राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; नेमकं काय ठरलं?

शनिवारी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात मोठं विधान केलं होतं, त्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं, या सर्व पार्श्वभूमीवर आता मोठी बातमी समोर येत आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात आताची सर्वात मोठी बातमी; नेमकं काय ठरलं?
sunil tatkare
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 01, 2026 | 5:54 PM

शनिवारी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र त्यापूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठं विधान केलं होतं. उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याबाबत आपल्याला काहीही कल्पना नाही, माझ्याशी कोणतीही चर्चा झाली नाही, असं शरद पवार यांनी म्हटलं होतं. तसेच बारा तारखेला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होते असा दावाही सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीपूर्वी शरद पवार यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणासंदर्भात चर्चा सुरू झाली. यावर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठा खुलासा केला आहे.

नेमकं काय म्हणाले सुनील तटकरे? 

कोणाला काय म्हणायचं ते म्हणू देत आमची भूमिका स्वच्छ आहे. आम्ही अजितदादांच्या परिवाराशी आणि दादांनी जो राष्ट्रवादी काँग्रेसचा परिवार उभा केला त्याच्याशी सुसंगत असा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधीमंडळ गटाचा नेता कोणी निवडायचा?  हा राष्ट्रवादीचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये तो राष्ट्रवादी पक्षाचा अधिकार आहे, त्यामुळे तो मुद्दाच येत नाही. विलिनीकरणाच्या संदर्भात मी आजच नाही तर अनेकवेळा स्पष्ट केलेलं आहे, आम्ही एनडीएसोबत आहोत, आणि आम्ही कायम एनडीएसोबत राहणार आहोत. हे अजितदादा असताना देखील मी बोलत होतो, असंही यावेळी तटकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. अजितदादा प्रत्येक गोष्ट माझ्यासोबत शेअर करत होते, सर्व गोष्टींचा मी साक्षीदार आहे. आम्हाला या गोष्टीत राजकारण करायचं नाही, मात्र जर अजितदादा असा कोणता निर्णय घेणार असतील तर त्यांनी आधी भाजपसोबत चर्चा केली असती, मला असं वाटतं की चर्चा करायची, नाही कारायची विलिनीकरण करायचं नाही करायचं हा निर्णय राष्ट्रवादीचा आहे, मात्र आमची एवढीच अपेक्षा आहे, की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमच्याशी ते चर्चा करतील, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं आहे.