
“शरद पवार यांच्याशी कसला रुसवा फुगवा?. एका विषयामध्ये आम्ही शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या. महादजी शिंदे यांच्या नावाने ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो, त्यांनी असं कुठलं महान कार्य केलं?. महाराष्ट्र सदनमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. लोकांचा गैरसमज झाला की, मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला. पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्यांची फसवणूक झाली. हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता. खाजगी कार्यक्रम होता. आमच्याकडे अशा अनेक खाजगी संस्था पुरस्कार देत असतात. मराठी साहित्य परिषदेची परवानगी न घेता मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला. संमेलनाचं नाव वापरून गैरवापर करून हा पुरस्कार देण्यात आला. येथे आमचा आक्षेप आहे” असं संजय राऊत म्हणाले.
“पवार साहेबांसारख्या व्यक्तीला सुद्धा अंधारात ठेवलं गेलं. नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे. दोन स्वतंत्र विचारधारा आहेत. आमचं एखाद्या व्यक्ती विषयीचे मत टोकाचं आहे. शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांबद्दल सुद्धा आमचं तेच मत आहे. आमचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी फोडला. या लोकांना हाताला धरून या सगळ्या संदर्भात चर्चा शरद पवारांशी कशा बाबत करावी? आमचं आणि शरद पवार यांचे भांडण नाही. आम्ही आमचे मत मांडलं. भूमिका मांडली. त्यांची भूमिका वेगळी असेल. आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे, तसा त्यांना सुद्धा आहे” असं संजय राऊत म्हणाले.
‘सरपटणारे लोक आहेत’
“एकनाथ शिंदे बाबत त्यांनी जे भाषण केले, ते ऐतिहासिक आहे. असं काय महान कार्य केलं? महादजी शिंदे पुरस्कार देताना जे भाषण केलं ते इंटरेस्टिंग आहे. महाराष्ट्राला असं काय पुढे नेलं?. सत्तेचा गैरवापर करून लोकांना दणका देऊन दिल्ली पुढे झुकणारे लोक आहेत. सरपटणारे लोक आहेत. त्यांना तुम्ही महादजी शिंदे पुरस्कार देता, तर त्या संस्थेची चौकशी व्हायला हवी” अशी मागणी संजय राऊत यांनी केली.
‘सरकार सगळीकडे पुरं पडू शकत नाही’
“मी दिल्लीत दोन दिवस आहे. पुस्तक सोडून द्या, अनेक मराठी लोक दिल्ली येणार आहेत. त्यांना मलाही भेटण्याची इच्छा असते. काही आमच्याशी संबंधित लोक असतात. लेखक, ग्रंथ पुस्तक विक्रेते त्यांना मला भेटण्याची सुद्धा इच्छा आहे. महाराष्ट्रातून आलेल्या लोकांना काही अडचणी असतील सरकार सगळीकडे पुरं पडू शकत नाही. त्यांच्या राहण्याच्या अडचणी असतात. बाकीच्या अडचणी असतात. त्यांच्या अडचणी मला सोडवता आल्या तर नक्कीच मला आनंद होईल” असं संजय राऊत म्हणाले.
‘त्या शरद पवारांनी हे सांगावं’
“सहज संस्थेचा पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र सदन त्यासाठी वापरलं गेलं. शरद पवार यांना तसं वाटलं असेल की, साहित्य संमेलनाचा तो कार्यक्रम आहे. या राज्यात एकंदरीत फसवणूक करून पुरस्कार शिंदे यांना दिला. यामागे गडबड आहे ती सगळ्यांना माहिती आहे. महादजी शिंदे यांच्या तोडीचे काय काम एकनाथ शिंदे यांनी केलं? हे ज्यांनी पुरस्कार दिला त्यांनी सांगायला हवं. किंवा ज्यांच्या हस्ते पुरस्कार दिला त्या शरद पवारांनी” असं संजय राऊत म्हणाले.
‘फडणवीस यांच्यातील सच्चा माणूस जागा झाला असेल’
सिडको प्रोजेक्टच्या चौकशीच्या मुद्यावर ते म्हणाले की, “या सरकारचा अंतर्गत विषय आहे. आधीच्या सरकारनं काही भ्रष्टाचार घोटाळा केला असेल, राज्याला फसवल असेल आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील सच्चा माणूस जागा झाला असेल, जर त्यांना या सगळ्याची चौकशी करावी असं वाटत असेल, त्याचं स्वागत केलं पाहिजे”
‘अमित ठाकरेंच्या मताचा आदर केला पाहिजे’
“अमित ठाकरे मनसेचे नेते आहेत. ते माहीम मधून निवडणूक हरले ते तरुण नेते आहेत. त्यांनी ईव्हीएम संदर्भात जे मत मांडलं आहे, त्याचा आदर केला पाहिजे. ट्रम्प यांनी सुद्धा मोदींना सांगितलं बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या. जगभरातून ईव्हीएम हे संशयामुळे हटवण्यात आले आहेत. एक वर्ग असा आहे त्यांचा असं म्हणणं आहे की, ईव्हीएममुळे नाही तर पैशांचा गैरवापर, घोटाळे, दहशत यामुळे निवडणूक हरलो. अमित ठाकरे यांना हेच म्हणायचं आहे” असा दावा संजय राऊत यांनी केला.