कोल्हापूरच्या धर्तीवर नाशिकमध्ये काय आहे मागणी? स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाने पाडले बंद…

पेट्रोल आम्हाला 110 रुपयाने इथेनॉल मिक्स करून विकतात आणि आमच्या कडून इथेनॉल सरासरी 60 रुपयांनी खरेदी करतात हा कुठला न्याय..? असा सवाल ही उपस्थित करण्यात आला आहे.

कोल्हापूरच्या धर्तीवर नाशिकमध्ये काय आहे मागणी? स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाने पाडले बंद...
Image Credit source: TV9 Network
| Updated on: Nov 17, 2022 | 2:07 PM

नाशिक : संपूर्ण राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊसाच्या वजनात काटेमारी केली जात आहे या काटेमारीच्या विरोधामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आवाज उठवला. महाराष्ट्रातील संपूर्ण साखर कारखान्यांचे काटे हे ऑनलाईन झाले पाहिजे. यासाठी साखर आयुक्त कार्यालयावर मोठा मोर्चा निघाला .या मोर्चाचा धसका घेऊन साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व साखर कारखान्याचे काटे ऑनलाईन करण्याचा निर्णय घेतला. परंतु एक रक्कमी एफ आर पी आणि इतर मागण्यांसाठी शेतकऱ्यांची एकजूट दाखवणे गरजेचे आहे. म्हणून 17 आणि 18 नोव्हेंबरला संपूर्ण राज्यामध्ये स्वाभिमानीच्या नेतृत्वामध्ये ऊसतोड बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. आज नाशिक जिल्ह्यात या आंदोलनाला शेतकरी आणि कारखान दारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. कादवा सहकारी साखर कारखान्याच्या गेटवर स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांच्या नेतृत्वात ऊस बंद आंदोलन करण्यात आले होते.

नाशिक जिल्ह्यातील कादवा व वसाका या साखर कारखान्यांनी या आंदोलनाला अधिकृत पाठिंबा देऊन दोन दिवस ऊस तोडणी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला.

आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला असला तरी इतर साखर कारखान्यांनी अधिकृत पाठिंबा दर्शविला नाही. तरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ऊस तोडी न घेतल्यामुळे नाशिकचे साखर कारखाने ठप्प झाले आहे.

शेतकऱ्यांना ऊसाच्या मिळणाऱ्या पैशाचे तुकडे करण्याचा घाट केंद्र आणि राज्य सरकार यांनी संगनमताने घातला असल्याचा आरोप शेतकरी संघटना करीत आहे.

पेट्रोल आम्हाला 110 रुपयाने इथेनॉल मिक्स करून विकतात आणि आमच्या कडून इथेनॉल सरासरी 60 रुपयांनी खरेदी करतात हा कुठला न्याय..? असा सवाल ही उपस्थित करण्यात आला आहे.

साखर ही अन्नधान्यासारखी जीवनश्याक वस्तू नाही म्हणून तिची निर्यात खुली करणे गरजेची आहे. काटेही ऑनलाईन करावे अशी मागणी यावेळी नाशिकमध्येही करण्यात आली.

परंतु सत्ताधारी आणि विरोधक हे एकमेकांवर राजकीय चिखल फेक करण्यातच गुंग असून त्यांना सामान्य जनतेचे प्रश्न सोडवण्यात रस नाही अशी टीका शेलक्या शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष संदीप जगताप यांनी केली आहे.