ठाणे: विवियाना मॉलमधील मारहाण प्रकरणातून जामिनावर सुटल्यानंतर अवघ्या 72 तासात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड यांच्यावर विनयभंगाचा आरोप ठेवण्यात आला आहे. त्याचा निषेध म्हणून जितेंद्र आव्हाड यांनी आमदारकीचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे. तर आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने मुंब्रा बायपास रोडवर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रास्तारोको केला आहे. टायर जाळून आव्हाड समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी देण्यास सुरुवात केली आहे. आव्हाड यांच्या विरोधातील एफआयआरची कॉपी हाती आली असून त्यात झालेल्या प्रकाराची धक्कादायक माहिती देण्यात आली आहे.
मुंब्रा येथे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वाय पूलाचं उद्घाटन करण्यात आलं. या नवीन पुलाच्या सोहळ्याप्रकरणी हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित महिलेने आपला विनयभंग झाल्याची तक्रार मुंब्रा पोलीस ठाण्यात दिली आहे.
ही महिला भाजपच्या महिला मोर्चाची पदाधिकारी आहे. तिच्या तक्रारीवरून मुंब्रा पोलिसांनी आव्हाड यांच्या विरोधात भादंवि कलम 354 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
महिलेने दिलेल्या एफआयआरची तक्रार कॉपी व्हायरल होत आहे. यात महिलेने झालेला प्रकार कथन केला आहे. नवीन पुलाचा लोकार्पण सोहळा होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या पुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. कार्यक्रम संपल्यावर मुख्यमंत्री निघून जात असताना मी मुख्यमंत्र्यांच्या गाडीच्या डाव्या बाजूला उभे होते.
तेवढ्यात जितेंद्र आव्हाड आले. मी पुढे थांबलेली होती. गर्दीचा फायदा घेऊन माझा विनयभंग करण्याच्या उद्देशाने त्यांनी माझ्या दोन्ही खांद्यास दाबून धरले आणि कायमध्ये उभी आहेस, चल बाजूला हो, असं मला म्हटलं, असं या एफआयआरमध्ये म्हटलं आहे.
त्यानंतर आव्हाड यांनी मला ढकलून दिलं. त्यांनी मला वेगळ्या उद्देशाने स्पर्ष केल्याने माझ्या मनात लज्जा उत्पन्न झाली. त्यानंतर लगेच मी पोलीस उपआयुक्त परिमंडळ-1 यांच्याकडे गेले. त्यांनी तक्रार करण्यास सांगितलं. त्यानंतर मी मुंब्रा पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली, असंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याने मुंब्र्यातील रिक्षावाल्यांनी रिक्षा बंद केल्या आहेत. मुंब्रा बायपास मार्गावर राष्ट्रवादीने जोरदार आंदोलन केल्याने या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली आहे. तसेच या मार्गावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निषेध नोंदवला आहे.