राजकारणामुळे नाती तुटत नसतात, महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक – संजय राऊत

मीसुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहात आहे, या दोघांचं नातं काय आहे, त्यांच्या एकमेकांप्रती भावना काय आहेत हे मला माहीत आहे. कुटुंबात त्यांच्या भावना काय आहेत, या सगळ्याची जाणीव मलाही आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात.

राजकारणामुळे नाती तुटत नसतात, महाराष्ट्र हितासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक - संजय राऊत
संजय राऊत
Image Credit source: TV9 Marathi
| Updated on: Apr 22, 2025 | 10:28 AM

उद्धव – राज यांच्यातील नात्यासाठी राजकीय व्यक्तीची गरज नाही, राजकारणामुळे नाती तुटत नसतात असं संजय राऊतांनी नमूद केलं. ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. उद्धव ठाकरेंच्या मनात राज ठाकरेंविषयी कोणताही अहंकार , कटुता नाही असंही राऊतांनी स्पष्ट केलं. मनसेप्रमुख राज ठाकरेंनी एक हात पुढे केला आणि उद्धव ठाकरेंनी त्याला प्रतिसाद दिला. राज ठाकरे मुंबईत येऊ देत, मग चर्चा करूया. रोज या विषयावर चर्चा करू त्या विषयाचं गांभीर्य का घालवायचं ? असा सवालही संजय राऊतांनी उपस्थित केला.

गेल्या आठवड्यात राज ठाकरेंनी महाराष्ट्र हितासाठी आपण पुढे येण्यास तयार असल्याचे मुलाखतीत सांगितल्यानंतर उद्धव ठाकरेंनीही प्रतिसाद दिल्याने दोन्ही बंधू कधी एकत्र येतात, याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. महाराष्ट्रासाठी, मराठी माणसाच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावं अशी भावना जनसामान्य व्यक्त करत असून राज अथवा उद्धव यांपैकी कोणीच यावर अजून स्पष्ट उत्तर दिलेलं नाही.

मनसे प्रमुख राज ठाकरे सध्या परदेशात असून ते मुंबईत आल्यावर या विषयी चर्चा करतील, तोपर्यंत या विषयावर कोणीही बोलू नये, अशा सूचना मनसेच्या नेत्यांनाही देण्यात आल्या आहेत. मात्र असं असलं तरी ठाकरे बंधूंच्या पुन्हा एकत्र येण्यावरून माध्यमांत, राज्यातही चर्चा कायम असून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनाही या विषयावर आज पुन्हा प्रश्न विचारण्यात आले. त्यावर ठाकरे बंधूंच्या युतीचा विषय जिवंतच राहणार. उद्धव ठाकरे सकारात्मक असल्याचेही ते म्हणाले.

महाराष्ट्र, मराठी माणसाच्या हितासाठी उद्धव ठाकरे सकारात्मक

लोकांच्या मनातील भावना आहेत. उद्धव आणि राज ठाकरे यांच्यात जे नातं आहे, कोणत्याही राजकीय व्यक्तीनें मध्ये येऊन त्यांच्यात चर्चा करण्याची गरज नाही. मीसुद्धा अनेक वर्ष त्या प्रवाहात आहे, या दोघांचं नातं काय आहे, त्यांच्या एकमेकांप्रती भावना काय आहेत हे मला माहीत आहे. कुटुंबात त्यांच्या भावना काय आहेत, या सगळ्याची जाणीव मलाही आहे. राजकारणामुळे अशी नाती तुटत नसतात. उद्धव ठाकरे हे कमालीचे सकारात्मक आहेत.महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं आपल्याकडून नुकसान होऊ नये, यासाठी त्यांची भूमिका खूप सकारात्मक आहे. ज्यांना ज्यांना महाराष्ट्र हितासाठी एकत्र यायचं आहे, त्यांनी यावं.

कालच रिपब्लिकन गटाच्या एका प्रमुख नेत्याने मला फोन केला, आम्हालाही या प्रवाहात यायचं आहे. जर दोन ठाकरे महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र यायचा विचार करत असतील तर आम्हालाही मागे राहता येणार नाही. आम्हालाही या प्रवाहात तु्म्ही सामील करून घ्या, असं त्या नेत्याने मला सांगितलं, असा दावा संजय राऊत यांनी केला.

संयुक्त महाराष्ट्र चळवळीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला, सहभाग घेतला आणि महाराष्ट्र, मराठी माणसाची एकजूट अधिक बळकट करण्याचा प्रय्तन केला. त्या पद्धतीने रिपब्लिकन म्हणजे आंबेडकरी चळवळीतले अनेक प्रमुख लोकं आता (आम्हाला) संपर्क साधायला लागले आहेत. आम्ही मराठी आहोत, मराठी म्हणून या मुंबईवर आपला ठसा कायम राहिला पाहिजे, अशा त्यांच्या भावना असल्याचे राऊतांनी नमूद केलं. त्यांच्या या विधानामुळे राज्यातील राजकीय समीकरणं बदलू शकतात अशी चर्च असून सध्या परदेश दौऱ्यावर असलेले राज ठाकरे मुंबईत आल्यावर काय निर्णय घेतात, ठाकरे बंधूंचं काय बोलणं होतं याकडे आता सर्वांचच लक्ष लागलं आहे.

महाराष्ट्रातल्या राजकारणातील कटुता आणि विष हे भारतीय जनता पक्षाने निर्माण केलं आहे. पोटात एक आणि ओठांवर दुसरंच काहीतरी, असा महाराष्ट्र कधीच नव्हता, असेही राऊत म्हणाले.