Maharashtra MLC Election: जिंकण्यासाठी भाजप 20 मते कुठून आणणार? चोऱ्यामाऱ्याच करणार ना?; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

| Updated on: Jun 19, 2022 | 10:51 AM

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुंचला, लेखणी आणि वाणी या शस्त्रांचा वापर करून आधी मराठी माणूस, महाराष्ट्रावरील अन्यायाला वाचा फोडली. आंदोलन उभं केलं. देशभरातील भूमिपुत्रांच्या प्रश्नांना वाचा फोडली. स

Maharashtra MLC Election: जिंकण्यासाठी भाजप 20 मते कुठून आणणार? चोऱ्यामाऱ्याच करणार ना?; राऊतांचा भाजपवर हल्लाबोल
संजय राऊत
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

ठाणे: राज्यातील हॉटेल पॉलिटिक्सला जबाबदार कोण आहे? आमदारांना ट्रेनिंगची गरज असते. सर्व आमदारांना एकत्रं आणलं जात आहे. पूर्वी होत नव्हतं. आता होत आहे. महाराष्ट्रात एक पोलिटिकल पार्टी आहे. ज्यांच्याकडे दोन वोट ज्यादा आहे. त्यांना जिंकण्यासाठी 20 मते हवी आहेत. ते कुठून आणणार? चोऱ्यामाऱ्या करूनच मते मिळवणार ना. दहशत आणि दबाव आणूनच मते मिळवली जाणार ना? म्हणून या आमदारांना हॉटेलात ठेवले आहे. दहशत दबाव हे सर्व प्रकार लोकशाहीत खुलेआम सुरू आहे. पूर्वी लपून छपून करत होते. आता खुलेआम करत आहेत, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी केली. मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांनी ही टीका केली. तसेच आघाडीत (mahavikas aghadi) उत्तम समन्वय असल्याचा दावा करत असतानाच भाजप (bjp) अफवा पसरवत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

आघाडीत समन्वय नसल्याच्या बातम्या पसरवल्या जात आहेत. तिन्ही पक्षाचे नेते एकमेकांच्या संपर्कात आहेत. कोणी कसे मतदान करावं याचे निर्णय झाले आहेत. भाजपने कितीही अफवा पसरवल्या तरी त्याचं त्यांना फळ मिळणार नाही, असं राऊत म्हणाले.

हे सुद्धा वाचा

आघाडीची मते बाद करण्याचा डाव

नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांना मतदानाचा हक्क नाकारला आहे. 302 कलमाखालील कैद्यालाही मतदानाचा हक्क असतो. खूनाच्या आरोपींनाही मतदान करू दिले जाते. मलिक आणि देशमुख तर आमदार आहेत. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आहेत. ज्यांची आमदारकी शाबूत आहे अशा सदस्यांना मतदानाचा हक्क नाकारला जातोय तो कोणत्या न्यायाने?हे दबावाने होत आहे. आघाडीची दोन मते बाद करण्यासाठी हा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी केला.

शिवसेनेने प्रादेशिक पक्षांची मुहूर्तमेढ रोवली

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कुंचला, लेखणी आणि वाणी या शस्त्रांचा वापर करून आधी मराठी माणूस, महाराष्ट्रावरील अन्यायाला वाचा फोडली. आंदोलन उभं केलं. देशभरातील भूमिपुत्रांच्या प्रश्नांना वाचा फोडली. सरकारने लक्ष घातलं नाही तर वणवा देशात पोहोचू शकतो याची दखल सरकारने घेतली. आधी बाळासाहेबांवर प्रांतीयवादी असा शिक्का मारला गेला. तीन महिनेही हा पक्ष चालणार नाही असं लोक म्हणत होते. लोक हसत होते. आज संपूर्ण देशात प्रादेशिक पक्षांचंच राजकारण सुरू आहे. बाळासाहेबांनी जी प्रादेशिक पक्षांची मुहूर्तमेढ रोवली त्यातून देशभर प्रादेशिक पक्ष निर्माण झाले. भूमिपुत्रांची भूमिका घेऊनच हे पक्ष उभे राहिले. देशाचं राजकारण प्रादेशिक पक्षाच्या करंगळीवर उभं आहे. याचं श्रेय शिवसेनेचं. ही शिवसेना देशाच्या तख्तापर्यंत राजकारण करत आहे, असं राऊत म्हणाले.

अबतक छप्पन. आगे भी जायेंगे

आज शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन आहे. अबतक छप्पन. आगे भी जायेंगे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमदार, पदाधिकाऱ्यांना संबोधित करतील. वर्धापन दिनी शिवसेना पक्षप्रमुखांनी केलेलं भाषण देशाला दिशादर्शक ठरतं, असंही त्यांनी सांगितलं.