महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी भर मध्यरात्री डोंबिवलीत टाकलेली धाड फोल ठरली? महत्त्वाची माहिती आली समोर

उदय सामंत यांनी मध्यरात्री केलेल्या धाडीनंतर केडीएमसी महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय. त्यांचं हे स्पष्टीकरण पाहता सामंत यांची धाड फोल ठरली की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.

महाराष्ट्राचे मंत्री उदय सामंत यांनी भर मध्यरात्री डोंबिवलीत टाकलेली धाड फोल ठरली? महत्त्वाची माहिती आली समोर
| Edited By: Chetan Patil | Updated on: Mar 14, 2023 | 11:08 PM

डोंबिवली : काही दिवसांपासून डोंबिवलीत पाणी कमी दाबाने किंवा येत नसल्याची तक्रार उद्योग मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांना मिळाली होती. त्याच अनुषंगाने उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सोमवारी (13 मार्च) मध्यरात्री अचानक डोंबिवलीतील संबंधित गाव परिसरात येत टॅंकर माफियांवर धाड टाकली. त्यावेळी त्यांना पालिका आणि एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीतून टॅब मारून टँकर माफिया पाणी चोरी करत असल्याचा निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांच्या मदतीने टँकर भरून देणाऱ्या गोदामाला सील केलं. तसेच काही टँकर आणि टॅंकर चालकांना ताब्यात घेतलं.

उदय सामंत यांनी टँकर चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या कारवाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र या कारवाईनंतर महापालिकेने देखील संबंधित ठिकाणांना भेटी दिल्या. या पाहणीनंतर धाडी टाकलेल्या ठिकाणी महापालिकेचं पाणी कोणीच चोरत नासल्याचा दावा पालिकेच्या अधिकाऱ्यांनी केलाय. त्यामुळे ऐन मध्यरात्री सामंत यांनी टाकलेली धाड फोल ठरली आहे की काय? अशी चर्चा शहरातत सुरू झालीये. या सर्व प्रकारानंतर पालिकेच्या अहवालानंतर ग्रामस्थांनी साहेब आमच्या नळाला पाणी येत नाही मग आम्ही पाणी कुठून चोरणार? आमची फुकट बदनामी करु नका, असे खडेबोल सुनावले.

उदय सामंत यांची नेमकी भूमिका काय?

“महानगरपालिका आणि एमआयडीसीच्या मेन लाईनीवरून टँकर माफिया कनेक्शन घेतले आहे. त्यावर केसेस दाखल झाल्या पाहिजे, अशी उदय सामंत यांची आहे. डोंबिवलीत गेल्या पंधरा ते वीस दिवसांमध्ये पाणी कमी झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या म्हणून मी स्वतः रात्री साडेबाराच्या सुमारास येऊन वस्तुस्थिती बघितली. मला धक्का बसला की, महानगरपालिका असेल एमआयडीसी असेल यांच्या मेन लाईनीवरून काही टँकर माफिया कनेक्शन घेतलेली आहेत. मी याबद्दल पोलिसांना सूचना दिलेल्या आहेत. त्यांच्यावरती पोलीस केसेस दाखल झाल्या पाहिजे”, अशी मागणी उदय सामंत यांनी केली.

पालिकेकडून नेमकं स्पष्टीकरण काय?

दरम्यान, महापालिकेच्या कनेक्शनवरून कोणताही अनधिकृत टँकर किंवा पाणीपुरवठा होत नाही, अशी भूमिका पालिका अधिकाऱ्यांनी घेतली. “रात्री आम्हाला आयुक्तांचे आदेश आले. त्यानुसार आम्ही या ठिकाणी येऊन पाहणी केली. तीन स्पॉटला रात्री पंचनामा करून प्रभाग क्षेत्र अधिकारी आणि अभियंता, तसेच संबंधित अधिकारी रात्री या ठिकाणी पंचनामे केले. मानपाडा पोलीस ठाण्याला गुन्हे दाखल केले. यामध्ये तीन केसेसमध्ये आम्हाला संशय असल्याने याबाबत आम्ही आज सविस्तर तपासणी केलेली आहे. आम्ही सगळ्यांची तपासणी केली की, त्यांचे पाण्याचे सोर्स काय आहे, तिन्ही ठिकाणी आम्हाला त्यांचे वैयक्तिक बोरवेल असल्याचं आढळून आले”, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली.

“स्थानिकांच्या खदानी आहेत. त्यामधला पाणी फिल्टर करून वापरला जात आहे. याबाबतची जी काही कागदपत्रे आहेत. ते प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांकडे सादर करणार आहे. मात्र यामध्ये महानगरपालिकेच्या कनेक्शन वरून कोणतेही अनधिकृत टँकर किंवा पाणीपुरवठा करण्यासाठी होत नाही, असा आढळून आलेला आहे”, अशी प्रतिक्रिया अधिकाऱ्यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us