मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांचा (Maharashtra corona update) आकडा 40 हजारांच्या पुढे गेला होता, त्यामुळे राज्यावर पुन्हा लॉकडाऊनची टांगती तलवार होती. सोबतच ओमिक्रॉनचाही (Omicron Update) कहर सुरूच होता, त्यामुळे डबल टेन्शन वाढले होते. तर दुसरीकडे मुंबई पुन्हा धडकी भरवत होती, कारण एकट्या मुंबईतली कोरोना रुग्णसख्या 20 हजारांच्या पुढे पोहोचली होती. त्यामुळे निर्बंधांबाबत उपमुख्यमंत्र्यांपासून आरोग्यमंत्र्यांपर्यंत सर्वांकडून कडकडीत इशाराही देण्यात आला होता. पण आता काहीसा दिलासा मिळताना दिसतोय. आज राज्यातल्या रुग्णसंख्येतली घट मोठी जरी नसली तरी, आज राज्यातल्या कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या खाली आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. आज राज्यात एकूण 39 हजार 207 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गेल्या 24 तासात 53 कोरोना रुग्णांच्या मृत्युची नोंद झाली आहे, त्यामुळे काहीशी चिंता वाढली आहे. कारण आजच्या मृतांचा आकडा रोजच्या तुलनेत जास्त आहे.
मुंबईतली कोरोना रुग्णांची घट कायम
20 हजारांच्या वाढीच्या पुढे पोहोचलेली मुंबई आता सातत्याने अटोक्यात येताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची घट कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता काहीशी कमी झाली आहे. मुंबईत आज 6 हजार 149 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 12 हजार 810 रुग्ण बरे होऊन परतले आहेत. त्यामुळे मुंबईला काहीसा दिलासा मिळताना दिसत आहे.
#CoronavirusUpdates
18th January, 6:00pmPositive Pts. (24 hrs) – 6149
Discharged Pts. (24 hrs) – 12810Total Recovered Pts. – 9,48,744
Overall Recovery Rate – 94%
Total Active Pts. – 44084
Doubling Rate – 61 Days
Growth Rate (11 Jan – 17 Jan)- 1.10%#NaToCorona
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 18, 2022
दिवसभरात एकही ओमिक्रॉनचा रुग्ण नाही
आज राज्यात एकही नवीन ओमिक्रॉन रुग्ण आढळलेला नाही, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आजपयंत राज्यात एकूण 1 हजार 860 ओमिक्रॉन बाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यातले निम्म्यापेक्षा जास्त रुग्ण बरे होऊन घरी परतल्याने प्रशासनाची चिंता कमी झाली आहे. गेल्या काही दिवसात कोरोनाचा कहर वाढल्याने राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊन लागतो की काय? अशी भिती वाटत असताना ही घटणारी रुग्णसंख्या काहीशी उसंत देणारी आहे. मात्र अजून कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजारांच्या जवळ आहे, पुन्हा कडक निर्बंध टाळायचे असतील तर लोकांकडून नियमांचे काटेकोर पालन होणे गरजेचे आहे.