अखेर शेतकऱ्यांसाठी अण्णा हजारे मैदानात; 30 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात

| Updated on: Jan 28, 2021 | 10:27 PM

सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता उरलेली नाही. त्यामुळे मी येत्या 30 तारखेपासून उपोषणाला बसणार आहे. | Anna Hazare

अखेर शेतकऱ्यांसाठी अण्णा हजारे मैदानात; 30 जानेवारीपासून उपोषणाला सुरुवात
अण्णा हजारे यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यामध्ये अण्णा हजारे यांनी आपल्या समर्थकांना आपापल्या शहरात आणि गावात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे.
Follow us on

अहमदनगर: भाजपच्या नेत्यांनी अगदी शेवटपर्यंत मनधरणी करुनही ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी शेतकऱ्यांच्या (Farmers) मागण्यांसाठी उपोषणाला बसण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार आता अण्णा हजारे 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धी येथे उपोषणाला सुरुवात करतील. अण्णा हजारे यांनी गुरुवारी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. यामध्ये अण्णा हजारे यांनी आपल्या समर्थकांना आपापल्या शहरात आणि गावात शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करण्याचे आवाहन केले आहे. (Anna Hazare says he will begin a protest from January 30 for farmers demand)

गेल्या चार वर्षांपासून मी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आंदोलन करत आहे. यासंदर्भात मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही पत्रव्यवहार केला. मात्र, केंद्र सरकार शेतकऱ्यांसाठी योग्य निर्णय घेताना दिसत नाही. सरकारला शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता उरलेली नाही. त्यामुळे मी येत्या 30 तारखेपासून उपोषणाला बसणार असल्याचे अण्णा हजारे यांनी जाहीर केले आहे.

भाजप नेत्यांकडून सहावेळा समजूत

अण्णांनी उपोषण करू नये म्हणून भाजपच्या नेत्यांकडून जोरदार प्रयत्न करण्यात आले. भाजपचे आमदार गिरीश महाजन यांनी गुरुवारी सहाव्यांदा अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. दिल्लीत झालेल्या बैठकीचा एक ड्राफ्टही अण्णांना देण्यात आला. मात्र तरीही अण्णांनी आपण उपोषणावर ठाम असल्याचे सांगितले होते.

काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार गिरीश महाजन यांनी राळेगणसिद्धीत जाऊन अण्णांची भेट घेतली होती. मात्र, अण्णा हजारे यांच्या निर्णयामुळे भाजपच्या ही संपूर्ण शिष्टाई मोहीम अयशस्वी ठरली आहे.

तर केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णांना भेटतील

अण्णांच्या प्रकृतीची पंतप्रधानांपासून देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत सर्वांनाच काळजी आहे. अण्णांचं वय पाहता त्यांनी उपोषण करू नये, असं सर्वांनाच वाटतं. त्यामुळे वेळ पडल्यास केंद्रीय कृषी राज्यमंत्री अण्णांना भेटायला येऊ शकतील. उद्या अंतिम पत्र घेऊन आम्ही परत राळेगणला येऊ. त्यामुळे अण्णांवर उपोषण करण्याची वेळ येणार नाही, असे गिरीश महाजन यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

‘संकटमोचक’ गिरीश महाजन अण्णांच्या भेटीला, शेतकरी आंदोलनात न उतरण्यासाठी भाजपची डिप्लोमसी?

भाजपला अण्णांची भीती?, बागडे राळेगणसिद्धीत; दीड तास खलबतं

यावेळी हनुमानाला जास्त त्रास झाला, दिल्लीतही एवढा त्रास झाला नव्हता : गिरीश महाजन

(Anna Hazare says he will begin a protest from January 30 for farmers demand)