Kalyan Dombivli Stray Dogs : कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची इतकी दहशत की, 6 महिन्यातील डॉग बाईटचा आकडा ऐकाल तर हडबडून जाल
Kalyan Dombivli Stray Dogs : कल्याण-डोंबिवलीत सध्या भटक्या कुत्र्यांची प्रचंड दहशत आहे. मागच्या सहा महिन्यात हे भटके कुत्रे किती लोकांना चावलेत त्याची आकडेवारी समोर आली आहे. आकडा वाचल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल, तुम्ही हडबडून जाल.

भटक्या कुत्र्यांचा मुद्दा दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. कल्याण-डोंबिवलीमध्ये, तर या भटक्या कुत्र्यांनी प्रचंड दहशत निर्माण केली आहे. तीन दिवसांपूर्वी कल्याणच्या खडकपाडा परिसरामध्ये एका पिसाळलेल्या कुत्र्याने तब्बल 130 पेक्षा अधिक नागिरकांना चावा घेतला. तेच सोमवारी सकाळी कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातही एका भटक्या कुत्र्याने प्रवाशांना लक्ष्य केलं. सकाळच्यावेळी स्टेशन परिसरात हा कुत्रा जवळपास 10 ते 15 लोकांना चावला. सलग दोन दिवस घडलेल्या या घटनांमुळे कल्याण-डोंबिवलीमधील नागरिक दहशतीखाली आहेत. पहाटेच्या सुमारास कामावर जाताना आणि रात्रीवरुन कामावरुन येताना या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतोय. एखाद्या गल्लीबोळात किंवा निर्जन रस्त्यावर तीन-चार कुत्र्यांनी मिळून एखाद्या नागरिकाला एकट्यामध्ये गाठलं तर त्याची भितीने गाळण उडते.
कल्याण-डोंबिवलीत भटक्या कुत्र्यांची दहशत प्रचंड वाढली आहे. सहा महिन्यांत तब्बल 18 हजारांहून अधिक डॉग बाईटच्या नोंदी आहेत. गेल्या वर्षी 2025 मध्ये कल्याण डोंबिवली पालिका रुग्णालयात 21 हजार 165 डॉग बाईटची नोंद झाली आहे, तर यंदा अवघ्या सहा महिन्यांतच 18 हजार 447 जणांचा कुत्र्यांनी चावा घेतल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
डॉग बाईटच्या किती नोंदी
जुलैमध्ये आतापर्यंत कल्याण पश्चिमेतील रुक्मिणीबाई रुग्णालयात 954 डॉग बाईट रुग्णांची नोंद झाली आहे. डोंबिवलीची आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही. गेल्या दोन दिवसांत 200 हून अधिक नागरिकांचा कुत्र्याने चावा घेतला. वाढत्या घटनांमुळे कल्याण-डोंबिवलीत नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. कुत्रा चावल्यास दुर्लक्ष करू नका, शासकीय रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्या असं आरोग्य विभागाकडून आवाहन करण्यात आलं आहे. कुत्रा चावल्याच्या घटनेकडे दुर्लक्ष केल्या रेबीज होण्याचा धोका संभवतो. भटक्या कुत्र्यांमुळे कल्याण डोंबिवलीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून या भटक्या कुत्र्यांवर ठोस उपाययोजनेची नागरिकांची मागणी आहे.
कधी अंगावर येतील याचा नेम नाही
फक्त कल्याण-डोंबिवलीतच नव्हे तर राज्याच्या अन्य भागातही या भटक्या कुत्र्यांचा प्रश्न गंभीर आहे. ही भटकी कुत्री कधी अंगावर येतील याचा नेम नाही. अनेक लहान मुलांवरही ही भटकी कुत्री हल्ला करतात. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यांमध्ये अनेक लहान मुलं जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत.