
मंत्री आणि भाजपचे नेते गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील भूखंडांवरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, आम्ही नवी मुंबईकरांच्या विकास कामासाठी भूखंड मागितले होते, रुग्णालय, गार्डन यासाठी भूखंडाची मागणी केली होती, पण जर विकास कामासाठी भूखंड मिळणार नसतील तर मंत्रिपद चाटायचंय का? असा सवाल करत सर्व भूखंड बिल्डरांच्या घशात घातले, माझा राग जर शांत करायचा असेल तर सर्व भूखंड नवी मुंबईकरांच्या विकासासाठी द्या, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला होता. दरम्यान गणेश नाईक यांच्या या टीकेला आता मंत्री उदय सामंत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे, त्यांनी गणेश नाईक यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
नेमकं काय म्हणाले उदय सामंत?
गणेश नाईक यांचा नेमका आक्षेप कोणावर आहे, हेच स्पष्ट नाही. त्यांचा आक्षेप एकनाथ शिंदे यांच्यावर आहे की देवेंद्र फडणवीस यांच्यावर? हे त्यांनी स्पष्ट करावे. कायमस्वरूपी एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करणे योग्य नाही. जर त्यांना काही पटत नसेल किंवा त्रास होत असेल, तर त्यांनी थांबावे, बाकीचे आम्ही सक्षम आहोत, अशा शब्दात सामंत यांनी गणेश नाईक यांच्या टीकेचा समाचार घेतला आहे.
दरम्यान यावेळी बोलताना त्यांनी मराठी आणि हिंदी भाषा वादावर देखील प्रतिक्रिया दिली आहे. मराठी ही आपली मातृभाषा असून तिच्याबाबत आम्ही ठाम आहोत. निवडणुका आल्या की काही जण “हिंदीची सक्ती” असा मुद्दा पुढे करतात. मराठीबरोबर हिंदीची सक्ती हा निर्णय उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना स्वीकारण्यात आला होता. आता निवडणुका आल्यामुळे तो निर्णय इतरांवर ढकलण्याचा प्रयत्न केला जात आहे. संबंधित अहवाल माझ्याकडे आहे, त्यावर डॉ. रघुनाथ माशेलकर यांची सही आहे, असंही यावेळी सामंत यांनी म्हटलं आहे. दरम्यान मराठी शाळा बंद होऊन शहरातील शाळांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. योग्य उपयोजना केल्यास विद्यार्थ्यांची संख्या ग्रामीण भागात कायम राहू शकते असंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.