महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे कोणत्या पक्षाचे किती मृत्यू, राज्याची नेमकी स्थिती काय? वाचा सविस्तर…

| Updated on: Feb 09, 2021 | 10:41 PM

महाराष्ट्रात अजूनही बर्ड फ्लूबाबत धाकधूक कायम आहे. राज्यात सोमवारी (8 फेब्रुवारी) कुक्कुट पक्षांमध्ये 1266 मृत्यू झालेले आहेत.

महाराष्ट्रात बर्ड फ्लूमुळे कोणत्या पक्षाचे किती मृत्यू, राज्याची नेमकी स्थिती काय? वाचा सविस्तर...
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात अजूनही बर्ड फ्लूबाबत धाकधूक कायम आहे. राज्यात सोमवारी (8 फेब्रुवारी) कुक्कुट पक्षांमध्ये 1266 मृत्यू झालेले आहेत. बगळे, पोपट, चिमण्या अशा अन्य पक्षांमध्ये 6 इतर पक्षांच्या आकस्मिक मृत्यूचीही नोंद झाली आहे. कावळ्यांमध्ये राज्यात 19 मृत्यू आढळून आले. अशाप्रकारे सोमवारी एकूण 1291 पक्षांचे मृत्यू झाले. या पक्षांचे नमुने तपासणीसाठी भोपाळ येथील राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेच्या प्रयोगशाळेत आणि पुण्यातील प्रयोगशाळेत पाठविण्यात येत आहेत (Status of Bird Flu in Maharashtra on 8 February 2021).

कुक्कुट आणि बदक पक्षांमधील नमुने पॉझिटीव्ह आल्याने या भागाला “नियंत्रित क्षेत्र” म्हणून घोषित करण्यात येत आहे. या भागात प्राण्यांमधील संसर्गजन्य रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम 2009 अन्वये निर्धारित प्रतिबंधक निर्देश लागू करण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. बर्ड फ्लू आढळलेल्या पोल्ट्री फार्मपासून 1 किमी त्रिज्येच्या अंतरामध्ये येणारे सर्व कुक्कुट पक्षी, अंडी, कुक्कुट खाद्य व विष्टा शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात येत आहे.

आतापर्यंत बाधित क्षेत्रामधून 2 लाख 6 हजार 441 कुक्कुट पक्षी (यात नवापूर जि. नंदुरबार येथील 1 लाख 19 हजार 773 पक्षी समाविष्ट करुन) 44 हजार 970 अंडी आणि 64 हजार 639 किलो खाद्य नष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे बर्ड फ्लू रोग प्रसारास प्रतिबंध करण्यासाठी नष्ट करण्यात आलेल्या पक्षांच्या मालकांना आजपर्यंत 41 लाख 22 हजार रुपयांचं अनुदान वाटप करण्यात आलंय.

बर्ड फ्लू रोगाचा प्रतिबंध विनाविलंब करण्याच्या उद्देशाने प्राण्यांमधील संसर्गजन्य व संक्रामक रोगास प्रतिबंध व नियंत्रण अधिनियम, 2009 कायद्यानुसारचे राज्य शासनाला असलेले सर्व अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. कुक्कुट पक्षांचे मृत्यू झालेल्या भागाला सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेय. त्यासाठी आवश्यक त्या दक्षता व प्रतिबंधात्मक उपाय योजना स्थानिक प्रशासनाकडून त्वरित करण्यात येत आहेत.

कुक्कुटपालन करणाऱ्यांना आवाहन

या संदर्भात सर्व कुक्कुट पक्षी धारकांना आवाहन करण्यात आलंय की, “त्यांनी जैव सुरक्षा उपाय योजनांचे तंतोतंत पालन करावे. कुक्कुट पक्षी विक्रेत्यांनी हातात ग्लोव्हज, नाका-तोंडाला पूर्णपणे झाकणारा मास्क, दुकानात नियमित आणि काटेकोर स्वच्छता व सामाजिक अंतर या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवा आणि गैरसमजुतीमुळे कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी खाणे नागरिकांनी बंद किंवा कमी करू नये.”

“कुक्कुट पक्षांचे मांस आणि अंडी हा प्रथिनांचा स्वस्त असणारा स्त्रोत आहे. पूर्णपणे व्यवस्थित शिजवलेले कोंबड्यांचे मांस आणि उकडलेली अंडी खाणे सुरक्षित आहे. बर्ड फ्लू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवण्यात येऊ नयेत,” असंही आवाहन करण्यात आलंय.

हेही वाचा :

नंदूरबारमध्ये ‘ऑपरेशन किलिंग’; दिवसभरात 88 हजार कोंबड्या मारल्या

राज्यात दिवसभरात 6 हजार कोंबड्या दगावल्या, बगळे, पोपट, चिमण्यांचाही मृत्यू, बर्ड फ्लूचा धोका वाढला?

मासेही बर्ड फ्लूनं दगावतायत? लातूरात हजार मासे दगावले; तपास सुरू!

व्हिडीओ पाहा :

Status of Bird Flu in Maharashtra on 8 February 2021