Explained : उद्धव ठाकरे मध्यरात्री वर्षावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांना का भेटले? त्यामागची राजकीय कारणं, अर्थ काय?

Devendra Fadnavis-Uddhav Thackeray Meet : महाराष्ट्राच्या राजकारणातली मोठी बातमी आहे. उद्धव ठाकरे हे मध्यरात्री वर्षावर जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले असं 'प्रबुद्ध भारत' या मिडिया हाऊसने टि्वट केलं आहे. त्या भेटी मागची राजकीय कारणं, अर्थ काय आहे? समजून घ्या.

Explained : उद्धव ठाकरे मध्यरात्री वर्षावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांना का भेटले? त्यामागची राजकीय कारणं, अर्थ काय?
Uddhav Thackeray-Devendra Fadnavis
| Updated on: Apr 25, 2026 | 12:21 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात एका सोशल मिडिया पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उद्धव ठाकरे यांनी काल मध्यरात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी माहिती समोर आली आहे. ‘प्रबुद्ध भारत’ या मिडिया हाऊसने हे टि्वट केलं आहे. ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी या भेटीचं विश्लेषण केलं आहे. या राजकीय भेटी मागचे अर्थ समजावून सांगितले आहेत. “उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली अशी बातमी आली असेल, अफवा असेल किंवा काही गोष्टी समोर आल्या असतील तर त्यावर चर्चा होणं स्वाभाविक आहे. त्या चर्चा सुरु झालेल्या आहेत. या चर्चेचा संदर्भ विधान परिषद निवडणुकीशी जोडला जातोय. विधान परिषदेची ही निवडणूक इतकी गुंतागुंतीची आहे, नेत्यांनी त्यांची प्रतिष्ठा पणाला लावावी असं मला वाटत नाही” असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे म्हणाले.

“विधान परिषदेची गणितं सहजसोपी आहेत. एकजागा मविआला मिळणार आहे. त्याचे उद्धव ठाकरे प्रमुख दावेदार आहेत. उद्धव ठाकरे जर उमेदवार नसतील तर महाविकास आघाडीच्या काही मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते” अशी शक्यता विजय चोरमारे यांनी व्यक्त केली. “विधान परिषदेच्या एवढ्या किरकोळ कारणासाठी हे दोन मोठे नेते भेटतील असं मला वाटत नाही. अशी भेट झालीच असेल, तर त्या बद्दल फडणवीस किंवा ठाकरेंनी सांगितलं तर त्यावर विश्वास ठेवता येईल. भेट झालीच तर ती विधान परिषदेपर्यंत मर्यादीत असेल असं मला वाटत नाही. त्यात अनेक महत्वाच्या गोष्टी असू शकतात. भविष्यातील वेगळ्या राजकीय घडामोडी दडलेल्या असू शकतात. फक्त विधान परिषदेसाठी अशी भेट झाली असेल असं मला वाटत नाही” असं विजय चोरमारे म्हणाले.

त्याची परतफेड आता सुप्रिया सुळे यांनी केली

मुख्यमंत्र्यांना घोडेबाजार टाळायचा आहे म्हणून चर्चा झाली असं सुद्धा बोललं जातय. यावर सुद्धा विजय चोरमारे बोलले. “उद्धव ठाकरे यांची निवडणूक लढवायची इच्छा लपून राहिलेली नाही. कोणीही नेता मला निवडणूक लढवायची आहे, असं सांगत नाही. शरद पवार यांना राज्यसभेवर जायचं होतं. त्यांचं नाव संजय राऊत यांनी पुढे आणलं. त्याची परतफेड आता सुप्रिया सुळे यांनी केली. सुप्रिया सुळे यांनी उद्धव ठाकरेंनी विधान परिषदेवर जावं अशी इच्छा व्यक्त केली. काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला सुद्धा उद्धव ठाकरे यांच्याशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. त्यामुळे मला वाटत काँग्रेसची दावेदारी असायला हवी होती. पण उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर काँग्रेस आपली दावेदारी मागे घेऊ शकतं” असं विजय चोरमारे यांनी सांगितलं.

‘एकनाथ शिंदे यांची काय बिशाद आहे, स्वतंत्र उमेदवार देण्याची’

“ही निवडणूक बिनविरोध होण फारस कठीण आहे असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक बिनविरोध व्हावी अशी इच्छा असताना एकनाथ शिंदे यांची काय बिशाद आहे, स्वतंत्र उमेदवार देण्याची. असं होऊ शकत नाही. अशी भेट झाली असेल तर विधान परिषदेपलीकडे राजकीय अर्थ त्यात असू शकतात. ती काय कारण आहेत, यावर लगेच अंदाज बांधण कठीण आहे” असं विजय चोरमारे म्हणाले.

 

Follow Us