diva dumping ground: नाकात दम आणणारा दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड हटवला जाणार, 14 वर्षानंतर दिवेकरांची वनवासातून सुटका

| Updated on: Dec 02, 2021 | 6:35 PM

दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड अखेर हटवण्यात येणार आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी ठाणे महापालिकेने दहा एकर जागा घेतली आहे. त्यामुळे दिवा येथील नागरिकांची डम्पिंगच्या दुर्गंधीतून सुटका होणार आहे.

diva dumping ground: नाकात दम आणणारा दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड हटवला जाणार, 14 वर्षानंतर दिवेकरांची वनवासातून सुटका
diva dumping ground
Follow us on

ठाणे: दिवा येथील डम्पिंग ग्राऊंड अखेर हटवण्यात येणार आहे. डम्पिंग ग्राऊंडसाठी ठाणे महापालिकेने दहा एकर जागा घेतली आहे. त्यामुळे दिवा येथील नागरिकांची डम्पिंगच्या दुर्गंधीतून सुटका होणार आहे. गेल्या 14 वर्षापासून स्थानिक नागरिक या डम्पिंगमुळे त्रस्त होते. अखेर 14 वर्षाच्या वनवासातून स्थानिकांची सुटका होणार आहे.

दिवा येथील डंपिंग ग्राऊंडचा प्रश्न कायमस्वरुपी सुटला असून कचरा विल्हेवाटीसाठी भंडार्ली येथील जागा महापालिकेने ताब्यात घेतली आहे. आज जागाताबा करारनाम्यावर महापौर नरेश म्हस्के यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वाक्षऱ्या केली. त्यामुळे आता दिवावासियांची डंपिंगच्या त्रासातून मुक्तता होणार आहे. राज्याचे नगरविकास तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने ताब्यात आलेल्या भंडार्ली येथील जागेवर लवकरच शास्त्रोक्त पद्धतीने घनकचरा विघटन प्रकल्प सुरू होणार असल्याचे महापौर व आयुक्तांनी स्पष्ट केलं.

10 एकर जागा ताब्यात घेतली

ठाण्यातील कचरा दिवा येथील डंपिंग ग्राऊंडवर टाकला जात होता. कचऱ्याची ही समस्या दिवसेंदिवस उग्र रुप धारण करीत होती. ठाणे महापालिकेच्या माध्यमातून कचऱ्याची विल्हेवाट लावता यावी यासाठी महापालिकेला स्वत:ची जागा असावी यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून जागेची पाहणी करण्याचे काम सुरू होते. अखेर मौजे भंडार्ली येथील अंदाजे 10 एकर खासगी जागा भाडेतत्वावर महापालिकेने ताब्यात घेतली आहे. या जागाताबा करारनाम्यावर आज महापौर नरेश म्हस्के व सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी स्वाक्षरी केली.

शास्त्रोक्त पद्धतीने कचऱ्याचे विघटन होणार

यावेळी दिवावासियांनी गेल्या अनेक वर्षापासून ठाणे शहराची गैरसोय होवू नये यासाठी ठाणे शहराचा कचरा दिवा येथील डंपिंगग्राऊंडवर टाकण्याची परवानगी दिली होती. वाढत्या लोकसंख्येबरोबर शहरातील वाढणारा कचऱ्यामुळे दिवावासियांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत होता. मात्र भंडार्ली येथे जागा उपलब्ध झाल्यामुळे दिवावासियांची डंपिंग्र गाऊंड समस्येतून मुक्तता होणार असल्याचे सांगत महापौर नरेश म्हस्के यांनी ‍दिव्यातील स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांचे आभार व्यक्त केले. भंडार्ली येथील जागा नागरी वस्तीपासून दूर असल्यामुळे तसेच येथे येणाऱ्या कचऱ्याचे शास्त्रोक्त पद्धतीने विघटन होणार आहे. त्यामुळे नागरिकांना याचा कोणताही त्रास होणार नाही याची काळजी महापालिका घेणार आहे. त्यामुळे सर्वपक्षीय नेत्यांनी विरोधाला विरोध न करता या प्रकल्पाला सहकार्य करण्याचे आवाहनही महापौर नरेश म्हस्के यांनी केले.

लवकरच प्रकल्प सुरू होणार

महापालिकेच्या या स्वत:च्या जागेवर कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबतचे काम येत्या दोन आठवड्यात पूर्ण होणार आहे, तसेच या प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या शासनस्तरावरील सर्व परवानग्या मिळण्याकामी पूर्तता केली आहे. त्याला मंजूरी मिळेल व लवकरच हा प्रकल्प सुरू होईल, असा विश्वास आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी यावेळी व्यक्त केला.

 

संबंधित बातम्या:

शेवटी शोध संपला ! अपहरण नव्हे हा तर खून, मुलगी नको म्हणून आईनेच काटा काढला, लेकीची पाण्यात बुडवून हत्या

Omicron Update | कर्नाटकमध्ये ओमिक्रॉनचे दोन रुग्ण सापडले, महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

मिर्झापूर-2 मधील ललित अर्थात ब्रह्मा मिश्राचा धक्कादायक मृत्यू, तीन दिवस बाथरूममध्येच मृतदेह पडून