ठाण्यात शरद पवार-अजित पवार गट पहिल्यांदाच आमनेसामने, प्रभू रामांबाबतच्या विधानावरुन राडा

जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांबद्दल केलेल्या वक्तव्यावरुन अजित पवार गट चांगलाच आक्रमक झालाय. अजित पवार गटाने आज ठाण्यात जितेंद्र आव्हाड यांच्या घारासमोर जावून आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. विशेष म्हणजे अजित पवार आणि शरद पवार गट अशाप्रकारे पहिल्यांदाच आमनेसामने आले.

ठाण्यात शरद पवार-अजित पवार गट पहिल्यांदाच आमनेसामने, प्रभू रामांबाबतच्या विधानावरुन राडा
Chetan Patil | Updated on: Jan 03, 2024 | 10:18 PM

ठाणे | 3 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिर्डीत पक्षाच्या चिंतन शिबिरात प्रभू श्रीरामांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. राम शाकाहारी नव्हते तर मांसाहारी होते, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावर आता सर्वच स्तरातून टीका केली जात आहे. जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या वक्तव्यावरुन राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांमध्ये मोठा संघर्ष उफाळला आहे. आव्हाडांच्या या वक्तव्यनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी आज ठाण्यात थेट जितेंद्र आव्हाड यांच्या घरासमोर निदर्शने देण्यास सुरुवात केली. विशेष म्हणजे शरद पवार आणि अजित पवार गट एकमेकांच्या विरोधात पहिल्यांदाच अशाप्रकारे आमनेसामने आले आहेत.

जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामांबद्दलच्या वक्तव्यानंतर ठाण्यात राष्ट्रवादीचा अजित पवार गट आक्रमक झाला. जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानाच्या काही अंतरावर अजित पवार गट रामाची आरती करून आव्हाडांचा निषेध नोंदणीसाठी आले होते. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जितेंद्र आव्हाड यांच्या घराच्या बाहेर रामाची आरती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना पिंजऱ्यात टाकले. वर्तक नगर पोलिसांनी ठाणे शहर युवक अध्यक्ष वीरेंद्र वाघमारेंसह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं.

‘शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही’

जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला असता “मी आव्हाड यांचे भाषण ऐकले नाही. मी दुसऱ्या दालनात होतो , अभ्यासावे लागेल. त्यामुळे मी त्यावर काय भाष्य करणार? जर तरची उत्तरे कसं देणार? त्यांनी अगोदर काय संदर्भ दिला ते बघावे लागेल. तपासून बघू मग बोलू. देव आपला असतो असं म्हणण्याची पद्धत. ती आपुलकची भावना. त्यांचं वक्तव्य मी बघितलं नाही, योग्य वेळी बोलेल. शाकाहारी आणि मांसाहारी असा भेद करण्याची गरज नाही”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

आव्हाडांचं वक्तव्य नेमकं काय?

“राम हा शाकाहारी नव्हता, तर मांसाहारी होता. त्याने 14 वर्ष वनवास भोगला होता. मग ते शाकाहारी कसे असू शकतात?”, असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला. “शिकार करून खाणारा राम आमचा आहे. आम्ही आज मटण खातो. राम बहुजनांचा आहे. आम्ही रामाच्या पावलावर चालतो. 14 वर्ष जंगलात काय खाणार?”, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us