महाराष्ट्रात लव्ह जिहाद विरोधात कडक कायदा होणार? राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचं मोठं विधान
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा होणार का? या मुद्द्यावर मोठं विधान केलंय.
सोलापूर : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लव्ह जिहाद विरोधात कायदा होणार का? या मुद्द्यावर मोठं विधान केलंय. लव्ह जिहादच्या कायद्याबाबत राज्य महिला आयोगातील सदस्यांशी चर्चा करून त्या पद्धतीची शिफारस राज्य सरकारला करू, असं विधान रुपाली चाकणकर यांनी केलं आहे. त्यामुळे लव्ह जिहाद विरोधात राज्यात कडक कायदा तयार करण्यासाठी हालचाली सुरु झाल्यात की काय? अशा चर्चांना उधाण आलंय.
“लव्ह जिहाद कायदा व्हावा अशी कोणतीही मागणी राज्य महिला आयोगाला प्राप्त झालेली नाही. पण ज्या तक्रारी आयोगाकडे येतात त्यामध्ये तक्रारदार अशा पद्धतीचा कायदा व्हावा असं नमूद करतात”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
“कोणताही कायदा करताना आपण विचार विनिमय करून किंवा समिती नेमून कायदा करत असतो. त्यामुळे माझ्यासोबत असलेल्या सदस्यांसोबत चर्चा करून त्यापद्धतीची शिफारस राज्य सरकारला करू”, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
दरम्यान, रुपाली चाकणकर यांनी श्रद्धा वालकर हत्या प्रकरणावरही प्रतिक्रिया दिली. “श्रद्धा वालकरची हत्या ही निंदनीय असून माणुसकीला काळीमा फसणारी आहे. या घटनेची तात्काळ दखल घेऊन राज्य महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहिलं आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
“या घटनेचा तपास आणि सुनावणी फास्टट्रॅक कोर्टामध्ये व्हावा आणि आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी पत्राद्वारे केलीय”, अशी माहिती त्यांनी दिली.
“पुन्हा एखादी श्रद्धा वालकर होऊ नये यासाठी राज्यातील सर्व बेपत्ता मुलींच्या संदर्भात युद्ध पातळीवर काम करत आहोत. राज्य महिला आयोगाच्या वतीने एक समिती नेमून मिसिंग मुलींना ट्रेस करून पाठपुरावा केला जाईल”, अशी महत्त्वाची माहिती त्यांनी दिली.