रात्रीचाच लय बेक्कार त्रास होतोय… विखे पाटील अचानक रुग्णालयात येताच जरांगेंची तक्रार; काय झाली चर्चा?
मनोज जरांगे पाटील उपोषणानंतर गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने राधाकृष्ण विखे पाटलांनी भेट घेतली. यावेळी जरांगेंनी "रात्रीचा लय बेक्कार त्रास होतोय" अशी तक्रार केली. विखे पाटलांनी त्यांना धीर देत, तब्येतीची काळजी घेण्यास सांगितले.

उपोषण सोडल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरच्या गॅलेक्सी रुग्णालयात उपचार घेत आहेत. उपोषणामुळे अशक्तपणा आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल रात्री जरांगे पाटील यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना भेटण्यासाठी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील हे रुग्णालयात आले होते. यावेळी विखे पाटील यांनी त्याची विचारपूस केली असता, रात्रीचाच लय बेक्कार त्रास होतोय, अशी तक्रारच मनोज जरांगे यांनी विखे पाटील यांच्याकडे केली.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अचानक गॅलेक्सी रुग्णालयात आले. यावेळी त्यांनी जरांगे यांची आस्थेवाईक विचारपूस केली. रात्री खूप त्रास होतो. लय बेक्कार त्रास होतो, असं जरांगे यावेळी म्हणाले. त्यावर आपण काळजी घ्या. पाच सहा दिवसात तुम्ही बरे व्हाल. मी केवळ तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो आहे. तुम्ही काळजी करू नका. सर्व काही ठरल्याप्रमाणे होणार आहे. तुम्हाला लेटर पाठवतो. समित्यांसाठी तुम्ही नावे पाठवली की जीआर काढता येईल, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
अचानक दरदरून घाम फुटला
यावेळी त्यांनी जरांगेंवर उपचार करणारे डॉक्टर चावरे यांच्याशीही चर्चा केली. 20 दिवसाच्या उपोषणामुळे त्यांना त्रास होत आहे. क्रॅम्प होतोय. त्रास होतोय. काल बरं वाटत होतं. पण परत त्यांना त्रास सुरू झाला. उठायची चालायची सवय नाही, त्यामुळे चालताना अधिक त्रास होतो. काल अचानक दरदरून घाम आला होता. बाथरूमला गेल्यावरच त्यांना घाम फुटला होता. बाथरूम उघडं ठेवलं म्हणून त्यांना त्रास झाल्याचं समजलं, असं डॉक्टर चावरे म्हणाले. त्यावर त्यांना ऑक्सिजन द्या. म्हणजे त्यांना झोप लागेल. जेवढी एनर्जी वाढेल, तेवढा फायदा होईल, असं विखे पाटील म्हणाले. तर, तीन चार दिवस काही पोटात नव्हतं. झोप नव्हती. त्यामुळे त्यांना त्रास होत असल्याचं डॉक्टरांनी सागितंल.
दोन चार दिवसात बरे होतील
दरम्यान, यावेळी विखे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. जरांगे पाटील यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आलो होतो. त्यांना अशक्तपणा आला आहे. काल रात्री त्यांना पुष्कळ त्रास झाला. गॅलेक्सी हॉस्पिटल हे त्यांच्यासाठी घरच आहे. डॉ. चावरे त्यांची नेहमीच देखभाल करत आले आहेत. त्यांच्यावर बारकाईने लक्ष देऊन आहेत. दोन चार दिवसात जरांगे बरे होतील, असा विश्वास आहे, असं विखे पाटील म्हणाले.
लगेच जीआर काढू
यावेळी त्यांनी समित्यांवरील नियुक्त्यांवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मराठा आरक्षणाबाबत जिल्हा पातळीवर समिती काम करत आहे. त्यासाठी काही नावे हवी होती. ही नावे आल्यावर जीआर काढायचा आहे. दाखले मिळण्यात अडचणी येत होत्या. कागदपत्र मिळत नव्हत्या. त्या दूर करण्यासाठी समित्या स्थापन करायच्या आहेत. कागदपत्र मिळत नव्हती. अधिकृत जिल्हाधिकारी स्तरावर एसओपी तयार केलं होतं. त्यानुसार जिल्हाधिकारी स्तरावर समिती स्थापन करत आहोत. त्यामुळे प्रमाणपत्र मिळण्यातील अडचणी दूर होईल, असं विखे पाटील म्हणाले.
