‘भाजपचं मंगळसूत्र गळ्यात घातलं, नंतर शरद पवारांचा…’, नारायण राणे यांचे उद्धव ठाकरे यांना टोमणे

नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली. राणे यांनी उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख करत टीका केली. त्यांच्या या टीकेला आता शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून काही प्रतिक्रया देण्यात येते का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

भाजपचं मंगळसूत्र गळ्यात घातलं, नंतर शरद पवारांचा..., नारायण राणे यांचे उद्धव ठाकरे यांना टोमणे
Image Credit source: tv9
Chetan Patil | Updated on: May 12, 2023 | 7:37 PM

सातारा : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज साताऱ्यात जावून खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी राज्याच्या सत्तासंघर्षाच्या सुप्रीम कोर्टातील निकालावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सुप्रीम कोर्टाकडून काल महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालात आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय हा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवण्यात आला. तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर ठरवण्यात आली. तसेच तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर कडक शब्दांत ताशेरे ओढण्यात आले. यावर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या प्रतिक्रियेवर नारायण राणे यांनी टीका केली.

“विधानसभा अध्यक्षांना कालमर्यादा असते का? याचा अभ्यास करावा. उद्धव ठाकरे नावाला मुख्यमंत्री होते. ते फक्त दोन तास मंत्रालयात आले. त्यांनी कधी मातोश्री हे घर सोडलं नाही. त्यांना कायदा माहिती नाही. अध्यक्षाला टाईम लिमीट आहे का? मग काशाला बोलता की सुप्रीम कोर्टात जाणार? कुठल्याही कोर्टात जा”, अशी टीका नारायण राणे यांनी केली.

“उद्धव ठाकरेंनी राजीनामा देवून मुर्खपणा केला. ते त्यांनी स्वत: कबूल केलं. आम्ही असा काही अविचार करणार नाहीत. आम्हाला आहे ना, 2024 पर्यंतचा वेळ. आम्ही कार्यकाळ पूर्ण करु. उद्धव ठाकरे सांगतात तुम्ही राजीनामा द्या. यांना हे सांगण्याचे काय अधिकार आहेत?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

‘भाजपचं मंगळसूत्र गळ्यात घातलं आणि…’

“उद्धव ठाकरेंनी 2019च्या निवडणुकीवेळी भाजपचं मंगळसूत्र गळ्यात घातलं होतं. निवडणुकीला एकत्र लढले आणि निवडून आल्यानंतर शरद पवार यांचा हात धरला. ही नैतिकता आहे? नैतिकता नसलेल्या माणसाने बोलू नये. घरातच बसा”, अशी मिश्किल टीका नारायण राणे यांनी यावेळी केली.

“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुस्तकात उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काहीच ठेवलं नाही. तरीही ते म्हणतात की आपण शरद पवार यांच्यासोबत जाणार. आता कोणाबरोबर तरी जावं लागेल. कारण त्यांची ताकद आता राहिलीच नाही. मग जावंच लागेल ना?”, अशी खोचक टीका नारायण राणे यांनी केली.

यावेळी पत्रकारांनी नारायण राणे यांना बारसू रिफायनरी प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारला असता राणेंनी या प्रश्नाला उत्तर देणं टाळलं. “तुमचा पश्चिम महाराष्ट्राचा बारसूसोबत काय संबंध आहे हो? मी राजेंना क्रेडीट देतो की त्यांनी साताऱ्यात एकही प्रश्न शिल्लक ठेवला नाही. त्यामुळे तुम्ही कोकणात वळलात. मी कोकणात जातो”, असं मिश्किल उत्तर नारायण राणे यांनी दिलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us