‘प्रकाश आंबेडकर बाळासाहेबांच्या विचारांचे म्हणून…’, वावगं काय? उद्धव ठाकरे गटाचा नेता संतापला

योगेश घोलप यांनी शरद पवार यांची भेट घेतली. मी प्रकाश अबेद्क्र यांची भेट घेतली. हे दोन्ही नेते आमच्या पक्षासोबत आहेत. मग त्यांची भेट घेतली त्यात वावग असं काय केलं? माझा दोष सांगा नाही तर...

प्रकाश आंबेडकर बाळासाहेबांच्या विचारांचे म्हणून..., वावगं काय? उद्धव ठाकरे गटाचा नेता संतापला
UDDHAV THACKAREY, SANJAY RAUT AND BABANRAO GHOLAP
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
| Updated on: Sep 18, 2023 | 5:12 PM

नाशिक : 18 सप्टेंबर 2023 | उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला. बबनराव घोलप हे नाशिकमधून पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. जिल्ह्यात त्यांच्या नावाचा दबदबा आहे. त्यांच्या मुलगा योगेश घोलप यांनीही देवळाली मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बबनराव घोलप यांनी शिर्डी मतदार संघात मोर्चेबांधणी केली होती. पण, भाजपचे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे बबनराव घोलप यांच्या इच्छेला सुरुंग लागला. त्यामुळे नाराज झालेल्या घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला होता. तर, घोलप यांनी शिवसेना ( उद्धव ठाकरे गट ) सचिव मिलिंद नावेर्कर यांच्यावर थेट आरोप केला.

भाऊसाहेब वाकचौरे यांच्या पक्ष प्रवेशानंतर बबनराव घोलप यांच्याकडील शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे संपर्क प्रमुखपद काढून घेण्यात आले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या घोलप यांनी उपनेतेपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या राजीनाम्यानंतर शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी घोलप यांच्याशी चर्चा केली.

संजय राऊत यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून दोन चार दिवसात कळवतो असे म्हटले होते. मात्र, चार दिवस उलटून गेल्यानंतरही कोणतही निरोप न आल्याने घोलप यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे मी काहीच मागितलं नव्हतं. त्यांच्या सांगण्यानुसार शिर्डीत कामाला लागलो होतो. काम सुरळीत व्हावं यासाठी काही मोठे निर्णय घेतले. कधी नव्हे ते छोट्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते उभे केले, असे त्यांनी सांगितले.

मिलिंद नार्वेकर यांच्यामुळे भाऊसाहेब वाघचौरे यांचा पक्षात प्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यात मला डावलेले. त्यावेळी वाघचौरे पुढे पुढे करत होते. या सगळ्याला मिलिंद नार्वेकर जबाबदार आहेत. नार्वेकरांच्या माध्यमातून हे सगळं झालं, असा आरोप त्यांनी केला.

संजय राऊत यांना मी सगळं काही सांगितलं आहे. माझ्यावर बालांट टाकणार असाल तर काय उपयोग? योगेश घोलप याने काल शरद पवार यांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकर हे बाळासाहेबांच्या विचारांचे आहेत म्हणून मी त्यांची भेट घेतली. आम्ही युतीमध्ये आहोत. त्यामुळे त्यांची भेट घेण्यात वावग असे काय आहे? माझे दोष काय ते मला कळवा नाही तर काढून टाका, असा संताप त्यांनी व्यक्त केला.