सिंधुदुर्गः सिंधुदुर्ग जिल्ह्यातला ओसरगाव (Osargaon, Sindhudurg) येथील पहिला टोल नाका ( first toll gate)उद्यापासून सुरू (Start) करण्यात येणार आहे. रंगीत तालीम म्हणून आज दुपारी अचानक हा टोल नाका सुरू करण्यात आला आहे. मात्र महामार्गाची कामे प्रलंबित असताना टोल सुरू करण्याची घाई का असा सवाल करत अनेक वाहनचालकांनी टोल कर्मचाऱ्यांशी हुज्जत घातली. टोल नियमित सुरू होण्याआधीच ओसरगाव येथील हा टोल नाका वादग्रस्त ठरला आहे.
माजी आमदार आणि मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी ही टोल घेण्यास विरोध दर्शविला होता. भाजपचे आमदार नितेश राणेंनी ही महामार्गाचे काम प्रलंबित असताना टोल घेतला गेल्यास आपला विरोध असल्याचे स्पष्ट केले आहे.
वाढता विरोध पाहून अखेर सायंकाळी टोल घेण्याची ही रंगीत तालीम थांबविण्यात आली. मात्र उद्यापासून टोल घेण्यास सुरवात झाली तर सिंधुदुर्गवासीय व लोकप्रतिनिधी काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राष्ट्रीय महामार्गाची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत तरीही टोल नाका मात्र सुरू करण्यात आला आहे. उद्या, शुक्रवारपासून कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोलनाक्यावरून ही टोलवसुली सुरु करण्यात येणार असल्याची माहिती ठेका मिळालेल्या एम. डी. करीमुनिसा कंपनीकडून देण्यात आली आले आहे. त्यामुळे आता वाहनधारक आणि स्थानिक राजकीय नेत्यांकडून काय भूमिका घेतली जाणार असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे.
राष्ट्रीय महामार्ग 66 ची अनेक कामे अद्याप अपूर्णावस्थेत आहेत मात्र असे असताना ओसरगाव टोलनाक्यावरून उद्यापासून टोलवसुली सुरू होत आहे. त्याबाबत वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या मार्गावरची अनेक कामं रेंगाळली आहेत. त्यामुळे ती पूर्ण करुनच टोल नाका सुरु करण्याची मागणी वाहनधारकांना होणार आहे. या टोलनाक्यामुळे कोकणात जाणाऱ्यांच्या खिशाला फटका बसणार आहे.