ठरलं! एकमेकांच्या विरोधात जायचं नाही, बोलायचं नाही, ठाणे, केडीएमसी, पालघरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार?

| Updated on: Feb 19, 2022 | 5:56 PM

ठाण्यासह पालघर, केडीएमसी, नवी मुंबईत राष्ट्रवादीनेही शिवसेनेशी आघाडी करण्यावर एकमत व्यक्त केलं आहे. आज राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय अवलोकन करण्यात आले. त्यानंतर एकमताने महाविकास आघाडी व्हावी, अशीच इच्छा व्यक्त करण्यात आली.

ठरलं! एकमेकांच्या विरोधात जायचं नाही, बोलायचं नाही, ठाणे, केडीएमसी, पालघरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार?
ठाणे, केडीएमसी, पालघरमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीची आघाडी होणार!
Follow us on

ठाणे: ठाण्यासह पालघर, केडीएमसी, नवी मुंबईत राष्ट्रवादीनेही (ncp) शिवसेनेशी  (shivsena) आघाडी करण्यावर एकमत व्यक्त केलं आहे. आज राष्ट्रवादीच्या सर्व जिल्हाध्यक्षांची संयुक्त बैठक पार पडली. या बैठकीत संपूर्ण जिल्ह्याचे राजकीय अवलोकन करण्यात आले. त्यानंतर एकमताने महाविकास आघाडी व्हावी, अशीच इच्छा व्यक्त करण्यात आली. त्याचप्रमाणे यापुढे महाविकास आघाडीमधील घटक पक्षांच्या विरोधात कोणीही बोलू नये, असे आमचे आपापसात ठरविण्यात आले आहे. समोरुन जरी कोणी बोलले तरी प्रत्युत्तर द्यायलाच हवे, असे काही नाही. आपला प्रमुख प्रतिस्पर्धी हा भाजप आहे. भाजप या शहरात, जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात वाढू द्यायची नसेल तर महाविकास आघाडी आवश्यक आहे, असे सर्वच अध्यक्षांचे मत आहे. त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी महाविकास आघाडी गरजेची आहे. त्यासाठीच सर्व जिल्हाध्यक्षांनी महाविकास आघाडी करण्याबाबत आपले मत नोंदविले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र (jitendra awhad) यांनी दिली.

महाविकास आघाडीचा निर्णय घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड यांच्या निवासस्थानी एक संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीला ठाणे शहर-जिल्हाध्यक्ष तथा ठाणे पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे, ठाणे ग्रामीणचे अध्यक्ष दशरथ तिवरे, कल्याण-डोंबिवलीचे अध्यक्ष जगन्नाथअप्पा शिंदे, कल्याण-डोंबिवलीचे कार्याध्यक्ष वंडारशेठ पाटील, नवी मुंबई अध्यक्ष अशोक गावडे, उल्हासनगर अध्यक्ष पंचम कलानी, मीरा-भाईंदर जिल्हाध्यक्ष अंकुश मालुसरे, अंबरनाथचे अध्यक्ष सदामामा पाटील, बदलापूर अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले आदी उपस्थित होते. या बैठकीनंतर आव्हाड पत्रकारांशी बोलत होते.

आघाडी फायद्याची ठरेल

महाराष्ट्रात एकत्र येऊन राज्य पातळीवर एकमेकाला साह्य करीत भाजपच्या प्रवृत्तीविरुद्ध आपण लढत आहोत. जसे संजय राऊत यांच्या बाजूने सुप्रिया सुळे उभ्या राहिल्या आहेत किंवा शरद पवार हे जसे वारंवार सर्वच नेत्यांची बाजू लढवित आहेत. त्याचधर्तीवर राज्यभर पक्षविरहीत वातावरण संपूर्ण राज्यात निर्माण व्हायला हवे, अशी सर्वच कार्यकर्त्यांची इच्छा आहे. कारण, महानगर पालिका निवडणुकांनंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणार आहेत. कार्यकर्त्यांचे मनोमिलन फार गरजेचे आहे. त्यामुळेच सर्वांनी एकमताने महाविकास आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही महाविकास आघाडी सर्वांनाच फायद्याची ठरणार आहे, असं त्यांनी सागितलं.

आघाडी होणे ही लोकभावना

शिवसेनेची चर्चा करणार का, याबाबत पत्रकारांनी विचारले असता, आज आम्ही पक्षांतर्गत चर्चा केली आहे. निवडणुका कधी जाहीर होतील, याचा काही स्पष्ट अंदाज येत नाही. आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे. आमच्यातर्फे ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे हे चर्चा करणार आहेत. शिवाय, या चर्चेसाठी प्रत्येक जिल्हास्तरावर तीन ते चार जणांची समिती नेमून तेही या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. गेल्या तीन ते चार दिवसांपासून पालकमंत्री एकनाथ शिंदे हे मुलाखती देत आहेत, त्याकडे पाहता, ते सकारात्मक भूमिका घेत असल्याचे दिसून आल्यानेच आम्ही पुढाकार घेऊन हा निर्णय घेतला असून त्यामुळे भाजपला पराभूत करणे शक्य होणार आहे. महाविकास आघाडी होणे ही लोकभावना आहे. आपला वैचारिक शत्रू संपवायचा असेल तर काय करायला हवे, हेच आपण सांगत आहोत, असंही ते म्हणाले.

100 ते 200 मतांचाही परिणाम होतो

राष्ट्रवादीने जरी भूमिका घेतली असली तरी शिवसेनेचे काही पदाधिकारी विरोधी भूमिका घेत आहेत, त्यांना काय सल्ला देणार, असे विचारले असता, मी त्यांचा नेता नाही. त्यांना एकनाथ शिंदे सल्ला देतील. मात्र, एकदा नेत्याने भूमिका घेतल्यावर पदाधिकार्‍यांनी बोलू नये, असे संकेत आहेत. त्यामुळेच या पुढे राष्ट्रवादीकडून आघाडीबाबत अन्य कोणीही बोलणार नाही, असे आपण जाहीर केले आहे. तापलेले वातावरण निवळण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. शिवाय, आघाडी असली की त्यामध्ये वाद असतातच पण, एक-दुसर्‍याला सावरल्याशिवाय, एकवाक्यता आणल्याशिवाय तुम्ही उभेच राहू शकत नाही. 105 संख्या असलेल्या भाजपला शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने सत्तेबाहेर ठेवले. हा गणिती भाग आहे. याचा विचार करुनच काम केले पाहिजे. पालिका निवडणुकीत 100 ते 200 मतांचाही परिणाम होत असतो. ही मते पालिकेचे चित्र बदलवणारे ठरु शकतात, असंही त्यांनी सांगितलं.

 

संबंधित बातम्या:

जितेंद्र आव्हाडांच्या कार्यक्रमापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये राडा, उल्हासनगरमध्ये काय घडलं?

Kalyan : रेल्वे प्रवाशांना दमदाटी करून लुबाडणारे तिघे गजाआड, सीसीटीव्हीच्या आधारे अटक, कल्याण रेल्वे पोलिसांची कारवाई

Video : वडापाव बिलाच्या व्हिडीओनं धावाधाव, भाजप कार्यकर्त्यांकडून वादावर पडदा; जितेंद्र आव्हाड यांचंही टीकास्त्र