सुनेत्रा वहिनींना मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही…यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? बड्या नेत्याची राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह उघड करणारी पोस्ट

Sunetra Pawar NCP : प्रशांत किशोर आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद निर्माण झाल्याचं चित्र आहे. प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिला आहे. आता एका बड्या नेत्याची पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे.

सुनेत्रा वहिनींना मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही…यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? बड्या नेत्याची राष्ट्रवादीतील अंतर्गत कलह उघड करणारी पोस्ट
Ajit Pawar-Sunetra Pawar
| Updated on: Aug 08, 2026 | 9:59 AM

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद दिसून येत आहेत. दोन दिवसांपूर्वी राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. या भेटीत प्रशांत किशोर यांनी प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा सल्ला दिला आहे. सध्या सुनील तटकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.सुनेत्रा पवार यांच्यावर गुंगी गुडिया अशी टीका सुरु आहे. त्या प्रदेशाध्यक्ष बदलण्यासारखा धाडसी निर्णय घेणार का? अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. ‘दोन ते तीन वर्ष झालीत. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष बदलले पाहिजेत” असं राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे. दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूरचे जिल्हाध्यक्ष आणि प्रवक्ते उमेश पाटील यांची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आहे.

दादांवरचं प्रेम खरं होतं, तर दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावरचं प्रेम कमी कसं होऊ शकतं? आदरणीय अजितदादांवर निस्सीम प्रेम करणारे हजारो कार्यकर्ते आजही आहेत. दादांनी आपल्याला काय दिलं, किती प्रेम दिलं, किती जपलं याची जाणीव ठेवून दादांच्या माघारी “दादांचा परिवार हाच आपला परिवार” या भावनेने ते निःस्वार्थपणे उभे आहेत. पण एक गोष्ट मनाला प्रचंड वेदना देते… दादांच्या नावावर, दादांच्या विश्वासावर आणि दादांनी दिलेल्या संधींवर आयुष्यभर मोठे झालेले काही लोक दादांच्या परिवाराला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करत असतील, तर मनात एक प्रश्न निर्माण होतो….यांचं दादांवर खरंच प्रेम होतं का? की दादा सत्तेत होते, तोपर्यंतच ते प्रेम होतं? असा सवाल उमेश पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये विचारला आहे.

तर कणभर जास्त प्रेम असायला हवं होतं

“माझी धारणा अगदी स्पष्ट आहे. ज्याचं दादांवर खरं प्रेम होतं, त्याचं दादांच्या माघारी त्यांच्या परिवारावर तेवढंच नव्हे, तर कणभर जास्त प्रेम असायला हवं होतं. कारण दादांच्या अचानक जाण्याने केवळ महाराष्ट्राने एक नेता गमावला नाही; एका कुटुंबाचं संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदललं. त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या आयुष्याने अचानक वेगळं वळण घेतलं. विशेषतः सुनेत्रा वहिनींना तर स्वतःच्या दुःखात काही काळ शांत बसण्याचीही उसंत मिळाली नाही. मनसोक्त रडायलाही वेळ मिळाला नाही… अश्रू पुसण्याआधीच पक्षाची आणि सरकारची प्रचंड जबाबदारी खांद्यावर घ्यावी लागली” असं शब्दात उमेश पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us