
महिलांनी काहीही करण्याचा निर्णय घेतला की, त्यांच्यापुढे अनेक प्रश्न उपस्थित राहतात. अशात महिलांना काय हवं आहे… हेच त्या विसरुन जातात… म्हणून महिलांना मुक्तपणे वावरण्याचा, आत्मविश्वासाने आणि स्वातंत्र्याने जगण्याचा हक्क मिळावा, या उद्देशाने कोरो इंडिया व विभागातील तळागाळातील स्थानिक संघटना यांच्या वतीने महाराष्ट्रभर महिला, ट्रान्स महिला आणि युवतींसाठी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्पर्धेला 8 फेब्रुवारी 2026 पासून सुरुवात झाली आहे.
पितृसत्ताक सामाजिक रचनेमुळे मुली व महिलांवर लादल्या गेलेल्या निर्णयांमुळे त्यांचे स्वप्न अपूरे राहतात. एवढंच नाही तर, मैदानी खेळांवर निर्बंध देखील येतात. घराबाहेर जाणे, सार्वजनिक मैदानांमध्ये खेळणे आणि शरीराविषयी मोकळेपणा या बाबींवर नियंत्रण ठेवले जाते. या सामाजिक बंधनांना आव्हान देण्यासाठी कबड्डीसारख्या पारंपरिक खेळण्यामधून महिला मुक्तपणे बिनधास्त, आत्मविश्वासाने खेळत आहेत.
2023 मध्ये सुरू झालेल्या या कबड्डी उपक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचं दिसत आहे. पहिल्याच वर्षी स्पर्धेत 600 महिलांनी सहभाग घेतला. ज्यामध्ये कपड्याच, पेहरावाच, वयाचा कोणतेही बंधन नव्हतं. महिला आपल्याला आवडत्या कपड्यात कपडे खेळत होत्या . मुंबई आणि मराठवाड्यात स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत गेल्या चार वर्षांत 2240 महिला आणि 27 ट्रान्स महिलांनी कबड्डी खेळली आहे.
यावर्षी ही स्पर्धा राज्यस्तरावर आयोजित करण्यात येत असून मुंबई, कोकण, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र या विभागांमधून एकूण 448 संघ सहभागी होणार आहेत. यामधून 4032 महिला, ट्रान्स महिला आणि युवती मोठ्या संख्येने मैदानात उतरणार आहेत. तसेच मुंबई जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा ही येत्या 11 फेब्रुवारी 2026, रोजी चेंबूर येथील गांधी मैदानामध्ये होणार आहे. सध्या मुंबईतील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये संध्याकाळी , रात्री जसा वेळ मिळेल तसा महिला जोमाने सराव करत आहेत.
यावेळी मुंबईमध्ये होणाऱ्या कबड्डी सिझन 3 साठी “महिला ट्रान्स महिला आणि युवती असे एकूणच 60 संघ मुंबई मध्ये खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या कबड्डी मुळे महिलांमध्ये आत्मविश्वास, संघटनशक्ती आणि नेतृत्वगुण विकसित होत असून सार्वजनिक मैदानांवर महिलांची मुलींची उपस्थिती वाढत आहे. विशेषतः विधवा, घटस्फोटित आणि अविवाहित महिलांसाठी ही स्पर्धा सामाजिक बहिष्काराविरोधात एक सकारात्मक पाऊल ठरत आहे.