लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघातील महायुतीचा उमेदवारीचा पेच कायम आहे. या ठिकाणी नारायण राणे, किरण सावंत यांच्यासह ११ इच्छुकांनी २८ उमेदवारी अर्ज नेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा २०२३मधील राज्य कर निरीक्षक संवर्गाच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला. राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बच्चू कडू यांच्या अमरावती लोकसभेतील प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आजपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.
महाविकास आघाडीची बिघाडी झाली आहे.म्हणून ते चुकीच्या बातम्या पेरत असल्याची टीका रवी राणा यांनी केली. विरोधकांनी कितीही टीका केली तरी लोक भाजपचे बटण दाबणार असल्याचा विश्वास त्यांनी दाखवला. बच्चू कडू यांच्या जिभेला हाड नाही आहे.ते मला बोलतात, नवनीत राणा याणा बोलतात.फडणवीस मोदी यांना ते बोलतात,असा प्रहार त्यांनी केला.
आज साताऱ्यामध्ये जे विकास झालाय तो काँग्रेसमुळे झाल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला . त्या भागामध्ये जो विकास झालाय सिंचनापासून तर अनेक गोष्टी काँग्रेसमुळे झालाय हे उदयनराजे नाकारू शकत नाही असे वक्तव्य त्यांनी आमगाव येथे केले. त्यांनी राजेंवर टीका पण केली.
पिंपरी- चिंचवडमध्ये नवरदेवाने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. सुरज राजेंद्र रायकर अस आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. आज पहाटे पासून सुरज हा घरातून बेपत्ता होता.त्यानंतर आज दुपारी सव्वा दोनच्या सुमारास विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. “मला लग्न करायचं नाही. मी आत्महत्या करत आहे”. असा मॅसेज त्याने आत्महत्यपूर्वी मामाला केला होता.
धाराशिवमध्ये शिवसेना आमदार कैलास पाटील यांना उन्हाचा मोठा फटका बसला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या सभेत उन्हात त्यांन चक्कर आली. पाटील यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
नागपूर जेल आणि फूड कॉर्पोरेशन च्या जागेवर मल्टि मॉडेल हब बनविला जाणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. नागपूर जेल शहराच्या बाहेर जाऊन त्याठिकाणी अत्याधुनिक तुरुंग तयार केलं जाणार आहे. ब्रॉड गेज मेट्रो बनविण्यासाठी काही तांत्रिक अडचणी या रूटवर जास्त ट्राफिक असल्याने येत होती, त्यासाठी चौथी लाईन टाकली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बारामतीकर उपमुख्यमंत्री सात आठ वेळा शिरूर मतदारसंघात आले. भाजपचे मंत्री, शिंदे सेनेचे मंत्री हे दोन दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले. एवढे सगळे मंत्री येऊन गेले, आता उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री ही येतील. पण माझ्या सर्वसामान मतदाराला कळत आहे. एवढे सगळे मंत्री, मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याचा पोराला घेरायला येत असतील तर ही सर्वसामान्य जनतेची ताकद असल्याचे वक्तव डॉ. अमोल कोल्हे यांनी केले आहे.
सांगलीत काँग्रेसकडून विशाल पाटलांनी शक्ती प्रदर्शन करत तिसरा अर्ज केला दाखल करण्यात आला. यावेळी माजी मंत्री अजितराव घोरपडे,जयश्रीताई पाटील हे उपस्थित होते. काल अपक्ष आणि काँग्रेस पक्षाकडून दोन अर्ज केले आहेत दाखल,आज पुन्हा अर्ज दाखल करण्यात आला.
शरद पवार हे माळेगाव कारखान्याचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ संचालक बाळासाहेब तावरे यांच्या भेटीला पोहोचले आहेत. बाळासाहेब तावरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय असल्याने शरद पवार यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
नवी दिल्ली- शिवसेना पक्षाच्या नाव आणि चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. येत्या 6 मे रोजी ही सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह एकनाथ शिंदेंना दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या गटाने याचिका दाखल केली होती. या याचिकेवर 6 मे रोजी सुनावणी होणार आहे.
धाराशिव- शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार रॅलीला थोड्याच वेळात होणार सुरुवात होणार आहे. धाराशिव शहरातील अण्णाभाऊ साठे चौक इथं आमदार कैलास पाटील यांच्या नेतृत्वात कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आहे. आदित्य ठाकरे, रोहित पवार, अमित देशमुख अर्ज भरण्यासाठी येणार आहेत.
पुणे- सुनेत्रा पवार यांच्या पुणे शहराच्या दौऱ्याचा आज दुसरा दिवस आहे. खडकवासला मतदार संघातील नागरिकांच्या भेटीगाठींना सुनेत्रा पवार यांच्याकडून सुरुवात झाली आहे. खडकवासला मतदार संघातील अनेक भागांना सुनेत्रा पवार भेट देणार आहेत. कालपासून सुनेत्रा पवार या खडकवासला मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत.
नवी दिल्ली- सुनील प्रभू यांच्या याचिकेवर 26 एप्रिलला सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुनावणी होणार आहे. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाविरोधात सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आता येत्या 26 एप्रिलला सुनावणी होणार आहे.
पुणे लोकसभा मतदारसंघातील तीनही उमेदवार मांडणार “पुण्याचं व्हिजन”… पुण्यातील श्रमिक पत्रकार संघात तीनही उमेदवार साधणार एकत्रित संवाद… मुरलीधर मोहोळ, रवींद्र धंगेकर आणि वसंत मोरे आज एकाच मंचावर येत मांडणार पुणे शहरासाठीच त्यांचं व्हिजन…
भाजपकडून उदयनराजे यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. उदयनराजे यांना साताऱ्यातून उमेदवारी जाहीर झाली आहे.
17 व 18 एप्रिल रोजी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत अमरावती दौऱ्यावर… 22 एप्रिल रोजी शरद पवार यांचा पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा… 24 एप्रिल रोजी अमरावतीच्या परतवाडा येथे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची सभा… अमरावतीत माविआचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्यासाठी मावीआची एकजूट
विशाल पाटील यांच्या विशाल रॅलीला सुरुवात झाली आहे. सांगली जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी कार्यकर्ते या रॅलीमध्ये समाज झालेले आहेत.
महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे आज दुपारी अयोध्येला रवाना होणार, रामनवमीच्या पूर्वसंध्येला प्रभू श्रीरामाचे दर्शन घेणार.
तपस्वी छावनी पीठाधिश्वर जगद्गुरु परमहंस आचारी यांनी अयोध्येचे निमंत्रण दिले होते . धनुष्यबाण रामाचा, राहूल शेवाळे कामाचा, अशा घोषणा कार्यकर्त्यांकडून प्रचारात दिल्या जात आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहूल शेवाळे यांचा हा दौरा महत्वाचा मानला जात आहे.
अभिनेता सलमान खान याच्या घराबाहेर गोळीबार करणारे दोन्ही आरोपींना घेऊन गुन्हे शाखेचे पथक मुंबई विमानतळावर दाखल. दोन्ही आरोपींना गुजरातच्या भुज येथून करण्यात आली अटक. थोड्याच वेळात होणार पोलिसांची पत्रकार परिषद, महत्वाचे खुलासे होण्याची शक्यता. रविवारी पहाटे सलमानच्या वांद्रे येथील घराबाहेर झाला होता गोळीबार.
सांगलीमध्ये अखेर विशाल पाटील यांच्याकडून 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दोनपैकी एक अर्ज काँग्रेसकडून तर एक अर्ज अपक्ष म्हणून विशाल पाटील यांनी भरला आहे. सांगलीत आज विशाल पाटील करणार जोरदार शक्तीप्रदर्शन
सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबाराप्रकरणी अटकेतील आरोपी थोड्याच वेलात मुंबई विमानतळावर दाखल होतील. गुन्हे शाखेचे पथक आरोपींना घेऊन येत आहेत. डीसीपी विशाल ठाकूर आणि पोलीस अधिकारी दया नायक मुंबई विमानतळावर पोहोचले आहेत.
दरम्यान या गोळीबाराप्रकरणी पोलिसांनी दाखल गुन्ह्यात कलम 120बी वाढवलं. कट रचून गुन्हेगारी कृत्य हे कलम पोलिसांनी वाढवलं आहे.
याआधी हत्येचा प्रयत्न आणि आर्म्स ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात आता कलम 120 बी हे वाढवण्यात आलं.
चंदा लो, धंदा दो या नीतीवर काम सुरू आहे. पंतप्रधान भ्रष्टाचाराचं समर्थन कसं करतात ? असा सावल विचारत संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली. जे जेलमध्ये आहेत त्यांना सोडवण्यासाठी भाजपने पैसे घेतले, असा आरोपही त्यांनी केला.
श्रीनगरमधील झेलम नदीत पर्यटकांची बोट बुडून चौघांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी बचाव कार्य सुरू असून बोटी मधील तीन जणांना वाचवण्यात यश मिळालं.
“उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांचा खूप मोठ्या मताधिक्याने विजय नक्की होईल. नारायण राणे यांना उमेदवारी न मिळण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात. नागपूरच्या अदृश्य शक्तींमुळे नारायण राणेंनी उमेदवारी अर्ज भरताना विचार करावा. आज उमेदवारी जाहीर होईल, उद्या उमेदवारी जाहीर होईल असं सांगून नारायण राणे यांची भाजपमधील पत खालावली. किरण सामंत यांनी उमेदवारी अर्ज घेतला ही चांगली गोष्ट. किरण सावंत यांना मित्रत्वाचा माझा सल्ला, उमेदवारी अर्ज ठेकेदार टेंडर प्रमाणे नाही. हा घेतलेला उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेऊ नये तर तो भरावा” असं उद्धव ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक म्हणाले.
“सांगलीत महाविकास आघाडीने मोठी चूक केली. काँग्रेस पक्ष मला AB फॉर्म देईल अशी अपेक्षा आहे. आम्हाला आशा आहे की, पक्ष आमच्या बाजूने निर्णय देईल. 19 तारखेपर्यंत पक्षाने AB फॉर्म दिला नाही, तर बंडखोरी करणार” असा इशारा विशाल पाटील यांनी दिला आहे.
“विशाल पाटील यांच्याकडे अजूनही AB फॉर्म काँग्रेसचा नाहीये. काँग्रेसच्या सेंट्रल कमिटीमध्ये विशाल पाटील यांचं नाव होतं. सांगली नैसर्गिक आमची जागा होती. आमचा परंपरागत उमेदवार आहे, ती जागा आम्हाला मिळावी अशी अपेक्षा होती. त्यामुळे कार्यकर्त्यांची भावना साहजिक आहे. पण जेव्हा आघाडीत आपण पुढे जात असतो. त्याचे काही फायदे तोटे तोटेही स्वीकारायचे असतात” असं बाळासाहेब थोरात म्हणाले.
“राष्ट्रवादी हा जो अजितदादांचा पक्ष आहे, तो महायुतीचा घटक आहे. त्यामुळे महायुतीच्या प्रचारासाठी बोलवलं आहे. नाशिक वरून नागपूरला जाणार आहे आणि त्यानंतर ज्या ठिकाणी कार्यक्रम ठेवले आहेत त्या ठिकाणी सभा अटेंड करणार आहे. विकास हा महत्त्वाचा मुद्दा आहे. ओबीसींचा मुद्दा निघतो त्यावेळी ओबीसींच्या विरोधात वातावरण तापवणारे कोण होते? कोणी वातावरण तापवलं? कोणाच्या कारखान्यावर सगळ्या गोष्टी घडत होत्या?या सगळ्या गोष्टींचा उहापोह करता येईल” असं छगन भुजबळ म्हणाले.
लोकसभा निवडणुकीचे उमेदवार म्हणून निवडणूक लढवताना निवडणूक खर्चासाठी उमेदवारांना स्वतंत्र बँक खाते उघडणे अनिवार्य आरहे. त्याची माहिती आपल्या उमेदवारी अर्जासोबत देणे आवश्यक आहे,अशी माहिती निवडणूक आयोगातर्फे देण्यात आली.
वाशिम तालुक्यातील वाईवारा परिसरात आज सकाळी पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. जिल्ह्यात इतर ठिकाणीही काही प्रमाणात हलका हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण आहे. हवामान विभागाने आज वाशिम जिल्ह्यासाठी पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांचे समर्थक असलेले अमोल खुणे यांच्यावर अज्ञात चार लोकांनी हल्ला केला असून या हल्ल्यांमध्ये अमोल खुणे यांच्या डोक्याला जबर दुखापत झालीय. त्यांच्यावर गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोपर्डी बलात्कारातील आरोपीवर हल्ला केल्याप्रकरणी अमोल खुणे हे दोन वर्ष जेलमध्ये होते. जेलमधून बाहेर आल्यावर अमोल खुणे हे जारांगे पाटील यांच्यासोबत काम करत आहेत.
आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशासाठी आजपासून प्रक्रिया सुरु होत आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात होणार आहे. शिक्षण हक्क कायद्यानुसार २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेशाची प्रक्रिया अखेर प्राथमिक शिक्षण विभागाने सुरू केली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया मंगळवारपासून (ता.१६) सुरू होणार असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.