सामाजिक परिवर्तनात संत रविदासांची भूमिका ऐतिहासिक; दत्तात्रेय होसबळे यांचं विधान

संत रविदासांची सामाजिक परिवर्तनातील भूमिका ऐतिहासिक आहे, असे दत्तात्रेय होसबळे यांनी त्यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त म्हटले. त्यांनी जन्माधारित भेदभावाला नाकारून कर्माला श्रेष्ठ मानले, अंधश्रद्धा दूर केल्या आणि सामाजिक समरसता व एकतेचा संदेश दिला. त्यांचे जीवन श्रमप्रतिष्ठा आणि पारदर्शकतेचे प्रतीक होते, जे आजही प्रेरणादायी आहे.

सामाजिक परिवर्तनात संत रविदासांची भूमिका ऐतिहासिक; दत्तात्रेय होसबळे यांचं विधान
Dattatreya Hosabale
Image Credit source: Tv9 Network
| Updated on: Jun 13, 2026 | 11:45 AM

संत शिरोमणी श्री रविदासजी यांच्या ६५०व्या जयंती वर्षानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्यांना विनम्र अभिवादन करतो. भारताची महान संतपरंपरा ही आपल्या राष्ट्राला लाभलेली एक अद्वितीय दैवी देणगी आहे. आपल्या दीर्घ इतिहासात या संतपरंपरेने केवळ ईश्वरभक्ती व उपासनेची भावना जागृत केली नाही, तर समाजातील सामाजिक विकृती, भेदभाव आणि अन्याय दूर करून सामाजिक समरसता दृढ करण्याचे कार्यही केले. त्याचबरोबर परकीय सत्ताधीशांच्या अत्याचारांविरुद्ध संघर्षासाठी समाजाला जागृत व सज्ज करण्याचेही महत्त्वपूर्ण कार्य या संतांनी केले, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी म्हटलं आहे.

संत शिरोमणी सद्गुरु श्री रविदास यांच्या ६५०व्या जयंतीनिमित्त सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी एक निवेदन जारी केलं आहे. त्यात त्यांनी संत परंपरा आणि संत रविदास यांच्या कार्याचा गौरव केला आहे. या तेजस्वी संतपरंपरेत संत श्री रविदासजी यांचे स्थान अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यांचे परिश्रमी जीवन आणि कार्य आपणा सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. संत-महात्म्यांप्रती श्रद्धा आणि समाजातील वंचित, पीडित घटकांप्रती करुणा हा त्यांच्या स्वभावाचा मूलभूत गुण होता. गृहस्थाश्रमात राहूनही त्यांनी सांसारिक मोहापासून अलिप्त राहून अध्यात्माशी सुसंगत जीवन जगले. आपल्या आचरणातून त्यांनी श्रमप्रतिष्ठा, शुद्ध, सदाचारी आणि पारदर्शक जीवनमूल्यांची समाजात पुनर्स्थापना केली, असं दत्तात्रेय होसबळे म्हणाले.

सामाजिक परिवर्तनात ऐतिहासिक भूमिका

संत श्री रविदासजी अखंड भक्तिरसात तल्लीन असलेले महान संत होते. त्यांनी समाजात नवचैतन्य निर्माण केले. जन्माधारित भेदभावाला नाकारून त्यांनी कर्मालाच श्रेष्ठत्वाचा खरा निकष मानले. अंधश्रद्धा, रूढी-परंपरा आणि कालबाह्य प्रथांपासून समाजाची मानसिकता मुक्त करण्यासाठी, तसेच काळानुरूप आवश्यक सामाजिक परिवर्तन स्वीकारण्यासाठी त्यांनी ऐतिहासिक भूमिका बजावली. त्यांच्या विचारांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या ४१ वाणी (रचना) ‘शबद’ स्वरूपात श्री गुरु ग्रंथ साहिबमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.

सगुण निर्गुण भक्तीचा सुंदर संगम

अत्यंत साध्या कुटुंबातून आलेल्या संत श्री रविदासजी यांचे श्रेष्ठत्व त्यांच्या परमभक्ती, सेवाभाव आणि समाजाविषयीच्या निर्मळ प्रेमामुळे काशीतील विद्वानांसह समाजातील सर्व स्तरांनी मान्य केले. काशीचे राजा, झाली राणी तसेच मीराबाई यांसारख्या राजघराण्यातील व्यक्तींनीही त्यांना गुरु म्हणून स्वीकारले. संत श्री रविदासजी आणि मीराबाई यांचे गुरु-शिष्य नाते हे सगुण आणि निर्गुण भक्तीचा सुंदर संगम असून जातीय भेदभाव मानणाऱ्यांसाठी अनुकरणीय संदेश आहे, असं ते म्हणाले.

तेच शरण आले

मुस्लिम आक्रमकांच्या दहशतीच्या कठीण काळात संत श्री रविदासजी यांनी भक्तीपरंपरेचा निर्मळ प्रवाह अखंड ठेवत धर्माचे श्रेष्ठत्व प्रतिपादित केले आणि लोकांना धर्मनिष्ठ, सदाचारी आचरणाचे आवाहन केले. त्यांना इस्लाम स्वीकारण्यास प्रवृत्त करण्याचे अनेक प्रयत्न झाले; परंतु त्यांच्या भक्ती, आध्यात्मिक सामर्थ्य आणि तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव पाहून त्यांना धर्मांतरित करण्याचा प्रयत्न करणारेच त्यांच्या शिष्यत्वात आले, असं त्यांनी नमूद केले.

सर्वांनी संकल्प करूया

आजच्या काळात समाजाला वर्ग आणि जात यांच्या आधारावर विभाजित करण्याचे प्रयत्न करणाऱ्या विविध विघातक शक्ती सक्रिय आहेत. अशा परिस्थितीत पूज्य संत रविदासजी यांच्या जीवनसंदेशाचा सार समजून घेऊन समाज आणि राष्ट्राची एकता, अखंडता आणि सामाजिक समरसता दृढ करण्याचा आपण सर्वांनी संकल्प करणे आवश्यक आहे, असं आवाहन त्यांनी केलंय.

Follow Us