भाजप आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी, खासदार श्रीकांत शिंदे राजीनामा द्यायला तयार

| Updated on: Jun 09, 2023 | 9:04 PM

भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील पहिला मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आज कॅमेऱ्यासमोर आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी आपण युतीसाठी आपल्या खासदारकीचा राजीनामा द्यायला देखील तयार असल्याचं मोठं वक्तव्य केलं आहे.

भाजप आणि शिवसेनेत वादाची पहिली ठिणगी, खासदार श्रीकांत शिंदे राजीनामा द्यायला तयार
Follow us on

मुंबई : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. विशेष म्हणजे या वादावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपण राजीनामा द्यायला तयार असल्याचं म्हटलं आहे. श्रीकांत शिंदे यांनी इतकं टोकाचं बोलण्यामागील कारणही समोर आलं आहे. भाजपचा कल्याणमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मदत न करण्याचा ठराव झालाय. तर दुसरीकडे श्रीकांत शिंदे यांनी युतीमध्ये विघ्न होत असेल तर आपण राजीनामा देण्यासाठी तयार असल्याचं श्रीकांत शिंदे म्हणाले आहेत. डोंबिवलीमध्ये काही नेत्यांकडून स्वार्थी राजकारणाचा प्रयत्न होत असल्याचा आरोप श्रीकांत शिंदे यांनी केलाय. भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेतील हा पहिला मोठा वाद चव्हाट्यावर आला आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात पोलीस अधिकाऱ्याच्या बदलीवरुन भाजप आणि शिवसेनेत वाद निर्माण झाला आहे. भाजपने संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला सहकार्य करायचं नाही, असा ठराव केलाय. विशेष म्हणजे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थित संबंधित पोलीस अधिकाऱ्याची बदली होत नाही तोपर्यंत शिवसेनेला मदत करायची नाही, असा ठराव झाल्याने श्रीकांत शिंदे संतापले आहेत.

श्रीकांत शिंदे नेमकं काय म्हणाले?

“भाजप नेते रविंद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य मी पाहिले. सोशल मीडियावरही वाचलं. मला वाटतं उमेदवार कोण असेल ते वरिष्ठ पातळीवर ठरवलं जाईल. जो योग्य उमेदवार असेल त्याला उमेदवारी दिली जाईल. पण मला एकच सांगायचंय, ही युती वेगळ्या विचाराने झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका विचाराने महाराष्ट्रात युती स्थापन केली. युती झाल्यानंतर महाराष्ट्रात सरकार स्थापन केलं. युती आल्यानंतर सरकार स्थापन केलं. सरकारच्या माध्यमातून चांगलं काम होतंय”, असं श्रीकांत शिंदे सुरुवातीला म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘आम्हाला आव्हानं देण्याचं काम या लोकांनी करु नये’

“कोणत्या तरी सिनियर पीआयवर कारवाई होत नाही तोपर्यंत हे ठराव करतात की, शिवसेनेला सपोर्ट करायचा नाही. त्याचबरोबर कल्याण लोकसभेचा उमेदवार भाजपच ठरवणार. हे आव्हानं खूप विचारपूर्वक केली पाहिजे. आम्हाला आव्हानं देण्याचं काम या लोकांनी करु नये. कारण एकनाथ शिंदे यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली जे केलं याचाही विचार त्यांनी केला पाहिजे. एकनाथ शिंदे यांनी हे पाऊल उचललं नसतं तर काय परिणाम झाले असते याचाही विचार झाला पाहिजे”, असं श्रीकांत शिंदे भाजप नेत्यांना उद्देशून म्हणाले.

‘मी भाजप नगरसेवकांना 55 कोटींचा निधी दिला’

“युती जेव्हापासून आहे, गेल्या नऊ वर्षांपासून मी खासदार आहे. मला दोन वेळा नागरिकांनी निवडून दिलं आहे. तेव्हापासून दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन जाण्यासाठी मी काम करतोय. निधीचा विषय असेल तर मी आताच उल्हासनगरमधील भाजप नगरसेवकांना 55 कोटी देण्याचं काम केलं. त्याचा जीआरही काढण्यात आला. काही दिवसांमध्ये टेंडर निघतील”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

‘युतीमध्ये मिठाचा खडा…’

“काम चांगलं चालू असताना कुणीही युतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करु नये. सगळ्यांनी युतीसाठी काम केलं पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 2024 मध्ये पुन्हा पंतप्रधान म्हणून कसे निवडून येतील यासाठी काम केलं पाहिजे. यासाठी कोणताही स्वार्थ ठेवू नये. मलाही कोणताच स्वार्थ नाही. मला सांगितलं की, कल्याण लोकसभेचा राजीनामा द्या. तर मी राजीनामा द्यायला तयार आहे आणि पूर्णपणे पक्षासाठी युतीचं काम करायला मी तयार आहे”, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.

‘तुम्हाला चांगला उमेदवार मिळतोय तर…’

“उद्या मला पक्ष नेतृत्वाने सांगितलं किंवा तुम्ही सांगा, तुम्हाला कल्याण लोकसभेसाठी एखादा चांगला उमेदवार मिळतोय तर त्याला निवडून आणण्यासाठी तुम्ही जसं काम कराल तसं मी सुद्धा काम करेन. 2024 मध्ये नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजेत, एवढा शुद्ध हेतू आमचा आहे. यामध्ये आमचा कुठलाही स्वार्थ नाहीय”, असंही ते म्हणाले.