कृष्णेला इतकं का छळलं जातंय? माशांची पुन्हा नदी काठावर येऊन श्वास घेण्यासाठी तडफड, धक्कादायक प्रकार समोर

| Updated on: Mar 16, 2023 | 9:32 PM

कृष्णा नदी किती प्रदुषित झालीय याचं ताजं उदाहरण आज पुन्हा बघायला मिळालं आहे, साताऱ्यात आज शेकडो मासे नदी काठावर आले. पाणी प्रदुषित झाल्यामुळे हे मासे श्वास घेण्यासाठी अक्षरश: तडफडताना दिसले.

कृष्णेला इतकं का छळलं जातंय? माशांची पुन्हा नदी काठावर येऊन श्वास घेण्यासाठी तडफड, धक्कादायक प्रकार समोर
Follow us on

सातारा : सांगली जिल्ह्यात भर उन्हाच्या तडाख्यात कृष्णा नदीच्या पात्रात शेकडो मासे मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेला सहा दिवस होत नाही तेवढ्यात सातारा जिल्ह्यात पुन्हा तशाच घटनेची पुनरावृत्ती झाल्याचं बघायला मिळत आहे. सातारा तालुक्यातील लिंब परिसरातील मर्ढे, साळवण, गोवे, वनगळसह परिसरातील इतर गावातील कृष्णा नदीच्या पात्रात हजारो मासे, खेकडे, इतर जलचरांचा मृत्यू होऊन ते आज पुन्हा पाण्यात तरंगताना दिसले. या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे. कृष्णा नदी इतकी दुषित कशी होऊ शकते? प्रशासनाचं लक्ष नाहीय का? प्रशासनाची जबाबदारी या प्रकरणात काहीच नाही का? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत. तसेच संबंधित प्रकार ज्यामुळे घडला त्या संबंधितांवर कारवाई होते का, ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लिंब परिसरातील मर्ढे, साळवण, गोवे, वनगळसह परिसरातील इतर गावातील कृष्णा नदीच्या पात्रात मळी सदृश्य रसायन मिसळल्याने नदीतील खेकडे, मोठ-मोठे मासे तसेच इतर जलचर या दुषित पाण्यामुळे भुलल्याने काठावर आले. यापैकी अनेक जलचर आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले. तर काही माशांचा मृत्यू झाल्यामुळे ते पाण्यावर तरंगत होते.

नदीतील मासे भुलून काठावर आले असल्याचे समजताच परिसरातील ग्रामस्थांसह युवकांनी मासे पकडण्यासाठी मोठी गर्दी केली.
ग्रामस्थ दुषित पाण्यामुळे नदीच्या काठावर आलेले मासे पकडून घरी खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात घेऊन गेले. दरम्यान या माशांमुळे ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या नदीमध्ये सध्या दुषित पाणी होण्यामागचे नेमके कारण काय? याचा तपास करण्याचे काम सध्या प्रशासन करत आहे.

हे सुद्धा वाचा

सांगलीतही असाच प्रकार

सांगलीत सहा दिवसांपूर्वी असाच प्रकार समोर आला होता. कृष्णा नदीच्या (Krushna river) पात्रात मेलेल्या माशांचा (Fish Death) खच आढळल्याने सांगली शहरात भर दुपारच्या वेळी (Sangli) मोठी खळबळ उडाली होती. दुपारी उन्हाच्या तडाख्यात मासे मृत्यूमुखी पडल्याचे पाहून अनेकांच्या पायाखालची जमीन सरकली. नागरिकांचं आरोग्य नदीच्या पाण्यामुळे धोक्यात असल्याचं अनेकांनी बोलून दाखवलं. काही मासे तडफडून मरत होते. त्यावेळी घटनास्थळी बघ्यांची अधिक गर्दी झाली होती. त्यावेळी काही नागरिक पाण्यात उतरले आणि तडफडणारे मासे ताब्यात घेतले.

मासे मृत्यू प्रकरणी सांगली प्रदूषण महामंडळाने कारवाईचा बडगा उगल्याची माहिती मिळाली आहे. अंकली येथील कृष्णा नदीतील मासे मृत्यू प्रकरणी सांगलीच्या दत्त इंडिया संचलित वसंतदादा साखर कारखान्याला प्रदूषण मंडळाने नोटील दिल्याची माहिती जाहीर करण्यात आली होती. दत्त इंडिया संचलित साखर कारखान्याचे मळी मिश्रित पाणी नदीत मिसळल्याने माशांच्या मृत्यूचा प्रकार उघडकीस आला. साखर कारखाना बंद का? करू नये याबाबत नोटीस बजावण्यात आली. सांगली महापालिकेलाही फौजदारी कारवाई करण्याची नोटीस बजावली आहे. प्रदूषण महामंडळ अधिकारी नवनाथ औताडे यांनी ही माहिती दिली आहे.