राजकीय महत्त्वाकांक्षेचे बळी, उष्माघात बळी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा घणाघात

12 वाजताच्या कडक उन्हात काय झालं असेल. लोकांचा विचार करा. त्याच्यात बळी गेले.

राजकीय महत्त्वाकांक्षेचे बळी, उष्माघात बळी प्रकरणी जितेंद्र आव्हाड यांचा घणाघात
| Edited By: | Updated on: Apr 17, 2023 | 8:11 PM

ठाणे : नवी मुंबईतील खारघरमध्ये रविवारी डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरवण्यात आले. या कार्यक्रमात उष्णाघाताने १३ श्रीसेवकांचा बळी गेला. यानंतर विरोधक राज्य सरकारवर सडकून टीका करत आहेत. दुपारीऐवजी हा कार्यक्रम संध्याकाळी घेतला असता तर दुर्घटना टळली असती, अशा चर्चा सुरू झाल्या. संध्याकाळी कार्यक्रम का घेतला नाही, असा आरोप आता विरोधकांकडून केला जात आहे. यासंदर्भात बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, नियोजन शून्य कार्यक्रम झाला.

जितेंद्र आव्हाड म्हणाले, राजकीय महत्वाकांक्षा आणि अप्पासाहेब यांना पुढे करण्यात आले. त्यांच्या श्रद्धाळू भक्तांना ह्यांना एकत्रित करून आपलं राजकीय गणित जुळवण्यासाठी हे मंडळी उताविळ झाले होते. राजकीय मंडळींनी या १३ श्रीसेवकांचा बळी घेतला असल्याचा आरोप त्यांनी केला.

12 वाजताच्या कडक उन्हात काय झालं असेल. लोकांचा विचार करा. त्याच्यात बळी गेले. शरद पवार यांची सभा आम्ही आयोजित केल्या. काहींनी बाळासाहेब यांची सभा आयोजित केल्या. काहींनी नरेंद्र मोदींच्या सभा आयोजित केल्या. या सभा संध्याकाळी 7 ला का आयोजित केल्या जातात?

…तर काय फरक पडला असता

राजकीय सभेना कोणीही १२ वाजता येत नाही. कितीही प्रेमाने बोलवा येतच नाही. येथे श्रद्धेपोटी लोक येणार हे ह्यांना माहिती होतं. त्या श्रध्देमार्फत आपलं गणित जुळवता जुळवता ह्यांनी १३ जणांचे मुडदे पाडले, असा घणाघात जितेंद्र आव्हाड यांनी केला.

या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी १६ कोटी खर्च केला होता. अजून १६ कोटी खर्च केले असते तर काय फरक पडला असता. १ घरातला एक माणूस जाण्याचे दुःख काय असतं. हे प्रत्येकाने आयुष्यात अनुभवलेले आहे, असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

…तर घरी बसून कार्यक्रम बघीतला असता

आतापर्यंत १९ कार्यक्रम झाले. हा २० वा कार्यक्रम झाला. आतापर्यंत छोट्या जागेत कार्यक्रम झाले. आजच्या परिस्थितीत राजभवनाला कार्यक्रम घेतला असता सर्व इलेट्रॉनिक्स मीडियाने दाखवला असता. लोकांनी घरात पंख्याखाली बसून आरामात हा कार्यक्रम बघीतला असता, असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं.

श्रध्देचा वापर आणि त्याचा अतिरेक

एक किलोमीटरच्या अंतरावरून ज्यांना दिला पुरस्कार ते दिसले तरी असतील का. आपल्याला १०० मीटरवर दिसत नाही. श्रध्देचा वापर आणि त्याचा अतिरेक जेव्हा होतो आणि मनात कोणती भावना नसते. अशा घटनांना जे आयोजन करतात तेच जबाबदार असतात, असा टोलाही जितेंद्र आव्हाड यांनी लगावला.