आता साई भक्तांना…; शिर्डीत साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, मूर्तीबाबतचा अहवाल समोर

साईबाबांच्या मूर्तीसाठी कोणत्या गोष्टी घातक ठरू शकतात? तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतर शिर्डी संस्थानने मूर्ती सुरक्षेसाठी मोठे बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. काय आहेत हे ५ महत्त्वाचे बदल, सविस्तर वाचा.

आता साई भक्तांना...; शिर्डीत साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय, मूर्तीबाबतचा अहवाल समोर
Shirdi Sai Baba
| Updated on: Feb 03, 2026 | 10:40 AM

शिर्डी येथील श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील जगप्रसिद्ध मूर्तीच्या झीज होण्याबाबत गेल्या काही काळापासून विविध चर्चा रंगत होत्या. या पार्श्वभूमीवर मूर्तीच्या संवर्धनासाठी आणि सद्यस्थिती तपासण्यासाठी नेमलेल्या तज्ज्ञ समितीने आपला सविस्तर अहवाल सादर केला आहे. साईबाबांची मूर्ती पूर्णपणे सुरक्षित असून तिला कोणताही धोका नाही, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. यामुळे भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मुंबईच्या ऐतिहासिक छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयातील तज्ज्ञ समितीने शिर्डीत येऊन मूर्तीची अत्यंत सूक्ष्म आणि तांत्रिक पाहणी केली होती. या समितीने सादर केलेल्या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. शिर्डीत साईबाबांची ही भव्य मूर्ती उच्च दर्जाच्या इटालियन मार्बलमध्ये साकारलेली आहे. हा दगड अत्यंत कठीण आणि टिकाऊ असल्याने नैसर्गिकरीत्या त्याची झीज होण्याची प्रक्रिया अत्यंत संथ असते. त्यामुळे ही मूर्ती पुढील अनेक दशके तशीच राहील, असे त्यांनी या अहवालात नमूद केले आहे.

मूर्तीची स्थिती उत्कृष्ट श्रेणीत मोडते. केवळ अफवांवर विश्वास न ठेवता वैज्ञानिक निकषांवर मूर्ती सुरक्षित असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे. मूर्तीवर काही ठिकाणी ज्या अतिसूक्ष्म खुणा दिसत आहेत, त्या दगडाच्या नैसर्गिक संरचनेचा भाग असू शकतात, मात्र त्यावर लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असेही तज्ज्ञ समितीने म्हटले आहे. तसेच या मूर्तीचे पावित्र्य आणि चकाकी कायम राखण्यासाठी तज्ज्ञांनी साईबाबा संस्थानला ५ महत्त्वाचे बदल सुचवले आहेत.

5 बदल कोणते?

  • केमिकल विरहित उपचार: दररोज पहाटे होणाऱ्या मंगलस्नानावेळी कोणत्याही रासायनिक द्रव्याचा किंवा साबणयुक्त पदार्थांचा वापर पूर्णपणे बंद करावा.
  • नैसर्गिक अर्पण: गंध, अत्तर आणि गुलाब जल अर्पण करताना ते पूर्णपणे नैसर्गिक असल्याची खात्री करावी. बाजारू उत्पादनांमधील ‘ऍसिडिक’ घटक मार्बलच्या थराला हानी पोहोचवू शकतात.
  • शुद्ध पाण्याचा वापर: स्नानासाठी वापरले जाणारे पाणी ‘सॉफ्ट वॉटर’ असावे. पाण्यातील क्षारांचे प्रमाण (Hardness) जास्त असल्यास मूर्तीच्या रंध्रांमध्ये क्षार साचून मूर्ती निस्तेज दिसू शकते.
  • सतत देखरेख: मूर्तीवर असलेल्या नैसर्गिक रेषा किंवा खुणांमध्ये काही बदल होतोय का, याचे डिजिटल रेकॉर्ड ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.
  • थंड प्रकाश व्यवस्था: गाभाऱ्यातील प्रकाश व्यवस्था ही उष्णता निर्माण करणारी नसावी. ‘कोल्ड एलईडी’ दिव्यांचा वापर करून मूर्तीवर थेट उष्णता पडणार नाही, याची काळजी घेण्यास सांगण्यात आले आहे.

तज्ज्ञ समितीने दिलेल्या या सकारात्मक अहवालामुळे साई भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मात्र, हा अहवाल केवळ दिलासा देणारा नसून तो भविष्यासाठी सतर्क करणाराही आहे. श्री साईबाबा संस्थानने या अहवालातील प्रत्येक तांत्रिक सूचनेची अत्यंत गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यानुसार, आता दररोजच्या पूजा-विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या द्रव्यांची गुणवत्ता तपासली जाणार असून, मूर्तीवर कोणत्याही प्रकारचा विपरीत परिणाम होणार नाही याची खात्री करण्यासाठी विशेष पथक तैनात केले जाण्याची शक्यता आहे.