Asaduddin Owaisi: ओवैसी आज भिवंडीत, मशिदीवरील भोंगे ते ज्ञानवापी… विशाल जनसभेतून निशाणा कुणावर?

| Updated on: May 28, 2022 | 10:23 AM

Asaduddin Owaisi: देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या काही प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ओवैसी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत असल्याने त्यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 

Asaduddin Owaisi: ओवैसी आज भिवंडीत, मशिदीवरील भोंगे ते ज्ञानवापी... विशाल जनसभेतून निशाणा कुणावर?
ओवैसी आज भिवंडीत, मशिदीवरील भोंगे ते ज्ञानवापी... विशाल जनसभेतून निशाणा कुणावर?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे: एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) आज भिवंडीत येत आहेत. भिवंडीत आज संध्याकाळी 7 वाजता त्यांची विशाल जनसभा होणार आहे. औरंगजेबाच्या कबरीवरून झालेला वाद, ज्ञानवापी मशिदीवरून निर्माण झालेला वाद, मशिदीवरील भोंगे हटवण्याची महाराष्ट्रात सुरू झालेली मोहीम आणि वाढती महागाई या पार्श्वभूमीवर ओवैसी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांच्यावरही ओवैसी निशाणा साधण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यामुळे या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. राज्यात महापालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे ओवैसी आजच्या सभेतून निवडणुकीचं रणशिंग फुंकतानाच जोरदार शक्तिप्रदर्शन करणार असल्याचंही सांगितलं जात आहे. ही सभा भव्यदिव्य करण्यासाठी एमआयएमच्या (AIMIM) कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. या सभेला राज्यभरातून एमआयएमचे कार्यकर्ते येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

आज संध्याकाळी 7 वाजता भिवंडीच्या धोबी तलावाजवळील परशुराम तावडे स्टेडियममध्ये ही जनसभा पार पडणार आहे. असदुद्दीन ओवैसी हेच या सभेला मार्गदर्शन करणार आहेत. या सभेला एमआयएमचे खासदार, आमदार आणि नगरसेवकही उपस्थित राहणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

राऊतांची टीका

दरम्यान, ओवैसी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी कालच ओवैसींवर निशाणा सादला होता. जिथे भाजपला ओवैसींची गरज असते, तिथे ते जात असतात. तो त्यांचा इतिहास आहे, अशी टीका राऊत यांनी केली आहे. ओवैसींची कदाचित भिवंडीत गरज असेल. त्यामुळे त्यांना भिवंडीत बोलावलं गेलं असेल. ओवैसी असो की आणखी कोणी असो. कोणी आमच्या राज्यात विष पसरवण्याचं काम करत असेल तर भिवंडीतील मुस्लिम त्यांना साथ देणार नाहीत, असं राऊत म्हणाले.

मौन राहू शकत नाही

दरम्यान, ओवैसी यांनी यापूर्वी एक ट्विट करून केंद्र सरकारवर हल्ला चढवला होता. यांच्या हिंदु्त्वामुळे भारत कमकुवत होत आहे. त्यामुळे आपण मौन राहून चालणार नाही, अशी टीका ओवैसी यांनी भाजपवर केली होती. ओवैसी आजच्या सभेतून मशिदीवरील भोंगे हटवण्याच्या मुद्द्यावर अधिक बोलण्याची शक्यता आहे. तसेच ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. आजच्या रॅलीत ओवैसींच्या रडारवर काँग्रेसही असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. देशात आणि राज्यात निर्माण झालेल्या काही प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर ओवैसी पहिल्यांदाच महाराष्ट्रात येत असल्याने त्यांच्या सभेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.