7 महिन्यात 3 जणांचा मृत्यू…IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांचा एकच संताप, नामांकित शिक्षण संस्थेत नेमकं काय घडतंय?
पवईच्या आयआयटी मुंबईत 7 महिन्यात 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. यामुळे IIT मुंबईच्या विद्यार्थ्यांकडून एकच संताप व्यक्त केला जात आहे.

पवईच्या आयआयटी मुंबई या शिक्षण संस्थेचा देशातील नामांकित शिक्षण संस्थेत समावेश होतो. परंतु मागील काही महिन्यांपासून या संस्थेत अनेक विद्यार्थ्यांनी टोकाचा निर्णय घेतल्याच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपूर्वी साहिल वाकोडे नावाचा विद्यार्थी परीक्षेदरम्यान चॅटजीपीटीवरून कॉपी करताना आढळला. त्यामुळे संस्थेत दुसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या साहिलने घाबरून टोकाचा निर्णय घेतल्याचं सांगितले जात आहे. या घटनेने पवईच्या आयआयटी मुंबईत एकच खळबळ उडाली. मागील सात महिन्यात आयआयटी मुंबईतील ही तिसरी घटना आहे. या घटनेच्या विरोधात 400 हून विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये जमत निषेध नोंदवला. त्यांनी या घटनेवरून कॉलेज प्रशासनाला जाब विचारला.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्वितीय वर्षात शिक्षण घेणारा साहिल वाकोडे हा शुक्रवारी सायंकाळी परीक्षेदरम्यान प्रश्नपत्रिकेचा फोटो काढणे आणि प्रश्न मिळवण्यासाठी चॅटजीपीटीवर अपलोड करताना पकडला गेला. आयआयटी मुंबईच्या प्रशासनाच्या माहितीनुसार, या विद्यार्थ्यावर कोणतीही कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली नव्हती. विभागप्रमुख आणि प्राध्यापकांनी या विद्यार्थ्यांची समजूत काढली होती. या घटनेचा तुझ्या करिअरवर कोणताही वाईट परिणाम होऊ देणार नाही, अशी समजूत काढली. समुपदेशकानंतर साहिल हॉस्टेलवर गेला. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास त्याचा मृतदेह हॉस्टेलच्या रुममध्ये सापडला.
साहिलच्या मृत्यूनंतर विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. विद्यार्थ्यांच्या दाव्यानुसार, साहिलला एका वर्ष निलंबन करण्याची धमकी दिली होती. हॉस्टेल रिकामे करून कॅम्पसच्या बाहेर जाऊन राहण्यास सांगितलं होतं. कॉलेज प्रशासनाच्या कारवाईनंतर बीटेकच्या कोर्सला 4 वर्षांहून अधिक काळ लागला असता. त्यामुळे मानसिक तणावात येऊन साहिलने टोकाचं पाऊल उचललं असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आयआयटी मुंबईमध्ये वारंवार होणाऱ्या विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या घटनेने सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. कॉलेजमधील एका विद्यार्थ्याने सांगितले की, आम्ही कारवाईची मागणी करत आहोत. ही पहिली घटना नसून मागील दोन महिन्यातही दोघांचा मृत्यू झाला. वारंवार या घटना का घडत आहेत, यामागील काय कारणे आहेत. याप्रकरणी आम्हाला पूर्णपणे अंधारात ठेवलं जात आहे.