पीक विम्याबाबत राज्य सरकारचं केंद्राला पत्र; शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, ‘सह्याद्री’वरील बैठकीत शरद पवारांची सूचना

| Updated on: Jul 15, 2021 | 6:32 PM

सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दादा भुसे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली.

पीक विम्याबाबत राज्य सरकारचं केंद्राला पत्र; शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, सह्याद्रीवरील बैठकीत शरद पवारांची सूचना
पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत राज्य सरकारचं केंद्राला पत्र
Follow us on

मुंबई : पंतप्रधान पीक विम्याबाबत आठवडाभराची मुदत वाढवा, अशी विनंती राज्य सरकारकडून केंद्र सरकारला करण्यात आली आहे. तशी माहिती कृषीमंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. सह्याद्री अतिथीगृहावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत दादा भुसे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री आदिती तटकरे उपस्थित होत्या. पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत शेतकरी प्रश्नावर चर्चा झाली. त्यात पवारांनी महत्वाच्या सूचना दिल्याची माहिती भुसे यांनी दिलीय. (State Government’s letter to the Central Government seeking extension of the PM Crop Insurance Scheme)

शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्या, अशी सूचना शरद पवार यांनी दिल्याचं दादा भुसे यांनी सांगितलं. तसंच फलोत्पादकांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. निर्यातदार यांच्याही तक्रारी होत्या, असं दादा भुसे यांनी म्हटलंय. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना संकटाच्या काळात उत्तम काम केलं आहे. एका वडिलांप्रमाणे त्यांनी भूमिका निभावली आहे. त्यामुळेच ते लोकप्रीय मुख्यमंत्री ठरल्याचं दादा भुसे यांनी म्हटलंय. तसंच आमच्याकडे संख्याबळ आहे. त्यामुळे मतदान गुप्त किंवा आवाजी असलं तरी आम्ही घाबरत नाही, असा टोलाही भुसे यांनी फडणवीसांना लगावलाय.

शरद पवारांच्या सूचना

बैठकीत मार्गदर्शन करताना खासदार शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात फलोत्पादनवाढीला व फळनिर्यातीला प्रचंड संधी आहे. राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात एक स्वतंत्र फळपिक जिल्ह्याचं वैशिष्ट्यं म्हणून विकसित करता येईल. फलोत्पादन व उत्पन्न वाढीसाठी जागतिक स्तरावरील उत्कृष्ट वाण शेतकऱ्यांना उपलब्ध झाले पाहिजेत. यासाठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी. फळांना राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यासाठी, ब्रॅन्डिंग निर्माण करण्यासाठी, फळप्रक्रिया उद्योग उभारण्यास शासनाने मदत करावी. फळनिर्यातदारांची फसवणूक टाळण्यासाठी यंत्रणा कार्यक्षम करावी, आदी सूचनाही खासदार शरद पवार यांनी केल्या आहेत.

‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’

‘महाराष्ट्रातील फलोत्पादन क्षेत्र : वस्तुस्थिती, संधी आणि दिशा’ या विषयावर सह्याद्री अतिथिगृहात, खासदार शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीला कृषीमंत्री दादाजी भुसे, फलोत्पादनमंत्री संदिपान भुमरे, फलोत्पादन राज्यमंत्री आदिती तटकरे, पणन विभागाचे प्रधान सचिव अनुपकुमार, कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त धीरजकुमार, पोक्राच्या प्रकल्प संचालक इंद्रा मालो. सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्सचे विलास शिंदे आदींसह राज्यातील फलोत्पादन, कृषी निर्यात क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

संबंधित बातम्या :

शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला, भेटीगाठीच्या सिलसिल्यामागचं नेमकं कारण काय?

राज्याच्या पर्यटन विकासासाठी 250 कोटींचा निधी, प्रायोगिक तत्वावर 10 जिल्ह्यात ‘जिल्हा पर्यटन अधिकारी’

State Government’s letter to the Central Government seeking extension of the PM Crop Insurance Scheme