पहाटेचा शपथ विधी ही भाजपची चूक, उगाच धडा शिकवू नका; राज ठाकरे यांनी भाजपला सुनावले

मनसेतील ठाणे जिल्ह्यातील गटबाजीवर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. यापुढे पक्षात गटबाजी होणार नाही. म्हणून मी आलो आहे. व्यक्तीच्या महत्त्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी पक्ष काढला नाही. कुणाला अहंपणात जायचं असेल तर त्याला पदावर ठेवणार नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

पहाटेचा शपथ विधी ही भाजपची चूक, उगाच धडा शिकवू नका; राज ठाकरे यांनी भाजपला सुनावले
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 14, 2023 | 3:04 PM

अंबरनाथ : कर्नाटकात काँग्रेसला बंपर विजय मिळाला आहे. तर भाजपची अत्यंत नामुष्कीकारक हार झाली आहे. कर्नाटकात सत्ता असूनही भाजपला मोठा पराभव स्वीकारावा लागला आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून भाजपचे अनेक मंत्री कर्नाटकात तळ ठोकून होते. तरीही त्यांना जनतेने नाकारलं. त्यामुळे काँग्रेसमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. विरोधकांनीही जल्लोष व्यक्त केला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी हे काँग्रेसचं निर्भेळ यश असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हे काँग्रेसचं यश असून आमचं कोणीच वाकडं करू शकत नाही, असं समजणाऱ्या प्रवृत्तीचा हा पराभव असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. राज ठाकरे अंबरनाथच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

मागे एकदा मी माझ्या भाषणात म्हटलं होतं की विरोधी पक्ष कधी जिंकत नाही. सत्ताधारी हरत असतात. हा स्वभावाचा आणि वागणुकीचा पराभव आहे. आपलं कोण वाकडं करु शकतो? अशा प्रवृत्तीचा पराभव आहे. जनतेला कधीही गृहित धरू नका हा त्यातील बोध आहे. सर्वांनीच त्यातून बोध घ्यावा, असा टोला राज ठाकरे यांनी भाजपला नाव न घेता लगावला.

आताच कसं सांगणार?

कर्नाटकाच्या निकालाने महाराष्ट्रात बदलाचे संकेत आहेत असं वाटतं का? त्यावर राज ठाकरे यांनी थेट उत्तर दिलं नाही. आता काय सांगू शकणार? आता कर्नाटकाचा निकाल लागला आहे. पुढे काय आणि कसं कसं घडतं हे पाहावं लागणार आहे. त्यामुळे कर्नाटकाच्या निकालावरून आताच महाराष्ट्राबाबत भाष्य करता येणार नाही, असं राज यांनी स्पष्ट केलं.

मी काय ज्योतिषी आहे काय?

कर्नाटकाच्या विजयात भारत जोडो यात्रेचा स्पष्ट परिणाम झालेला दिसतो. तुमच्या मालकांनी बातम्या दाबल्या तरीही भारत जोडो यात्रेचा प्रभाव दिसतोय. तुम्ही कितीही नाकारलं तरीही या निकालात भारत जोडो यात्रेचा परिणाम झालेला आहे. मात्र पुढे हा प्रभाव राहील की नाही माहीत नाही. ते सांगायला मी काही ज्योतिषी आहे काय? असा सवाल त्यांनी केला.

उगाच सारवासारव नको

पहाटेचा शपथविधी हा ठाकरे गटाला दणका होता. ठाकरे गटाला धडा शिकवण्यासाठी हा शपथविधी होता, असं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले. त्याबाबत विचारले असता, तुमच्याकडून चूक झाली ती झाली. उगाच कुणाला धडे शिकवू नका. तुम्ही या गोष्टी केल्या. त्यानंतर महाराष्ट्राचं हे राजकारण झालं. उगाच सारवा सारवी करू नका, अशा शब्दात राज यांनी मुनगंटीवार यांना फटकारलं.

5 जूनला कार्यशाळा

येत्या 5 जून पासून ठाणे जिल्ह्यात प्रत्येक शहरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यशाळा सुरू होतील. पदाधिकाऱ्यांना कार्यक्रम दिले जाईल. महिन्यभरात काय काम करतात ते पाहू. अनेक पदं आहेत पण पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पदाची काय कामे असतात तेच माहीत नाही. ते त्यांना सांगितलं जाईल. त्याप्रमाणे त्यांना कामाला जुंपवलं जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us