ठाणे: कळव्यात अज्ञात इसमांनी लसीकरण मोहिमेचं पोस्टर फाडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोस्टर फाडणाऱ्या माथेफिरुंवर त्वरीत कारवाई करा अन्यथा आम्ही उग्र आंदोलन करू, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
कळवा येथे अज्ञात इसमाने राष्ट्रवादीने लावलेले कोरोना लसीकरणाचं आवाहन करणारं भलं मोठं पोस्टर फाडलं. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह इतरांचे फोटो होतो. या पोस्टरवरून नागरिकांना कोरोनाची लस घेण्याचं आवाहन करण्यात आलं होतं. हे पोस्टर फाडल्याचं लक्षात आल्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते चांगलेच संतापले आहेत.
पोस्टर फाडल्याची घटना समजल्यानंतर गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही, असा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.
तर या बाबत समाजकंटकाला पकडून कारवाई केली नाही तर आम्ही 24 तासात पोलीस ठाण्याला घेराव घालू. कायदा सुव्यवस्था प्रश्न जर उपस्थित झाला तर त्याला पोलीसच जबाबदार असतील, असा इशारा माजी खासदार व ठाणे शहर राष्ट्रवादी अध्यक्ष आनंद परांजपे यांनी दिला आहे..
पालिका प्रशासन लसीकरण करत असताना मात्र सेनेकडून खारेगाव लसीकरण ठिकाणी सेनेची बॅनर बाजी करण्यात आली आहे. लसीकरण बनवण्याचे काम काय सेनेने चालू केले का? हे लसीकरण प्रशासन आणि महाविकास आघाडी मार्फत पालिकेने सुरू केले आहे. त्यामुळे हे श्रेय महाविकास आघाडीला आहे नुसते सेनेला नाही, असं परांजपे यांनी म्हटलं आहे. ज्या ज्या वेळी पालिकेकडून लसीकरण मोहीम राबविली जाते. तेव्हा तेव्हा शिवसेनेकडू बॅनरबाजी होत असल्याचं दिसून येतं. ठाणे पालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा हे काय लवकरच शिवसैनिक होणार का? असा सवालही त्यांनी केला आहे.
कळव्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेची लोकांना माहिती देण्यासाठी म्हणून लावण्यात आलेले बॅनर काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी फाडले. त्याबद्दल पोलिसांनी तातडीने दखल घ्यावी. अन्यथा, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काही उग्र भूमिका घेतली तर त्याची जबाबदारी आमच्यावर असणार नाही.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 16, 2021
संबंधित बातम्या:
अंबरनाथमध्ये मॉर्निंग वॉक करणाऱ्या महिलेचं मंगळसूत्र लांबवलं, घटना सीसीटीव्हीत कैद
उल्हासनगरात ऑन ड्युटी पोलिसावर चाकूने हल्ला, घटनेने परिसरात खळबळ
(NCP’s vaccination banner torn in thane)