Shivsena on MNS: मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’चे पठण करण्याचे नवे हिंदुत्व काही जणांनी जन्मास घातलंय, शिवसेनेची मनसेसह संघावरही टीका

| Updated on: Apr 16, 2022 | 7:54 AM

Shivsena on MNS: हिंदुत्व आणि भोंग्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने मनसे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला पितृभू आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू.

Shivsena on MNS: मशिदींसमोर भोंगे लावून हनुमान चालिसाचे पठण करण्याचे नवे हिंदुत्व काही जणांनी जन्मास घातलंय, शिवसेनेची मनसेसह संघावरही टीका
शिवसेनेची मनसेसह संघावरही टीका
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: हिंदुत्व आणि भोंग्याच्या मुद्द्यावरून शिवसेनेने (shivsena) मनसे (mns) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली आहे. सिंधू नदीपासून ते सागरापर्यंत पसरलेल्या या भूमीला पितृभू आणि पुण्यभूमी मानतो तो हिंदू. मग तो कुठल्याही जाती, धर्माचा का असेना! वीर सावरकरांच्या संकल्पनेतले हिंदुत्व हे असे होते. त्यांनी अहिंसेचा तिरस्कार केला, पण त्यांची अहिंसा शौर्याची व मर्दाची होती. तसे हिंदुत्व आज कोठे दिसते आहे? मशिदींसमोर भोंगे लावून ‘हनुमान चालिसा’चे पठण करणे हे नवे हिंदुत्व (hindutva) काही जणांनी जन्मास घातले आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे. अयोध्येत शिवसैनिक बाबरीचे घुमट पाडून राममंदिराची तयारी करत असताना ज्यांनी पळ काढला व जबाबदारी झटकली त्यांना आता फक्त हिंदुत्वाचे हे असे राजकारण करायचे आहे. वीर सावरकर व हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांचे हिंदुत्व मर्दानगीचे होते आणि त्याच मर्दानगीने अखंड हिंदू राष्ट्राचा विचार पुढे नेता येईल. सरसंघचालकांना त्यांच्या अखंड हिंदू राष्ट्रात नक्की काय हवे आहे, यावर एखादे चिंतन शिबीर व्हायला हवेच आहे, असा टोलाही शिवसेनेने लगावला आहे.

दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसे, भाजपसह संघालाही कानपिचक्या दिल्या आहेत. सगळ्यात पहिले म्हणजे चीन आणि पाकिस्तानने गिळलेला तिबेट, कश्मीरचा भूभाग सोडवून घ्यायला हवा. बांगलादेशही भारताचाच भाग होता. पुन्हा पुराण काळातल्या भारतवर्षात अफगाणिस्तान, नेपाळ, भूतान, म्यानमार आणि श्रीलंकाही आपलाच प्रदेश होता. नेपाळ हे सीतामाईचे माहेर, तर प्रभू श्रीरामाने श्रीलंकेवर स्वारी करून तो देश जिंकला होता. आता हा सर्व भाग जिंकून पंधरा वर्षांत अखंड भारताचे स्वप्न साकार होणार असेल तर त्या विचारांचे व योद्ध्यांचे स्वागत करावेच लागेल. फक्त त्याआधी कश्मीर खोऱ्यात पंडितांची घरवापसी करावी लागेल व गलवान व्हॅलीत घुसलेल्या चिनी सैनिकांना बाहेर काढावे लागेल. मग अखंड हिंदू राष्ट्राचा झेंडा फडकायला किती वेळ लागणार?, असा सवाल शिवसेनेने केला आहे.

अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय?

  1. सरसंघचालक हे नेहमीच आदरणीय व्यक्तिमत्त्व राहिले आहे. सरसंघचालक काय बोलतात, काय करतात यावर देशाचे लक्ष असते. म्हणूनच सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी हरिद्वार मुक्कामी अखंड हिंदू राष्ट्राची जी संकल्पना मांडली त्यावर चर्चा सुरू झाली आहे. आम्ही अहिंसेचा पुरस्कार करतो. त्यामुळे अखंड भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याच मार्गाने पुढे जाणार आहोत. मात्र आमच्या हातात दंडुके असतील.
  2. पूज्य सरसंघचालक पुढे सांगतात, ”हिंदू राष्ट्र हाच सनातन धर्म आहे. संत आणि ज्योतिष्यांच्या मते 20 ते 25 वर्षांत पुन्हा एकदा अखंड भारत तयार होईल.” सरसंघचालकांनी अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नाला पुन्हा पंख लावले आहेत. अखंड भारत कोणाला नको आहे? राहुल गांधी यांनाही झोपेतून उठवले व अखंड भारताविषयी विचारले तर तेही सांगतील, हिंदुस्थानच्या सीमा आणि व्याप्ती वाढायला हवी.
  3. आता सरसंघचालकांच्या कल्पनेतील अखंड हिंदुस्थान नक्की कसा असेल? अखंड भारताचा विषय आला की, फक्त पाकव्याप्त कश्मीर पुन्हा मिळवायचे या विचारांपुढे मजल जात नाही. वीर सावरकरांसारखे नेते संपूर्ण पाकिस्तान परत आणल्याशिवाय हिंदू राष्ट्राचे स्वप्न पूर्ण होणार नाही, या मताचे होते.
  4. अखंड भारताचा प्रश्न निघालाच आहे म्हणून सांगायचे ते असे की, दोन वर्षांपासून चीनचे सैन्य लडाखमध्ये घुसून बसले आहे व त्या भागात आपले सैन्य पेट्रोलिंगलाही जाऊ शकत नाही. चीनच्या ताब्यातील हा भूभाग पुन्हा घेऊन अखंड हिंदू राष्ट्राचे श्रीफळ वाढवायला हवे व त्या कार्याच्या मागे संपूर्ण देश उभा राहील. सरसंघचालकांची भूमिका स्पष्ट आणि सडेतोड आहे. मोदी सरकारने त्या स्पष्ट भूमिकेचा विचार केलाच पाहिजे.

संबंधित बातम्या:

Nana Patole on RSS : देश तोडून अखंड भारत कसा साकार होईल?, सरसंघचालकांच्या वक्तव्यानंतर नाना पटोलेंचा सवाल

पाच कारणं ज्याच्यामुळे कोल्हापूर उत्तरची निवडणूक महत्त्वाची आहे; वाचा ग्राऊंड रिपोर्ट

कसा आहे कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ; आजवर कुठल्या पठ्ठ्यानं गाजवलं कोल्हापूर उत्तरचं मैदान?