
पुणे : राज्यात हळूहळू थंडीचा जोर वाढत चालला आहे. उशिरा पर्यन्त पाऊस सुरू असल्याने यंदाच्या वर्षी थंडीचा कहरच होईल अशी चर्चा सुरू झाली होती. त्यातच राज्यातील शुक्रवारी यंदाच्या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. खरंतर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून जगप्रसिद्ध आहे. मात्र, महाबळेश्वर पेक्षाही राज्यातील जळगाव शहरात नीचांकी तापमान होते. जळगावमध्ये काल 10.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली तर पुण्यात 11.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं आहे. त्या खालोखाल नाशिक आणि पुण्याच्या तापमानाची नोंद समोर आली आहे. नाशिक आणि पुण्यात 11.2 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. त्यानंतर अहमदनगर मध्ये 11.4 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आणि मग त्यानंतर थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरमध्ये 12 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाल्याचे समोर आले आहे.
राज्यात थंडीचा जोर वाढत चालला असून पुढील काळात आणखी नीचांकी तापमानांची नोंद होणार असून राज्यात हाड गोठवणारी थंडी असणार हे निश्चित मानलं जात आहे.
हवामान विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या पत्रकात यंदाच्या वर्षी राज्यातील सर्वात कमी तापमान हे महाबळेश्वर पेक्षाही जळगावमध्ये असल्याचे समोर आले आहे.
जळगाव नंतर नाशिक, पुणे आणि नंतर अहमदनगर शहराचा नंबर आहे. येत्या काळात आणखी थंडीचा जोर वाढणार असल्याने पारा चार ते पाच अंश सेल्सिअसच्या खाली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
उत्तरेकंदील परदेशातून थंड आणि कोरड्या वाऱ्यामुळे तापमानाचा पारा घसरल्याचे सांगितलं जात आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील तापमानात अचानक घट झाली आहे.
राज्यातील जळगाव, नाशिक, पुणे, अहमदनगर, कोल्हापूर, औरंगाबाद, परभणी, नागपूर आणि सांगली या ठिकाणचा पारा घसरला असून एकप्रकारे राज्यात हुडहुडीचं चित्र बघायला मिळत आहे.