शरद पवार यांच्यानंतर जयंत पाटलांचंही मोठं वक्तव्य; विधानसभा अध्यक्षपद नक्की कुणाला?

| Updated on: Feb 05, 2021 | 6:38 PM

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विधानसभा अध्यक्षपद आता मोकळं झालं असल्याचं विधान केलं आहे. (speaker of maharashtra legislative assembly post open for all says jayant patil)

शरद पवार यांच्यानंतर जयंत पाटलांचंही मोठं वक्तव्य; विधानसभा अध्यक्षपद नक्की कुणाला?
एकनाथ खडसे साहेबांच्या हस्ते या धरणाचे भूमीपूजन झाले आणि त्यांच्याच हस्ते या धरणाचे उद्घाटन केले जाईल, अशी ग्वाहीदेखील त्यांनी यावेळी दिली.
Follow us on

यवतमाळ: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यापाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही विधानसभा अध्यक्षपद आता मोकळं झालं असल्याचं विधान केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही विधानसभा अध्यक्षपदावर दावा केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद नक्की कुणाला मिळणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. (speaker of maharashtra legislative assembly post open for all says jayant patil)

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आज यवतमाळ आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद मोकळे झाले आहे. त्यावर पुढील काळात चर्चा होईल, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. तर काँग्रेसने उपमुख्यमंत्रीपद मागितल्याचं ऐकलेलं नाही. तशी काँग्रेसकडून मागणीही करण्यात आलेली नाही, असंही त्यांनी सांगितलं.

तटबंदी चीन-पाकिस्तान सीमेवर हवी होती

यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं. जे काम पाकिस्तान आणि चीन सीमेवर व्हायला हवं होतं. ते दिल्लीतील सीमांवर शेतकऱ्यांना अडवण्यासाठी होत आहे. चीन आणि पाकिस्तानच्या सीमेवर तटबंदी उभारली पाहिजे होती. तिकडे बॅरिकेट्स लावायला हव्या होत्या. पण केंद्र सरकार दिल्लीच्या सीमांवर या गोष्टी करत आहे, अशी टीका त्यांनी केली.

… तर मोदींचं अभिनंदन केलं असतं

शेतकऱ्यांना त्यांचे भविष्य अंधारात गेले असे वाटत आहे. त्यामुळे त्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. देशाचा नेता खिळे ठोकून आपल्याभोवती संरक्षण करून घेतोय. मोगल बादशहा बहादूर शहा जफर यांने स्वत: भोवती तटबंदी केली होती. त्याला मराठा सैन्याने भेदलं होतं. आता देशाचा बादशहाच हे करतोय, हेच काम मोदींनी देशाच्या सीमेवर केलं असतं तर आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं, असा टोलाही त्यांनी लगावला.

काय म्हणाले होते पवार?

शरद पवार यांनी काल प्रसारमाध्यमांशी बोलताना महत्त्वाचं विधान केलं होतं. काँग्रेस पक्षांतर्गत दबाव असल्याने अध्यक्ष बदलाचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष बदलताना काँग्रेसने आमच्याशी चर्चा केली होती. अध्यक्षपद तिन्ही पक्षाचं असल्याने आता ते खुलं झालं आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष कोण असणार? यावर पुन्हा चर्चा होणार आहे, असं पवारांनी स्पष्ट केलं होतं. पवारांनी अत्यंत मोजक्याच शब्दात पण अत्यंत मुद्देसुद भाष्य केलं होतं. जयंत पाटलांनीही पवारांचीच री ओढल्याने विधानसभा अध्यक्षपदावरून आघाडीत घमासान होणार असल्याचं बोललं जात आहे. (speaker of maharashtra legislative assembly post open for all says jayant patil)

काँग्रेस-राष्ट्रवादीत जुंपणार?

विधानसभा अध्यक्षपदामध्ये शिवसेनेला काहीच स्वारस्य नाही. त्यामुळे शिवसेना नेते त्यावर प्रतिक्रियाही देत नाहीत. मात्र, राष्ट्रवादीला या पदात स्वारस्य असल्याने त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देऊन काँग्रेसवर आणि पर्यायाने मुख्यमंत्र्यांवरही दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून ताणून धरून अधिकचं मंत्रिपद पदरात पाडून घेण्याची ही पॉवर फुल खेळी असल्याचं राजकीय निरीक्षकांचं म्हणणं आहे. (speaker of maharashtra legislative assembly post open for all says jayant patil)

 

संबंधित बातम्या:

नाना पटोलेंच्या राजीनाम्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज?

अजित पवार पुन्हा नॉट रिचेबल होण्याची वेळ आली; निलेश राणेंकडून राजकीय भूकंपाचा इशारा?

पवारांचे फक्त तीन वाक्य आणि ठाकरे सरकारमध्ये पूर्ण उलथापालथीचे संकेत?; वाचा सविस्तर

(speaker of maharashtra legislative assembly post open for all says jayant patil)