पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातून लढण्यासाठी मोठी अट ?; शरद पवार गटाच्या अटीमुळे भुवया उंचावल्या

| Updated on: Apr 04, 2024 | 2:01 PM

महाविकास आघाडीने अजूनही साताऱ्याची जागा जाहीर केलेली नाही. शरद पवार गटाकडे साताऱ्याची जागा आहे. मात्र, शरद पवार गटाचे विद्यमान खासदार श्रीनिवास पाटील यांनी लढण्यास नकार दिल्यामुळे या मतदारसंघातून कुणाला उमेदवारी द्यायची असा पेच निर्माण झाला आहे. काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात असं सांगितलं जात आहे.

पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातून लढण्यासाठी मोठी अट ?; शरद पवार गटाच्या अटीमुळे भुवया उंचावल्या
पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातून लढण्यासाठी मोठी अट ?
Follow us on

शरद पवार गटाने अजून साताऱ्यातील उमेदवार जाहीर केलेला नाही. श्रीनिवास पाटील यांनी लढण्यास नकार दिल्यानंतर साताऱ्यातील पेच निर्माण झाला आहे. साताऱ्यासाठी शरद पवार गटातून तीन उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, ही जागा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना सोडण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा आहे. स्वत: पृथ्वीराज चव्हाण यांनीही साताऱ्यातून लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे साताऱ्याच्या जागेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतानाच एक वेगळीच बातमी आली आहे. साताऱ्यातून लढण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांना शरद पवार गटाने वेगळीच अट ठेवल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.

शरद पवार गटाचे नेते शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेचे अनेक अर्थ निघत आहेत. साताऱ्यासाठी पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव चर्चेत आहे. पण ते चिन्ह बदलून लढण्यास तयार नाहीत. पक्ष श्रेष्ठी जो काही निर्णय घेईल त्यासाठी आम्ही काम करू, असं शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना तुतारीवर निवडणूक लढण्याची ऑफर शरद पवार गटाकडून देण्यात आल्याचं अधोरेखित होत आहे.

श्रीनिवास पाटील यांनी पुन्हा एकदा नेतृत्व करावं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे. पण त्यांचं वय फार झाल्याने त्यांना व्यवस्थित चालता येत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलाला या मतदारसंघातून उमेदवारी मिळावी असा त्यांचा आग्रह आहे, अशी माहिती शशिकांत शिंदे यांनी दिली.

नक्कीच निवडणूक लढवेल

साताऱ्यात जेव्हा पोटनिवडणूद झाली तेव्हा श्रीनिवास पाटील हे गव्हर्नर म्हणून निवृत्त झाले होते. त्यावेळी देखील त्यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला होता, असं सांगतानाच मी शरद पवार यांचा एकनिष्ठ सैनिक आहे. संघर्ष हा माझा पिंड आहे. मी परिणामांचा विचार करत नाही. त्यामुळे विधानसभेत जे अपयश मिळालं ते लोकसभेत धुवून काढायचं असं सर्वांचं मत आहे. मला जर या ठिकाणी संधी मिळाली तर मी नक्कीच निवडणूक लढवेल, असंही त्यांनी सांगितलं.

ऐतिहासिक विजय मिळवू

सातारा हा शरद पवार यांच्या विचारांचा जिल्हा आहे. या जिल्ह्यात आमचं मताधिक्य अधिक आहे. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग या जिल्ह्यात आहे. त्यामुळे आम्ही या जिल्ह्यातून ऐतिहासिक विजय मिळवू. महाराष्ट्रात शेतकरी, माथाडी कामगार, कष्टकरी हे सगळे नाराज आहेत. महाराष्ट्रामध्ये एक वेगळा निकाल या लोकसभेमध्ये पाहायला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तिकीट का बदललं उत्तर द्या

सगळ्या पक्षांमध्ये घराणेशाही आहे. पण सगळ्यात जास्त घराणेशाही ही भाजप आणि भाजपच्या मित्र पक्षांमध्येच आहे. त्यांची जर यादी काढली तर लक्षात येईल. लोकसभेला जो निर्णय होईल तोच इतर निवडणुकीत होणार आहे. महायुतीमध्ये जे लोक गेले, त्यांनाच आज तिकीट मिळत नाहीये. इतर पक्षांना वापरायचं आणि आपला पक्ष मजबूत करायचा आणि मग त्यांना उचलून फेकून द्यायचं ही भाजपची नीती आहे. विद्यमान खासदारांचं तिकीट का बदलंलं याचं उत्तर महायुतीने द्यावं. आमदार, खासदार संभाळण्यासाठी जनतेचा पैसा खर्च केला जातोय, अशी टीका त्यांनी केली.