
नाशिकमधील तपोवन परिसरातील प्रस्तावित वृक्षतोडीवरून सध्या राजकारण चांगलेच तापले आहे. येत्या २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्राम उभारणीसाठी सुमारे १७०० ते १८०० झाडे तोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या प्रशासनाच्या निर्णयाला पर्यावरणप्रेमी, विविध संघटना आणि राजकीय नेत्यांकडून तीव्र विरोध होत आहे. तपोवनमधील वृक्षतोड प्रकरणावर भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी प्रतिक्रिया देताना टीका केली होती. तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत, असे नितेश राणे यांनी म्हटले आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाने नितेश राणे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी एक ट्वीट केले आहे. अखिल चित्रे यांनी या मुद्द्यावर ट्वीट करत वृक्षतोडीचा विषय धर्माचा नसून पर्यावरणाचा असल्याचे स्पष्ट मत मांडले आहे. वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे धर्माचा नाही. टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? त्याच्या सिस्टीममध्ये तर हिंदू-मुस्लीम बकरा-कोंबडीच फिरतात, वृक्षतोडची फाईल तर ‘unsupported format’ म्हणूनच उघडत नाही, अशा शब्दात अखिल चित्रे यांनी सडकून टीका केली.
वृक्षतोड हा पर्यावरणाचा विषय आहे धर्माचा नाही.
टिल्लू-स्तराची बुद्धी असलेल्याला वृक्षतोडसारखा गंभीर विषय कुठून समजणार? टिल्लू-लेव्हल बुद्धीत वृक्षतोड बसणार तरी कुठे? त्याच्या सिस्टीममध्ये तर हिंदू-मुस्लीम बकरा-कोंबडीच फिरतात,वृक्षतोडची फाईल तर ‘unsupported format’ म्हणूनच उघडत…
— Akhil Chitre अखिल चित्रे (@akhil1485) December 5, 2025
नितेश राणे यांनी याच मुद्द्यावरुन ट्वीटरवर एक पोस्ट केली होती. तपोवनमधील वृक्षतोडीची चिंता करणारे पर्यावरणवादी कधीच ईदच्या वेळी बकरी कापण्याला विरोध करताना दिसत नाहीत. तेव्हा गप्प का? सर्व धर्म सम भाव? असे विधान नितेश राणे यांनी केले होते. तपोवनमधील वृक्षतोडीचा मुद्दा तापलेला असतानाच नितेश राणे यांच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.
नाशिक महापालिका प्रशासनाने २०२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधू-महंतांच्या निवास आणि सोयी-सुविधांसाठी तपोवनातील सुमारे ५४ एकर जागेवरील झाडे तोडण्याची तयारी दर्शवली आहे. या निर्णयाला अभिनेते सयाजी शिंदे यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी, कलावंत आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध करत आंदोलन पुकारले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्या भूमिकेचे समर्थन करत प्रशासनाने यावर समोपचाराने तोडगा काढावा, असे आवाहन केले आहे.
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही यावर भाष्य केले आहे. २०१५-१६ च्या गुगल मॅपनुसार त्या ठिकाणी कोणतीही झाडे नव्हती. महाराष्ट्र शासनाच्या ५० कोटी वृक्ष लागवड कार्यक्रमांतर्गत ती झाडे लावण्यात आली होती आणि आता तिथे साधुग्राम करता येत नाही कारण वृक्षांची दाटी झाली आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच विरोधकांनीही या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली आहे. पर्यायी जागा उपलब्ध असतानाही त्याच ठिकाणी वृक्षतोड करण्याचा अट्टहास का, असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.