
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या समर्थकांसमोर नेतृत्वाचा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. सध्या राजकीय वर्तुळात पक्षाच्या भवितव्याबद्दल आणि विलीनीकरणाच्या चर्चांना उधाण आले आहे. या कठीण प्रसंगात पक्षाची एकजूट कायम ठेवण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना दिशा देण्यासाठी सध्या वेगाने हालचाली सुरु आहेत. तसेच वरिष्ठ स्तरावरही मोठ्या प्रमाणात खलबतं सुरु झाली आहेत. आता या सर्व घडामोडींवर आमदार सुनील शेळके यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली.
सुनील शेळके यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या नेतृत्वावर भाष्य केले. अजित दादा आज आपल्यात नाहीत. यावर आमचा विश्वासच बसत नाही. जर दादांना पक्ष विलीन करायचा असता, तर त्यांनी वरिष्ठ नेत्यांशी आणि मित्रपक्षांशी नक्कीच चर्चा केली असती. त्यामुळे आता अशा चर्चा करण्यात काही अर्थ नाही. हा निर्णय आता केवळ सुनेत्रा पवार याच घेतील आणि अजित दादांच्या राजकीय उत्तराधिकारी सुनेत्रा वहिनीच आहेत. त्यामुळे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार त्यांनाच देण्यात आले आहेत, असे सुनील शेळके म्हणाले.
अजित दादांनी नेहमीच शिव-शाहू-फुले-आंबेडकर ही विचारधारा जपली. पक्ष एकसंध राहावा यासाठी सुनेत्रा वहिनींनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणे गरजेचे होते, ज्याप्रमाणे इंदिरा गांधींच्या निधनानंतर राजीव गांधींनी जबाबदारी स्वीकारली होती. अजित पवारांच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त करत अमोल मिटकरी आणि रुपाली पाटील यांनी चौकशीची मागणी केली आहे, ज्याला जनतेचाही पाठिंबा मिळत आहे, असेही सुनील शेळकेंनी म्हटले.
यावेळी पुणे-मुंबई महामार्गावर झालेल्या टँकर अपघातावर बोलताना सुनील शेळके यांनी स्पष्ट केले की, ज्वलनशील वायूचा धोका टाळण्यासाठी रिफिलिंगला वेळ लागला, अन्यथा मोठा अनर्थ झाला असता. पोलिसांनी या काळात प्रवाशांना केलेली मदत मोलाची असल्याचेही सुनील शेळकेंनी सांगितले.
सध्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका असल्या तरी अजित पवारांच्या निधनामुळे अद्याप प्रचार केलेला नाही. मात्र मावळची जनता अजित पवारांवर असलेल्या प्रेमापोटी या निवडणुकीत नक्कीच साथ देईल, असा विश्वास सुनील शेळके यांनी व्यक्त केला.