बीड हत्याप्रकरण तापलं, सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज घेणार राज्यपालांची भेट

बीडमधील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात तीव्र राजकीय वाद निर्माण झाला आहे. विरोधकांच्या आरोपांमुळे सरकार धारेवर आहे. आज सर्वपक्षीय शिष्टमंडळ राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन कायदा-सुव्यवस्था बिघडल्याबाबत पत्र देणार आहे. हत्येच्या आरोपींपैकी सहा जणांना अटक झाली असली तरी एक आरोपी फरार आहे.

बीड हत्याप्रकरण तापलं, सर्वपक्षीय शिष्टमंडळ आज घेणार राज्यपालांची भेट
संतोष देशमुख हत्याप्रकरणामुळे राज्यातील वातावरण तापलं
| Updated on: Jan 06, 2025 | 9:28 AM

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे राज्यातलं वातावरण प्रचंड तापलं आहे.विरोधकांकडून सातत्याने याप्रकरणावरून सरकारला धारेवर धरलं जात आहे. आता याप्रकरणी आज सर्वक्षीय शिष्टमंडळ हे राज्यपाल सी.पी राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत. बीडमध्ये निर्माण झालेल्या कायदा-सुव्यवस्थेप्रकरणी राज्यपालांना पत्र देण्यात येणार आहे. आज सकाळी 10.30 वाजता सर्वपक्षीय नेते हे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना भेटणार आहेत. या भेटीमध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळी असतील. भारतीय जनता पक्ष, पवार गट, ठाकरे गट, शिंदे गट, अजित पवार गटाचे नेते राज्यपालांना भेटणार आहे.

या हत्येप्रकरणी गेल्या काही दिवसांत राज्यभरात अनेक आंदोलनं देखील होताना पहायला मिळाली. या हत्येचा आरोप असलेल्या 7 आरोपींपैकी सहा जणांना आत्तापर्यंत अटक करण्यात आली आहे. मात्र एक आरोपी अद्यापही फरार आहे. विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड या दोघांनाही आता सीआयडीने ताब्यात घेतलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र या सर्व हत्याप्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्यामागे असलेले त्यांचे नेते धनंजय मुंडे यांचा प्रत्यक्षात सहभाग आहे, असा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वपक्षीय नेते आज राज्यपालांची भेट घेणार आहेत.

आज सकाळी 10.30 वाजता सर्वपक्षीय नेते हे राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांना भेटणार आहेत. या भेटीमध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळी असतील. भाजप आमदार सुरेश धस यांनी हा मुद्दा सातत्याने लावून धरला आहे. आवादा कंपनीकडे खंडणीची मागणी करण्यात आली होती. ती खंडणी वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकाने मागितली होती, त्याच खंडणीच्या संदर्भातच सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली. वाल्मिक कराड व त्याच्या आकावर हत्येचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी सातत्याने मागणी सुरेश धस व इतर नेत्यांकडून केली जात आहे. याच सर्व मुद्यांसदर्भात आज सर्वपक्षीय नेते सकाळी राज्यभवनात राज्यपालांची भेट घेणार आहेत. ते राज्यपालांकडे काय मागणी करतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोण कोण घेणार राज्यपालांची भेट ?

या भेटीमध्ये प्रामुख्याने विरोधी पक्षातील नेतेमंडळी असतील. भाजपचे सुरेश धस, स्वराज्य संघटनेचे अध्यक्ष संभाजीराजे भोसले, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर तसेच जितेंद्र आव्हाड, शिवसंग्रामच्या नेत्या ज्योती मेटे, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके, माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांचा त्यात समावेश आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us