Sushma Andhare : सुषमा अंधारे यांचा निलम गोऱ्हे यांच्याबद्दल मोठा दावा, त्यांना आमदारकी दिली नसती तर, त्यांनी..
Sushma Andhare : "अदिती तटकरे यांनी महिला बालकल्याण मंत्री म्हणून काय केले त्यांनी सांगावे. त्यांना व्यक्तिगत विरोध नाही. त्या ज्या पदावर आहेत, त्याबाबत अनेक प्रश्न ऐरणीवर येत असतील, त्या प्रश्नांची उत्तरं शोधता येत नसतील, आदिती तटकरे यांना मंत्रीपद झेपत नसेल तर राजीनामा द्या. वडील बादशहा आहेत पक्षाचे, म्हणून काम करणार का?" अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.

“पुणे आणि राज्यातील कायदा सुव्यवस्था पाहता हे गंभीर आहे. पीडित लोकांवर लाठीचार्ज करणे, उसकावणे असे केले जात आहे. बालिकेचा सुरक्षा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या कॅबिनेटमध्ये जो निर्णय झाला पॅरोलवर अशा लोकांना सोडले जाऊ नये. मात्र माझा प्रश्न असा आहे की तुम्ही त्यांना पॅरोलवर सोडायचं की नाही हे नंतर ठरवा. मात्र अशा आरोपींचा अटकपूर्व जामीन होतोच कसा? परभणी जिल्ह्यातील शिक्षकाला अटक पूर्व जामीन झाला कसा?” असे प्रश्न उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी विचारला आहे. “शक्ती कायदा का केला जात नाही? देवेंद्र फडणवीस आम्हाला यात राजकारण करू नका असे म्हणतात. मग शक्ती कायदा का नको आहे? महाविकास आघाडीने आणलेला कायदा जर आणायचं नाही म्हणून आडमुठेपणा करत असाल तर फडणवीस यांचे सरकार राजकारण करत आहे” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
“महिला आणि मुलींच्या बाबतीत संवेदनशील राहण्याऐवजी फडणवीस सरकार राजकारण करत आहे. या सगळ्यात प्रकरणात महिला बालकल्याण मंत्री कुठे आहेत? महिला बाल विकास आयोग कुठे आहे? महिला आयोग पद रिक्त, आता का भरत नाही?. लहान मुलांना पाळणा घरामध्ये ठेवले जाते. यामध्ये पाळणाघरं किती आहेत? याची चौकशी केली आहे का? पाळणा घराचे सर्वेक्षण झाले पाहिजे” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
रितू तावडे मुख्यमंत्री होऊ पाहत आहेत
“मुंबईच्या महापौर रितू तावडे या महापौर कमी आणि मुख्यमंत्री होऊ पाहत आहेत. त्या मुंबईपेक्षा इतर प्रश्नावर बोलत आहेत. एकदा सांगा फडणवीस यांना काही कळत नाही म्हणून मी बोलत आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यामध्ये कोल्ड वार लपून राहिलेलं नाही. फडणवीस यांना बाजूला सारून शिंदे मुख्यमंत्री होणार,असे बच्चू कडू सांगत असतील तर अमित शाह यांनी जास्त अधिकार एकनाथ शिंदे यांना दिले आहेत” अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली.
विधान परिषद मिळाली नाही म्हणून नाराज का होऊ?
“मी नाराज बिराज नव्हते, विधान परिषद मिळाली नाही म्हणून नाराज का होऊ? छत्रपती संभाजीनगर मधील अवस्था बघून दानवे यांना संधी दिले असेल, एका जत्रेने देव म्हातारा होत नाही. अजून मला भरपूर संदेश आहेत, माझ्यावर विश्वास आहे पक्ष प्रमुखांना. मी ठाकरेंची बहीण आहे. 1500 रुपयांवर खुश होणारी लाडकी बहिण असेल तर मी तशी नाही,माझी सुरक्षीतता महत्वाची,भाजप ट्रोलरने माझी चिंता करू नये” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
अदिती तटकरे या योजना अपडेट मंत्री आहेत का?
“नीलम गोऱ्हे यांना आमदारकी दिली नसती तर त्यांनी भाजपमध्ये ही उडी मारली असती. अदिती तटकरे या योजना अपडेट मंत्री आहेत का? की, महिला बाल कल्याण मंत्री आहेत हे ठरवावे. खरात, चाकणकर हे सगळे आता निष्पाप आहेत असे का वाटते?. एसआयटी वर आता फार विश्वास ठेवावा असे वाटत नाही, रुपाली चाकणकर यांना अजूनही ताब्यात घेतले जात नाही” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.