Bhim army : दोन दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात करा, नाहीतर..; भीम आर्मीचा इशारा, सोलापूर महापालिकेच्या गेटवर टायर जाळण्याचा प्रयत्न

जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांनी दिला आहे.

Bhim army : दोन दिवसांत रस्त्याच्या कामाला सुरुवात करा, नाहीतर..; भीम आर्मीचा इशारा, सोलापूर महापालिकेच्या गेटवर टायर जाळण्याचा प्रयत्न
रस्त्याप्रश्नी आंदोलन करताना भीम आर्मीचे कार्यकर्ते
Image Credit source: tv9
| Updated on: Aug 06, 2022 | 11:08 AM

सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते सम्राट चौकापर्यंतचा रस्ता (Road) खोदून सहा महिने झाले तरीही तो पूर्ववत करण्यात आलेला नाही. त्यामुळे भीम आर्मीच्या पदाधिकाऱ्यांनी सोलापूर महापालिकेच्या (Solapur municipal corporation) गेटवर टायर जाळण्याचा प्रयत्न केला. महापालिका प्रशासन खोदलेले रस्ते पुन्हा दुरूस्त करत नसल्याने महापालिकेचा कारभाराच्या निषेधार्थ कार्यकर्ते संतप्त झालेले पहायला मिळाले. दरम्यान, टायर झाळण्याआधीच पोलिसांनी कार्यकर्त्यांकडून टायर जप्त करत भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते सम्राट चौकापर्यंत दोन वर्ष झाले रस्ता नाही, तिथे काय माणसे राहत नाहीत काय, असा सवाल भीम आर्मीच्या (Bhim army) वतीने करण्यात आला आहे. महापालिकेच्या कारभार आणि कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह यावेळी उपस्थित करण्यात आले आहे.

‘आंदोलन सुरूच राहणार’

सोलापूर महापालिकेतील कर्मचारी बुधवार पेठ परिसरातील आहेत. महापालिकेतील टॅक्स जोपर्यंत भरला जात नाही, तोवर कर्मचाऱ्यांचे पगार थांबवले जातात. या कर्मचाऱ्यांचे पगार थकवून टॅक्स घेवून महापालिका चालवली जाते. त्या लोकांना रस्ते नाहीत, सुविधा नाहीत. हा भेद कशासाठी? बुधवार पेठ परिसरात कुणी विचारणार नाही म्हणून, असे म्हणत प्रशासनाने हे विसरू नये, की त्याठिकाणी भीम आर्मी आहे. जोपर्यंत रस्ता होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा भीम आर्मीचे शहराध्यक्ष अजय मैंदर्गीकर यांनी दिला आहे.

दोन दिवसांचा अवधी

दोन दिवसांचा अल्टिमेटम महापालिका आयुक्तांना आम्ही देत आहोत. आंदोलन अधिक चिघळू नये, याकरिता महापालिका आयुक्तांनी लवकरात लवकर रस्ता करण्याचे आदेश द्यावेत. दरम्यान, महापालिका आयुक्त यांच्या निषेधार्थ आज टायर जाळून आम्ही आंदोलन करणार होतो. सामान्य जनतेला कोणताही त्रास देण्याचा हेतू नाही. मात्र, पोलिसांनी आम्हाला अडवले. त्यामुळे दोन दिवसांचा अवधी आम्ही पालिका प्रशासनाला देत आहोत. दोन दिवसात रस्त्याच्या कामाला सुरुवात न केल्यास महापालिका आयुक्तांसमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीतर्फे देण्यात आला आहे.

Follow Us