Sanjay Dina Patil : मी चूक केली असेल तर…. संजय दिना पाटील यांचं राऊतांना चोख प्रत्युत्तर

संजय राऊत यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रानंतर खासदार संजय दिना पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. "मी कोणतीही चूक केली नसल्याने पोलीस चौकशीला पूर्णपणे तयार आहे," असे पाटील यांनी ठामपणे सांगितले. राऊतांचे आरोप फेटाळताना पाटील यांनी म्हटले की, त्यांच्यावर कोणाचेही उपकार नाहीत आणि त्यांना सुरक्षाही नको आहे. हे प्रकरण चांगलेच पेटले असून महाराष्ट्राच्या राजकारणात नवे वळण आले आहे.

Sanjay Dina Patil : मी चूक केली असेल तर.... संजय दिना पाटील यांचं राऊतांना चोख प्रत्युत्तर
खासदार संजय दिना पाटील
| Updated on: Jun 25, 2026 | 1:46 PM

शिवसेना ठाकरे गटातून फुटून, उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेत 6 खासदार सामील झाले. राज्याचं राजकारण हादरवणाऱ्या या घटनेतील एक खासदार संजय दिना पाटील आणि संजय राऊत यांच्यातील वादााची सध्या सगळीकडे चर्चा आहे. त्यातच संजय राऊत यांनी संजय दिना पाटील यांच्याविरोधात लेटर बॉम्ब टाकला. राऊतांनी डायरेक्ट मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांना पत्र लिहीलं असून त्यात संजय दिना पाटील यांच्यावर अनेक आरोप केलेत. त्यांच्यावर कारवाईची देखील मागणी केली. त्यानंतर हे प्रकरण चांगलंच पेटलं असून आता खासदार संज दिना पाटील यांनी राऊतांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. माध्यमांशी बोलताना संजय पाटील हे चांगलेच चिडलेले दिसले. यावेळी त्यांनी पत्रकारांवर अरेरावी करत त्यांनाही शिवीगाळ केल्याचे दिसून आले.

माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नानंतर संजय पाटील हे चांगलेच भडकले. त्यांनी संबंधित पत्रकारांना उद्देशून शिवीगाळ केली तसेच मारण्याची भाषाही वापरल्याचं यावेळी  दिसलं.  पत्रकाराच्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी अर्वाच्च भाषेचाही वापर केला.

मी काही चूक केली असेल तर…

मी खुलेआम बोललो आहे ना, कारवाई होऊ दे ना. मी जर काही चूक केलं असेल तर पोलीस कारवाई करतील, मी चौकशीला तयार आहे, असं संजय दिना पाटील म्हणाले. माझं शिवसैनिकांसोबत काहीही घेणं देणं नाही, मी हे पहिल्यापासून बोलतोयं. शिवसैनिकांचे माझ्यावर उपकार आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांच्या लोकांचे माझ्यावर उपकार आहेत की त्यांनी मला निवडून दिलं. एकदा नाही 3 वेळा निवडून दिलं, आमदार बनवलं, 2 वेळा खासदार बनवलं. माझं त्यांच्याशी काही वाकडं नाही, असं ते म्हणाले.

मी कशावर रिॲक्शन दिली जेव्हा ते म्हणाले, तुम्ही काही केलं तर आम्ही पाहून घेऊ. मी कशाला काय करू, मला काय पडलंय ? जेव्हा ते काही करतील तर आमची तयारी असेल, ते आले तर आम्ही काय मार खायचा ? असा सवाल त्यांनी विचारला. मला काही सेक्युरिटीची गरज नाहीये, त्यांना सेक्युरिटीची गरज आहे. ते मोठ लोक आहेत, मी पहिल्यापासून त्यांना मानसन्मान खूप दिलाय, असं ते म्हणाले.

यांना लागतात 10-10 लोकं, मला नाही लागत, मी लोकांच्या मनात आहेत, मनावर राज्य करतो, लोकांच्यात जातो, त्यांना भेटतो मी, त्यांच्या सुख-दु:खात जातो मी, तेव्हा लोकं माझ्यासोबत राहतात. मी असं जबरदस्ती, पार्टीचे मालक बनून बसलेत म्हणून जबरदस्तीने पाया पडायला लावत नाही. मी लोकांच्या पाया पडतो, कोणी हात जोडलेले मला आवडत नाही.

शिंदे नाराज नाहीत, शाबासकी दिली

संजय दिना पाटील यांच्या वक्तव्यानंतर एकनाथ शिंदेंनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती, त्यावरही पाटील यांनी उत्तर दिलं.  त्यांनी मला काही फोन केला नाही. अरे मी मर्द लोकांसोबत गेलोय, ते मर्दांची कदर करतात, अशी नाराजी व्यक्त करत नाहीत, शाबसकी दिली आहे त्यांनी मला असं म्हणत पाटील यांनी नाराजीच्या चर्चा फेटाळून लावल्या.

मी तिथे ( ठाकरे गट) असतानाही लोकांची काम करत होतो, आता इथेही ( शिंदे गट) कामं करणार आहे, इकडे अजून जरा अपेक्षा आहे. मी कामासाठी , कुठल्याही फंडासाठी किंवा कशासाठीही ( ठाकरे गट) सोडून गेलो नाही, अपमान होत होता, म्हणून मी शिंदे गटात गेलो, असं  संजय पाटील यांनी सांगितलं.  वारंवार सांगूनही त्यांनी काहीच ऐकलं नाही. एक महिना, दोन, चार महिने,  पाच वर्ष झाली होती. खासदारकी लढलो होतो,  असं वाटलं खासदारकी लढून तरी ही चालूच आहे, किती सहन करणार ही गोष्ट ? सहन करण्याची हद्द संपली.  त्यांना सांगितलं तरी काही झालं नाही., शेवटच्या दिवशी पण, मीटिंगला सांगून आलो होतो की समोरसमोर बसवा, बोलू, पण झालं नाही असा आरोप पाटील यांनी केला.

Follow Us