Shakti Act: महिला अत्याचाराविरुद्ध शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनातच मंजूर होणार, काय आहेत महत्त्वाच्या तरतुदी?

| Updated on: Dec 23, 2021 | 9:53 AM

आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रातही महिला अत्याचारांविरोधातला कठोर असा शक्ती कायदा सुधारणांसह विधीमंडळात सादर झाला आहे. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनातच कायद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

Shakti Act: महिला अत्याचाराविरुद्ध शक्ती कायदा हिवाळी अधिवेशनातच मंजूर होणार, काय आहेत महत्त्वाच्या तरतुदी?
Court
Follow us on

मुंबईः महिला सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा बहुचर्चित शक्ती कायदा (Shakti Act)  विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मंजुरीच्या अंतिम टप्प्यात आहे. राज्यात महिला आणि बालकांवरील अत्याचारांना आळा बसावा, यासाठी असलेल्या शक्ती या फौजदारी कायद्यात याआधी सुधारणा सूचवण्यात आल्या होत्या. संयुक्त समिती आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार बुधवारी यासंबंधीचा अहवाल विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात सादर करण्यात आला. सुधारीत कायद्यात शक्ती कायद्याची व्याप्ती वाढवण्यात आली आहे. बलात्कार (Rape case), अ‍ॅसिड हल्ला (Acid Attack) आणि सोशल मीडियातून महिला व बालकांबद्दल आक्षेपार्ह मजकूर आणि छायाचित्र प्रसिद्ध करून त्यांची बदनामी करणाऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद (Special Provisions) या कायद्यात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या शिक्षेच्या कक्षेत पुरुषांबरोबरच महिला आणि तृतीयपंथी यांनाही आणले गेले आहे.

कायद्यातल्या मुख्य तरतुदी कोणत्या?

– बलात्कार प्रकरणात संबंधित गुन्हेगाराला मृत्यूदंड किंवा सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.
– गुन्हा नोंदवल्याच्या 30 दिवसांच्या आत तपास पूर्ण करावा. जर 30 दिवसात तपास करणे शक्य नसेल तर पोलीस महानिरीक्षक किंवा पोलीस आयुक्तांना 30 दिवसांपर्यंत मुदतवाढ मिळेल.
– लैंगिक गुन्ह्याच्या बाबतीत न्यायालयीन चौकशी 30 दिवसात पूर्ण करण्यात येईल.
– पोलीस तपासाकरिता माहिती पुरवण्यात कसूर केल्याबाबत इंटरनेट किंवा मोबाइल टेलिफोन डाटा पुरवठादार यांना तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास किंवा 25 लाख रुपयांचा दंड किंवा दोन्ही शिक्षा देण्यात येतील.
– महिलांना फोन तसेच अन्य डिजिटल माध्यमातून धमकी दिल्याप्रकरणी शिक्षा ठोठावण्यात येईल. ही शिक्षा पुरुष, स्त्री किंवा तृतीयपंथी यांनाही देता येईल.
– लैंगिक गुन्ह्यांसंदर्भात खोटी तक्रार करणे किंवा त्याद्वारे एखाद्या व्यक्तीला जाणूनबुजून त्रास दिल्यास जामीनही मिळणार नाही.

अ‍ॅसिड हल्ल्यासारख्या गुन्ह्यांविरोधात विशेष तरतूद

अ‍ॅसिड हल्ला करणाऱ्या गुन्हेगाराला 15 वर्षांचा कारावास किंवा आजन्म कारावासापर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तसेच आर्थिक दंडाचीही तरतूद करण्यात येणार आहे. संबंधित पीडित महिलेला अ‍ॅसिड हल्ल्यामुळे करावा लागणारा वैद्यकीय उपचारांचा, प्लास्टिक सर्जरीचा खर्च याच दंडातून करण्याची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे.

कायद्याचा गैरवापर होऊ नये म्हणूनही तरतूद

अनेकदा अशा गुन्ह्यांच्या खोट्या तक्रारी दाखल केल्या जातात. अशा प्रकरणांवरही शक्ती कायद्यात चाप लावण्यात आला आहे. खोटी तक्रार केल्यास किंवा खोटी माहिती दिल्यास तक्रारदार व्यक्तीस कमीत कमी एक वर्ष किंवा जास्तीत जास्त तीन वर्षे तुरुंगवास तसेच 1 लाख रुपयांपर्यंत एवढ्या दंडाची तरतूद या कायद्यात करण्यात आली आहे. तसेच लैंगिक अपराधाबाबत खोटी तक्रार केल्यास तक्रारदारास शिक्षा होऊ शकेल, यामुळे निर्दोष मानहानीलाही आळा बसेल.

इतर बातम्या-

Railway canceled | दुष्काळात तेरावा…ऐन एसटी संपात भुसावळ विभागात मध्य रेल्वेच्या 18 गाड्या रद्द

जमीन खरेदीला वितुष्टांचे ग्रहण;  रजिस्ट्री रद्द होण्यासाठी ही परिस्थिती ठरु शकते कारणीभूत