किल्ले, धरणं, धबधबे, ठाण्यात सगळं बंद, जिल्हाधिकाऱ्यांचा तडकाफडकी आदेश; नागरिकांसाठी मोठी सूचना!
ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले, धबधबे, धरणे, तलाव, नद्या इत्यादी पर्यटन स्थळावर जाण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांना मनाई करण्यात आली आहे.

Thane District Rain Update : भारतीय हवामान विभागाने (IMD) मुंबई महानगर क्षेत्रासाठी अतिवृष्टीचा इशारा (Red Alert) जारी केला आहे. ताशी 80 ते 90bकिलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने ठाणे जिल्ह्यासाठीदेखील रेड अलर्ट जारी केला आहे. जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस व सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यामध्ये गेल्या तीन दिवसापासून अतिवृष्टीची परिस्थिती असून सखल भागात पाणी साचणे, झाडे पडणे, वाहतूकीसाठी अडथळा निर्माण होणे अशा घटना घडलेल्या आहेत. हीच बाब लक्षात घेऊन ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने तडकाफडकी मोठा निर्णय घेतला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा नेमका आदेश काय?
ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक पर्यटनस्थळे आहेत. पावसाळ्यात येथील धबधबे, धरणे, तलाव, नदीकाठ अशा ठिकाणी नागरिकांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. या ठिकाणी अतिवृष्टी कालावधीत धबधब्याच्या ठिकाणी दरड कोसळणे, धरण, तालावमध्ये पोहोण्यासाठी गेलेल्या व्यक्ती बुडणे तसेच गड किल्यावर पायवाट घसरड्या होऊन अपघात होणे, अशा विविध घटना यापूर्वी घडलेल्या आहेत. यामुळे मोठी जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे सद्यस्थितीत हवामान विभागाने दिलेले इशारे विचारात घेता नागरिकांच्या सुरक्षितेतच्या दृष्टीकोनातून जिल्ह्यातील पर्यटन स्थळे जसे की, गडकिल्ले, धबधबे, धरणे, तलाव अशी ठिकाणे प्रतिबंधित करण्यात आली आहेत.
ढील आदेश होईपर्यंत मनाई
ठाण्याचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व गडकिल्ले, धबधबे, धरणे, तलाव, नद्या इत्यादी पर्यटन स्थळावर जाण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत नागरिकांना मनाई करण्यात आली आहे. सदर पर्यटन स्थळांचे व्यवस्थापन पाहणारे शासकीय विभाग यांनी सरकारी आदेशाची नोंद घेऊन नागरिकांना पर्यटन स्थळावर जाण्यास पुढील आदेश होईपर्यंत प्रतिबंधित करावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, सध्याच्या पावसाची स्थिती बघता सर्व यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. कोठेही दुर्घटना झाली तर तत्काळ बचावकार्य करण्यात येत आहे. गरज असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे.