घटं भिन्द्यात् पटं…; बापटांच्या डीजेविरोधावरून अंधारेंनी नवनीत राणा, राणेंना डिवचलं, नेमकं काय म्हणाल्या?
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधावरून सुषमा अंधारे यांनी नवनीत राणा, नितेश राणेंना डिवचलं आहे. जाणून घ्या नेमकं काय म्हणाल्या?

पुण्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मुंबईनंतर पुण्याच्या गणेशोत्सवाची जगभर चर्चा होते. परंतु यंदा पुणेकरांकडून गणेशोत्सवात डीजे वाजवण्याला विरोध केला जात आहे. कर्णकर्कश डीजे वाजवण्यात येऊ नये, अशी मागणी केली जात आहे. या डिजेविरोधादरम्यान विद्यानंद बापट यांची जोरदार चर्चा होत आहे. विद्यानंद बापट यांनी जोरकसपणे डिजेचा विरोध केला. त्यामुळे मागील आठवड्याभरापासून बापट यांची सोशल मीडियावर चर्चा होत आहे. विद्यानंद बापट यांची राजकीय वर्तुळातही जोरदार चर्चा होत आहे. बापट यांच्या भूमिकेवरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप नेत्यांना डिवचलं आहे.
पुण्यातील गणेशोत्सवाला एक वैभवशाली परंपरा आहे. मात्र गणेशोत्सव डीजेमुक्त की डीजेयुक्त असे दोन मतप्रवाह पडल्याचे पाहायला मिळत आहेत. पुण्यातील गणेशोत्सवाच्या धार्मिक अधिष्ठानापेक्षा डीजेचा धांगडधिंगा वाढत आहे, याचा त्रास सामान्य नागरिकांना होत आहे. त्यामुळे आता हे थांबलं पाहिजे, अशी भूमिका पुणेकर नागरिक घेताना दिसत आहे. पुणे पोलिसांनी यावर भूमिका घेतली नाही, तर डीजेच्या विरोधात आम्ही रस्त्यावरत उतरू आणि संघटित लढाई लढू, अशा प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे विद्यानंद बापट यांनी महापालिकेत झालेल्या बैठकीतही डीजेला विरोध केला. बापट यांच्या परखड भूमिकेवरून राजकारणही पेटलं आहे.
ठाकरे गटाच्या महिला नेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या, ‘ घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम्य. येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत्. हे बापटांच्या तोंडून ऐकून मला हे मेधा कुलकर्णीं , नवनीत राणा, राणे आणि तत्सम फडणवीस गँगच्या माध्यमांच्या चर्चेत राहण्यासाठी काहीही अतार्किक अविवेकी अतिरंजीत करू किंवा बोलू शकते त्यांच्यासाठी खास उच्चारले आहे का असे वाटले. काहीही असो पण आपला मुद्दा सभ्य आणि सुसंस्कृतपणे मांडता येऊ शकतो. त्यासाठी शिवीगाळ करायची गरज नाही, हे बापटांच्या निमित्ताने पुन्हा नव्याने अधोरेखित होत आहे.. तेही नसे थोडके. परंतु सणवार शून्यावर आणले जावेत हे मात्र बापटांचं म्हणणं अतिरंजीत आहे’.
विद्यानंद बापट यांची भूमिका काय?
विद्यानंद बापट यांनी डीजेविरोध करताना म्हटलं की, मी स्पष्टपणे सांगितलं की, सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर सुरू असतात. आजूबाजूच्या लोकांना आवाजाचा त्रास होतो. लाऊडस्पीकर विरहित गणेशोत्सव साजरा करावा. पुण्याचा सार्वजनिक गणेशोत्सव हा दीडशे वर्षांपासून सुरू झालेला आहे. तेव्हा वीज नव्हती. त्यामुळं लाऊडस्पीकर असण्याचा प्रश्नच नाही. सार्वजनिक ठिकाणी लाऊडस्पीकर हा गेल्या 40 वर्षांपासून लावले जात आहेत. याचा आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो. त्यामुले बंदीस्त ठिकाणी डीजे, ढोल वाजवल्यास काही अडचण नाही. स्वतःच मनोरंजन करत असताना इतरांना त्रास होऊ नये. याची काळजी घ्यावी. सार्वजनिक रस्त्यावर रहदारीचा अडचण होणार ची, याची ही जबाबदारी घ्यावी’.