जयंत पाटील यांच्या हस्ते आज पार पडला. यावेळी जयंत पाटील यांनी बोटीतून कृष्णा नदीच्या पात्रात फेरफटका मारत पाहणी केली. यावेळी बोलताना मंत्री जयंत पाटील म्हणाले की, महाराष्ट्र मध्ये पूर येतो. त्याचा फटका सांगली, कोल्हापूर, सातारासह कर्नाटक राज्यालाही बसतो. त्यामुळे याबाबत दोन्ही राज्याचा समन्वय असावा यासाठी बैठक घेतली. कर्नाटक राज्याने चांगला प्रतिसाद दिला आहे.

धरणक्षेत्रात आधुनिक पर्जन्यमापक यंत्रणा

‘गेल्या वर्षी पूर कसा कमी येईल याबाबत दोन्ही राज्यांनी समन्वय ठेवून प्रयत्न केला आणि आता महाराष्ट्र सरकारने यामध्ये आणखी सुधारणा करत धरणक्षेत्रात आधुनिक पर्जन्यमापक यंत्रणा कार्यान्वित केली आहे. ज्यामुळे धरणात किती पाणी असेल, नदी पात्रात किती पाणी असेल, याचा अचूक अंदाज येईल. त्याचबरोबर जलसंपदा विभागाच्या वतीनं नदीकाठच्या प्रत्येक गावांना पाणी पातळी वाढल्यास पाणी कुठपर्यंत येऊ शकेल याबाबत नकाशे दिले आहेत. तसंच कोणतंही संकट आलं तर हे सरकार झोकून देऊन काम करेल, असा विश्वासही पाटील यांनी व्यक्त केलाय.

जयंत पाटील-येडियुरप्पांमध्ये चर्चा

पश्चिम महाराष्ट्र आणि विशेषत: सांगली, कोल्हापूरमधील महापुराचं संकट टाळण्यासाठी, राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील कर्नाटकसोबत वाटाघाटी करत आहेत. त्यांनी आज कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांची काल भेट घेतली. अलमट्टी आणि हिप्परगा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यास सांगली-कोल्हापूरमधील कृष्णा आणि पंचगंगा नद्यांमधील पाण्याची पातळी घटेल, त्यामुळे महापुराचं संकट टळेल. त्या अनुषंगानेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातील जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि मंत्री स्तरावर कर्नाटकातील बंगळुरुत बैठक पार पडली. पूर नियंत्रणाच्या दृष्टीने महत्त्वाची चर्चा करुन, महापुराचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

संबंधित बातम्या : 

सांगलीत मुसळधार पाऊस, कृष्णेची पाणीपातळी 23 फुटांवर, पूर भागात आपातकालीन यंत्रणा सतर्क

कृष्णा नदीच्या पाणीपातळीत वाढ, नागठाणे बंधारा पाण्याखाली; तर शेरीनाल्यातील दूषित पाण्यामुळे नदीपात्रात फेस

the government will work on the battlefield If there is a flood situation in Maharashtra