सुनेत्रा पवार यांचे अध्यक्षपद खरंच धोक्यात? त्या नोटिशीवर सुनील तटकरेंचं महत्त्वाचं विधान; म्हणाले बैठकीत…
आलेल्या नोटिशीत तथ्य नाही. राष्ट्रीय अध्यक्षांसाठी बोलवण्यात आलेली तेव्हाची बैठक ही नियमानुसारच होती. आम्ही तरीही यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ. माहिती घेऊ आणि नंतरच कारवाई करु, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.

Sunil Tatkare And Sunetra Pawar : राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षात सध्या मोठे वादळ उठले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदालाच जाहीर आव्हान देण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांची अध्यक्ष म्हणून केलेली निवड ही अवैध असल्याचा दावा पक्षातील नेते सच्चिदानंद सिंह यांनी केला आहे. तशी नोटीसच त्यांनी सुनेत्रा पवार, पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांना पाठवली आहे. दरम्यान, या नोटिशीनंतर राष्ट्रवादी पक्षात नेमके काय होणार? असे विचारले जात आहे. सच्चिदानंद सिंह यांनी ही नोटीस स्वत: पाठवलेली आहे की, त्यामागे अन्य एखादा चेहरा आहे, असे विचारले जात आहे. या सर्व घडामोडी घडत असताना आता याच प्रकरणावर राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते तथा खासदार सुनील तटकरे यांनी सविस्तर भाष्य केलं आहे. नोटिशीबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेऊ, असे ते म्हणाले आहेत.
आलेल्या नोटिशीत तथ्य नाही. राष्ट्रीय अध्यक्षांसाठी बोलवण्यात आलेली तेव्हाची बैठक ही नियमानुसारच होती. आम्ही तरीही यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊ. माहिती घेऊ आणि नंतरच कारवाई करु, असे सुनील तटकरे यांनी सांगितले.
सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी पक्ष…
या नोटिशीची कायदेशीर वैधता तपासावी लागले. परंतु मला वैयक्तिकरित्या या नोटिशीत काही तथ्य आहे, असे वाटत नाही. आम्ही एकत्रित बसून राष्ट्रीय अध्यक्षांची निवड केलेली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्त्वात राष्ट्रवादी पक्ष एकसंघ आहे. आमच्या पक्षात लोकशाहीने काम चालते, असा ठाम विश्वासही तटकरे यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीला अर्थमंत्रिपद कधी मिळणार?
सुनील तटकरे यांनी राज्याच्या अर्थमंत्रिपदावरही भाष्य केले. अर्थमंत्रिपद हे सध्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आलेले आहे. परंतु या पदाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहे. त्यामुळे हे खाते आम्हाला मिळावे, अशी राष्ट्रवादीची मागणी आहे. यावर बोलताना लवकच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहोत. लवकरच आम्ही हा प्रश्न मार्गी लावू, असे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.