ठाणे : केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या भिवंडी शहरातील जन आशीर्वाद यात्रेला गालबोट लागलंय. या ठिकाणी जन आशीर्वाद यात्रा तब्बल अडीच तास उशिराने सुरू झाली. त्यामुळे ठिकठिकाणी तयार केलेल्या मंचावर वाद्यवृंद वाजवून नागरीकांना खिळवून ठेवण्यात आलं. मात्र, याच दरम्यान, धामणकर नाका येथे अतिउत्साही कार्यकर्त्यांनी टिकटॉक स्टारला एका छोट्या स्टेजवर आणून कार्यक्रम सुरू केल्यानं मोठी गर्दी जमा झाली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा झाला आणि चेंगराचेंगरी सुद्धा झाली. यामुळे या जन आशीर्वाद यात्रेला गालबोट लागलं.
केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या जन आशीर्वाद यात्रेचे भिवंडी शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. राजनोली नाका येथे कपिल पाटील यांचे आगमन होताच भव्य फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर भादवड टेमघर या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यात शिवसेना नगरसेवक बाळाराम चौधरी व स्थानिक शिवसेना शाखाप्रमुख, गट प्रमुख शिवसैनिक यांनी त्यांचे भव्य स्वागत करून सर्वांना अचंबित केले. एस टी स्टँड येथील स्वागत कार्यक्रमात तृतीयपंथीय नागरीकांनी सुध्दा स्वागत केले आहे .
सरळगाव येथे जन आशिर्वाद यात्रेचे स्वागत करण्यासाठी मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. यावेळी पूरामुळे घर वाहून गेलेल्या ३ कुटुंबांना तात्काळ मदत म्हणून कपिल पाटील फाउंडेशन मार्फत प्रत्येकी रू. ११ हजारांची मदत करण्यात आली.#JanAshirvadYatra #जन_आशीर्वाद_यात्रा pic.twitter.com/wsJ8n98XIz
— Kapil Patil (@KapilPatil_) August 19, 2021
यानंतर अशोक नगर, लाहोटी कंपाऊंड, कल्याण नाका, एस टी स्टँड येथे स्वागत स्वीकारत शिवाजी चौक या ठिकाणी यात्रा पोहचली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करीत भाजपा महिला पदाधिकाऱ्यांरी टाळ वाजवत यात्रेत सहभागी झाल्या. शहरातून मार्गक्रमण करत यात्रा धामणकर नाका येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. पावसाची रिपरिप सुरू असतानाही महिला पुरुष मोठ्या संख्येने स्वागताला हजर होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेचे आशीर्वाद घेण्याचे आदेश दिल्यानंतर केंद्रीय मंत्र्यांकडून जन आशीर्वाद यात्रा काढली जातेय. मात्र यात्रेत प्रचंड गर्दी होताना दिसतेय. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाले असल्याने आम्ही या यात्रेनिमित्त ठिकठिकाणी 50-100 नागरिकांना एकत्रित होण्याच्या सूचना दिल्या. परंतु, नागरिकांचा उत्साह प्रचंड असल्याने काही ठिकाणी गर्दी झाली, असं स्पष्टीकरण कपिल पाटील यांनी दिलं. तसेच यासाठी शासनाने त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे चुकीचे असल्याचं म्हटलं.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी जन आशीर्वाद यात्रा ही जन आक्रोश यात्रा असल्याची टीका केली. यावर बोलताना कपिल पाटील म्हणाले, “लोकशाही आहे कोणीही काहीही बोलू शकतो. लोक या यात्रेत आशीर्वाद देण्यासाठी येत आहेत. मोदींवर प्रेम व्यक्त करण्यासाठी येत आहेत. याला जर ते आक्रोश समजत असतील तर ते दुर्दैवी आहे.” देशातील ग्रामपंचायतींसोबत या भागातील महानगरपालिका क्षेत्राच्या प्रस्तावांना मान्यता मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. भिवंडी शहरातील विकास कामे देवेंद्र फडणवीस सरकार काळात आम्ही मंजूर करून घेतली, पण महाविकास आघाडी सरकारने त्याला खीळ घातली. याचा आम्ही त्यांना जाब विचारु, असं म्हणत पाटील यांनी काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी पक्षावर टीका केली.
Stampede in Jan Ashirvad Yatra of Kapil Patil in Bhivandi